शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज किरीट सोमय्यांवर सलग तिसऱ्या दिवशी आरोपांच्या फैरी झाडत त्यांच्या भ्रष्टाचाराचे आपल्याकडे ट्रकभर पुरावे असल्याचा दावा केला आहे. संजय राऊत यांच्या आरोपांमध्ये कोट्यावधी रुपयांच्या मोठ-मोठ्या आकड्यांचा भडिमार आहे. 100 -125 कोटी रुपयांपासून सुरू करून संजय राऊत यांनी आज किरीट सोमय्या यांच्या भ्रष्टाचाराचा आकडा 7500 कोटी रुपयांपर्यंत वाढविला आहे. यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नावे घेतली आहेत. Fragrant stories of corruption, hollow talk of truckloads of evidence: Govt. Ra. From Khairnar to Sanjay Raut via Gopinath Munde !!
त्याच वेळी संजय राऊतांनी आपण अजून भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढू, असा इशारा देऊन ठेवला आहे. त्यामुळे आजचा 7500 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आकडा पुढच्या काही दिवसांमध्ये फुगत जाऊन केवढा मोठा होतो? आणि संजय राऊत त्याचे ट्रकभर पुरावे केव्हा आणि कोणा – कोणाला देतात..?? याची उत्सुकता सगळ्या महाराष्ट्राला लागली आहे.
बाकी महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचार प्रकरणांच्या ट्रकभर पुराव्यांचा हा विषय काही संजय राऊतांनी नव्याने काढलेला नाही. त्याची फक्त त्यांनी एक उजळणी केली आहे. या ट्रक भर पुराव्यांची सुरुवात 1990 च्या दशकात मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गो. रा. खैरनार यांनी केली होती. त्यांनी त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर आज संजय राऊत जशापद्धतीने किरीट सोमय्या यांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत, तशाच आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्याकडे शरद पवारांच्या भ्रष्टाचाराचे आणि दाऊदशी संबंधाचे ट्रक भर पुरावे आहेत, असा दावा केला होता. त्यावेळी टीव्ही चॅनेलचा एवढा सुळसुळाट नव्हता. सोशल मीडियाचे तर अस्तित्वही नव्हते. त्यामुळे ब्लॅक ॲण्ड व्हाइट आणि रंगीत वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने गो. रा. खैरनार यांच्या आरोपांनी भरलेले असायचे. अनेक वर्षे गो. रा. खैरनार हे वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्सचे धनी झाले होते. त्यांच्या आरोपांमुळे महाराष्ट्रात एक राजकीय वादळ तयार झाले आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा पराभव होऊन त्यांची सत्ता गेली होती.
शरद पवारांची सत्ता जाण्याएवढे रामायण महाराष्ट्रात घडूनही गो. रा. खैरनार यांचे ट्रक भर पुरावे कधीच बाहेर आले नाही. हे ट्रक नेमके कोठे पार्क करून ठेवले होते?? त्या पुराव्यांचे नेमके काय झाले??, याचा पत्ता अद्याप महाराष्ट्राला लागलेला नाही…!!
त्यानंतर महाराष्ट्रातल्या नद्यांमधून बरेच राजकीय पाणी वाहून गेले भले भले नेते आले आणि भले भले नेते गेले. पण गो. रा. खैरनार यांच्या ट्रक भर पुराव्यांचे काय झाले? याचे कोणालाच काही समजले नाही. त्या वेळी त्यांच्यासमवेत मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त सदाशिवराव तिनईकर हे देखील शरद पवारांवर आरोपांचा भडिमार करण्यात पुढे होते.
गो. रा. खैरनार यांच्याकडून “प्रेरणा” घेऊन त्या वेळचे भाजपचे फायरब्रँड नेते गोपीनाथ मुंडे यांनी देखील शरद पवारांवर भ्रष्टाचाराच्या आणि दाऊदशी संबंधाच्या आरोपांच्या जबरदस्त फैरी झाडल्या होत्या. त्यांनी देखील आपल्याकडे ट्रक भर पुरावे असल्याचा दावा केला होता. परंतु, गोपीनाथ मुंडे यांची राजकीय वाटचाल नंतर केंद्रातल्या मंत्री पदापर्यंत जाऊन पोहोचली. पण शरद पवार यांच्यावरील आरोपांचे ट्रक भर पुराव्यांचे काय झाले? याचा त्यांना विसर पडला. जनता तर विसरभोळीच आहे. जनतेलाही विसर पडला…!!
आज संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आरोपांची सरबत्ती झाडून ट्रक भर पुराव्यांचा दावा केल्यानंतर गो. रा. खैरनार, सदाशिवराव तिनईकर, गोपीनाथ मुंडे यांच्या ट्रक भर पुराव्यांची आठवण झाली आणि त्यांची वासलात कशी लागली?? ते ट्रक नेमके कुठे पार्क करून ठेवलेत??, याची उत्सुकता पुन्हा चाळवली गेली इतकेच…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App