विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 48 पैकी 10 जागा लढवून 8 खासदार निवडून येताच आत्मविश्वासाने भरलेल्या शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 225 आमदार निवडून आणायच्या गोष्टी केल्या. पण पवारांच्या भरवशावर विधान परिषदेच्या निवडणुकीत उभे राहून पडलेल्या शेकापच्या जयंत पाटलांनी तो आकडा एका झटक्यात 180 वर आणला.PWP’s jayant patil refutes sharad pawar’s claim of winning 225 seats in maharashtra assembly elections
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगले यश मिळवले. आता विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात सगळे एकत्र लढा. आपण महाविकास आघाडीचे 225 आमदार निवडून आणू, असे पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात म्हणाले होते.
त्यानंतर बरीच राजकीय चक्रे फिरली. विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यात पवार पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांना निवडून आले नाहीत. या निवडणुकीनंतर जयंत पाटील यांनी राजकीय भाष्य केले.
विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव झाल्याची सल मनात आहे, पण शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडी पासून बाजूला जाणार नाही. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 180 आमदार निवडून येतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले. पण 180 हा आकडा सांगताना जयंत पाटील हे शरद पवारांनी जाहीरपणे सांगितलेला 225 चा आकडा विसरले.
विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग नेमके कुणी केले, हे जयंत पाटील यांनी सांगितले. काँग्रेसच्या कोट्यातील 7 मते फुटली. ती मते महायुतीला गेली. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 1 मत फुटले. त्यामुळे जयंत पाटील यांना पराभूत व्हावे लागले. स्वत: जयंत पाटील यांनीही त्याला दुजोरा दिला. एवढेच नव्हे तर शरद पवार गटाच्या कोणत्या आमदाराने मतदान केले नाही, त्याचे नावच जयंत पाटील यांनी जाहीरपणे सांगितले.
पराभवानंतर जयंत पाटील शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओक वर गेले होते. पण पवारांची तब्येत बरी नाही. ते कुणाचेही फोन घेत नाहीत, असे सांगत जयंत पाटील पवारांना न भेटताच सिल्वर ओक वरून परत आले. किंबहुना त्यांना परत यावे लागले.
त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना या आमदाराचे नाव घेतले. शरद पवार गटाकडे 12 मते होती. त्यातील 11 मते मला मिळाली. एक मत माझ्या मित्राचं होतं. त्यामुळे माझ्या मतांची संख्या 12 झाली. आमदार मानसिंग नाईक यांचे मत फुटले. मानसिंग नाईक मतदानाला आयत्यावेळी आले. मिटिंगला आमच्यासोबत होते. मतदान करण्यापूर्वी आम्हाला भेटून गेले. पण मला मत दिले नाही. कोण कोणाला मतदान करते ते कळते. जयंत पाटील, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड ही पक्षाची भक्कम मते मला मिळाली, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
मला 12 वे मत मिळाले. ते महायुतीतील माझ्या मित्राचे मत होते. म्हणजे महायुतीचे 1 मत फुटले, असे जयंत पाटील यांनी सांगितले. तरी आम्ही थोडे बेसावध राहिलो. आमची ताकद कमी आहे, त्यामुळेच हा निकाल आला. माझ्या पराभवाने माझे सहकारी आणि सभागृहही हळहळले, असे जयंत पाटील म्हणाले.
काँग्रेस उमेदवार दुसऱ्या पसंतीने जिंकला
काँग्रेसची दुसरी पसंती मला होती. मला फक्त तीन मते हवी होती. नाही तर विजय आमचाच होता. महाविकास आघाडीकडे 69 मते होती. समान वाटप झालं असतं तर चित्र वेगळं झालं असतं. काँग्रेसची मते फुटलेली दिसत आहेत. काँग्रेसकडे पुरेशी मते असतानाही काँग्रेसच्या उमेदवाराला दुसऱ्या पसंतीची मते मिळाली हे दुर्देव आहे, असंही त्यांनी सांगितलं.
या निवडणुकीत घोडेबाजार झाला. कुणाला वर्क ऑर्डर मिळाल्या. कुणाला पैसे मिळाले असं मी ऐकतोय. 20 कोटी रक्कम मिळाल्याची चर्चा आहे. मी एवढी मोठी रक्कम एकत्रपणे कधी पाहिली नाही, असं सांगतानाच निवडणुकीचा अंदाज आल्यानंतर मी मतदान केंद्राबाहेर पडलो होतो. निकाल काय लागेल एव्हाना लक्षात आले होते, असंही ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App