महायुतीची मते फुटतील म्हणणारे तोंडावर पडले आहेत, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार विजयी झाले. शुक्रवारी विधानसभा कामकाज संपल्यानंतर विधनभवनाच्या पायऱ्यांवर महायुतीचे कार्यकर्ते आणि आमदारांनी एकच जल्लोष केला. यावेळी एकमेकांना पेढा भरवून हे यश साजरे करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, ‘ही महायुतीच्या विजयाची नांदी असून विधानपरिषद निवडणुकीत मिळालेल्या यशाचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत देखील पहायला मिळेल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला. तसेच ‘या विजयामुळे महायुती अधिक मजबूत झाली असून महायुतीची मते फुटतील म्हणणारे तोंडावर पडले आहेत असे मत व्यक्त केले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार सदाभाऊ खोत, आमदार डॉ.परिणय फुके, आमदार पंकजा मुंडे, आमदार कृपाल तुमाने, आमदार भावना गवळी, आमदार योगेश टिळेकर तसेच महायुतीचे सर्व विजयी उमेदवार, मंत्री आणि आमदार उपस्थित होते.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत 225 जागा निवडून आणण्याची घोषणा करणाऱ्या शरद पवारांना विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना निवडून आणता आले नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी अखेरच्या टप्प्यात शरद पवारांनी पाठिंबा दिलेले शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना पाडले. महाविकास आघाडीतल्या ठाकरे – पवार संघर्षाचा फटका छोट्या शेतकरी कामगार पक्षाला बसला.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी सध्या मतमोजणीच्या पहिल्याच टप्प्यात भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके आणि योगेश टिळेकरांचा विजय निश्चित झाला. त्यापाठोपाठ शिवसेनेचे कृपाल तुमाने, भावना गवळी, राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे आदी उमेदवार विजयी झाले. सदाभाऊ खोत दुसऱ्या पसंतीने निवडून आले.
पण मतमोजणीमध्ये पहिल्यापासून शेकपाचे जयंत पाटील पिछाडीवर होते. तीन फेऱ्यानंतरही जयंत पाटलांनी दुहेरी संख्याही गाठता आली नाही. पहिल्या पसंतीमध्ये शेकपच्या जयंत पाटील यांना फक्त 6 मते मिळाली होती. विजयासाठी 23 आकडा गाठावा लागणार होता. पण त्यांना फक्त 12 मते मिळाली. शरद पवारांच्या पाठिंब्याचा काही उपयोग झाला नाही. आपली पिछेहाट दिसत असल्यामुळे जयंत पाटील यांनी मतमोजणी केंद्र सोडून निघून गेले.
दुसरीकडे महायुतीमधील भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचे दोन्ही उमेदवार जिंकले. शिंदेंचेही दोन्ही उमेदवार विजयी झाले. त्यामुळे महायुतीच्या आमदारांनी जल्लोष केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App