विशेष प्रतिनिधी
बीड : यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे बीडसह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाकडून तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, परतीच्या पावसाची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले. Sunetra Pawar
खरीप हंगाम आणि संभाव्य टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (१६ सप्टेंबर) बीड येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्य शासन टंचाईच्या परिस्थितीबाबत गंभीर असून, मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच गावपातळीवर नुकसानीचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
बैठकीला खासदार बजरंग सोनवणे (ऑनलाइन), आमदार विक्रम काळे, प्रकाश सोळंके, सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि विजयसिंह पंडित यांच्यासह उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पिकांच्या नुकसानीचे पारदर्शक पंचनामे करण्याचे आदेश
बैठकीत लोकप्रतिनिधींनी पावसातील खंड आणि पिकांच्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला. आमदार सुरेश धस यांनी पावसाचा खंड २९ नव्हे, तर ३६ दिवसांचा असल्याचे निदर्शनास आणून दिले. आमदार प्रकाश सोळंके यांनी पिकांचे ९० ते ९५ टक्के नुकसान झाल्याचा दावा करत एनडीआरएफच्या निकषांपेक्षा अधिक मदत देण्याची मागणी केली. खासदार बजरंग सोनवणे यांनी सरसकट नुकसानभरपाई देण्यासह मागील काळातील प्रलंबित मदत तातडीने वितरित करण्याची मागणी केली.
या मागण्यांची दखल घेत प्रशासनाने पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण आणि पंचनामे वस्तुनिष्ठ व पारदर्शक पद्धतीने करावेत. त्यानंतर सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.
पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याच्या सूचना
टंचाईच्या पार्श्वभूमीवर धरणांमधील उर्वरित पाणीसाठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. पाण्याचा अवैध उपसा तातडीने बंद करावा, तसेच भूजल पातळीचे सातत्याने मोजमाप करावे, असेही प्रशासनाला सांगण्यात आले.
ज्या भागात पिण्याच्या पाण्याची गरज आहे, त्या ठिकाणी टँकरचे प्रस्ताव विनाविलंब मंजूर करून पाणीपुरवठा सुरू करावा. टँकर भरण्यासाठी कृषी क्षेत्रातील खासगी विहिरी अधिग्रहित करण्यासह नवीन विंधन विहिरी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
बीड शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर
बीड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, असे आदेश सुनेत्रा पवार यांनी दिले. पाणीपुरवठा योजनेची थकीत वीज बिले माफ करण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
आष्टीत चारा डेपो सुरू करण्याचा निर्णय
आष्टी तालुक्यात रेकॉर्डनुसार चाऱ्याची उपलब्धता नसल्याने परिस्थिती गंभीर असल्याचा मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. यावर मदत व पुनर्वसन विभागाने तातडीने चारा डेपो सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
जलसंधारणाच्या कामांना गती
टंचाईच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत, असे निर्देश देण्यात आले. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रकल्पांमधील गाळ काढण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची सूचनाही प्रशासनाला करण्यात आली.
दरम्यान, जायकवाडी धरणाचा कालवा पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी मोहीम राबवावी, अशी मागणी आमदार प्रकाश सोळंके यांनी केली.
सिबिल रिपोर्टच्या आधारे पीक कर्ज नाकारू नका
शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिबिल (CIBIL) रिपोर्टमुळे अडचणी येत असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. बँकांनी केवळ सिबिल रिपोर्टच्या आधारे शेतकऱ्यांचे पीक कर्ज नाकारू नये, अशी ताकीद देण्यात आली.
टंचाई निवारणासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश
बैठकीच्या समारोपावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी १७ सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी आणि टंचाई निवारणासाठी युद्धपातळीवर काम करावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App