नाशिक : छगन भुजबळ ते अभयसिंह राजे भोसले; राष्ट्रवादीतल्या खच्चीकरणाचे किस्से, त्यांच्या नेत्यांनी चव्हाट्यावर आणले!!, असे सध्या घडताना दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस नावाची प्रवृत्ती शरद पवारांनी निर्माण केल्यानंतर स्वतःचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी कोण कोणत्या खेळ्या केल्या, त्यामुळे कोणा कोणाला राजकीयदृष्ट्या खच्ची केले, याचे किस्से राष्ट्रवादीतल्याच नेत्यांनी समोर आणले. त्यापैकी एक नेते एकेकाळी राष्ट्रवादीत होते. आता ते भाजपचे मंत्री आहेत, तर दुसरे नेते आज अजितदादांच्या राष्ट्रवादीत आहेत.
एकेकाळी राष्ट्रवादीतून विधानसभेवर पोहोचलेले पण सध्या भाजपमधून विधानसभेवर जाऊन महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री झालेले शिवेंद्रराजे भोसले यांनी, त्यांचे वडील अभयसिंहराजे भोसले यांचे राजकीय दृष्ट्या राष्ट्रवादीत कसे खच्चीकरण झाले याचा किस्सा सांगितला. अभयसिंह राजे 1999 मध्ये राष्ट्रवादीत आले नसते, तर ज्येष्ठता क्रमानुसार काँग्रेसने त्यांचेच नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केले असते, पण तसे घडले नाही. कारण ते राष्ट्रवादीत आले आणि राष्ट्रवादीतून त्यांचे नेतृत्व कधीच पुढे आणले गेले नाही, असे शिवेंद्रराजे म्हणाले.
1999 मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. परंतु अभयसिंह राजे त्यांना एक टर्म सीनियर होते. ते काँग्रेसमध्ये असते, तर तेव्हाच मुख्यमंत्री झाले असते. पण ते राष्ट्रवादीत आले आणि त्यांची ती संधी हुकली ती कायमचीच, अशी खंत शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केली. अभयसिंह राजे भोसले मुख्यमंत्री न केल्यामुळे सातारा जिल्ह्याचे फार मोठे नुकसान झाले, अशा शब्दांमध्ये शिवेंद्रराजे भोसले यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे तोफ डागली. स्वतः शिवेंद्रराजे हे पहिल्यांदा राष्ट्रवादीतूनच आमदार झाले होते. त्यामुळे आपल्यावर राष्ट्रवादीने अन्याय केला नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
– भुजबळांविरुद्ध राष्ट्रवादीतली मराठा लॉबी
दुसरीकडे छगन भुजबळांच्या विरोधात एकीकडे चुचकारणी आणि दुसरीकडे फटकारणी, असे राजकारण सुरू झाले असून याची सुरुवात उपमुख्यमंत्री अजितदादांनी केली. भुजबळ संतापून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्यानंतर राष्ट्रवादीतली मराठा लॉबी आक्रमक झाली असून या लॉबीने भुजबळांच्या विरोधात जुनी राजकीय प्रकरणे बाहेर काढून त्याचा “बदला” अजितदादांनी घेतल्याची भावना तयार करायला सुरुवात केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांना छगन भुजबळ भेटायला गेल्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्याकडे 8-10 दिवसांचा वेळ मागून त्यांच्या मंत्रिपदासंदर्भात तोडगा काढायचे आश्वासन दिले. त्यावर अजित पवारांनी भुजबळांचे बंड हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय आहे. तो आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू, पण भुजबळ लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात, अशी मखलाशी केली होती.
त्यानंतरच राष्ट्रवादीतली मराठा लॉबी छगन भुजबळ यांच्या विरोधात आक्रमक झाली. सुरुवातीला नाशिक मधले त्यांचे प्रतिस्पर्धी आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी भुजबळ यांच्यावर तोफ डागली. भुजबळांना ओबीसी कार्ड खेळताना फक्त मुलगा आणि पुतण्याच आठवतात. ते जातीयवादी राजकारण करतात, असा आरोप माणिकरावांनी केला.
माणिकराव कोकाटे यांच्या पाठोपाठ भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी छगन भुजबळ यांच्यावर तोफ डागली. अजितदादांनी 2009 चा राजकीय बदला घेतला, असे विलास लांडे म्हणाले. त्यांनी त्यावेळचा घटनाक्रम सांगितला.
2009 मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात शरद पवारांनी छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री केले, पण त्यावेळी राष्ट्रवादीचे सगळे आमदार अजित पवारांच्या पाठीशी होते, तरी देखील पवारांनी आपले वजन भुजबळांच्या पारड्यात टाकले होते, पण नंतर आदर्श घोटाळ्यामध्ये अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यायला लागल्यानंतर आपोआपच भुजबळांचे उपमुख्यमंत्री पद गेले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळाच्या वेळी राष्ट्रवादीतली मते आजमावली गेली, त्यावेळी आमदारांनी भुजबळ यांच्या ऐवजी अजितदादांच्या पारड्यात मते टाकली. त्यावेळी शरद पवारांनी आमदारांचे ऐकून अजितदादांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केले. अजितदादांचे उपमुख्यमंत्री पद भुजबळ यांनी सुरुवातीला पटकावले होते, याचा “बदला” आता अजितदादांनी घेतला, असे विलास लांडे म्हणाले.
वर उल्लेख केलेल्या किश्यांमधून राष्ट्रवादीमध्ये, मग ती शरद पवारांची असो, अथवा अजितदादांची असो, लोकनेत्यांचे कसे राजकीय दृष्ट्या खच्चीकरण झाले, हेच उघड्यावर आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App