विशेष प्रतिनिधी
पुणे: राज्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच पुढील चार आठवडे राज्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भाग वगळता सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी सुरू असल्या, तरी बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. आता राज्यात पुढील चार आठवडे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. पावसाची हीच परिस्थिती कायम राहिल्यास पिकांवर पाण्याचा ताण निर्माण होण्याची शक्यता आहे.
यंदा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून अनेक भागांत पावसाने ओढ दिल्यामुळे पूर्वी समाधानकारक स्थितीत असणारे भाग आता हळूहळू तुटीत जात आहेत. आता ऑगस्टअखेरपर्यंत मोठ्या पावसाचा अंदाज नसल्याने मराठवाडा आणि विदर्भातील १५ जिल्ह्यांवर अपुऱ्या पावसाचे सावट आहे. १ जून ते १९ ऑगस्ट या कालावधीत कोकण आणि गोव्यात सरासरीपेक्षा ४ टक्के कमी, मराठवाड्यात २१ टक्के कमी, तर विदर्भात १९ टक्के कमी पाऊस नोंदला गेला आहे. तर फक्त १ ते १९ ऑगस्टदरम्यान कोकणात २४ टक्के कमी, मध्य महाराष्ट्रात ७ टक्के कमी, मराठवाड्यात ६२ टक्के कमी, तर विदर्भात ६६ टक्के कमी पाऊस झाला आहे.
पावसाचा जोर का ओसरला? ऑगस्टमध्ये उत्तर आणि वायव्य बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली. या क्षेत्रांचा जमिनीवरील प्रवास वायव्य दिशेने उत्तर प्रदेशाकडे झाला. त्यामुळे पावसाचे क्षेत्र गंगेचे मैदान आणि हिमालयाच्या पायथ्याकडील प्रदेशांत सक्रिय राहिले. मॉन्सूनचा पश्चिम-पूर्व कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे राहिल्याने महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील पावसात घट झाली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App