वृत्तसंस्था
मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात महाविकास आघाडीविरोधात आपल्या वक्तव्यांचा धुरळा उडविला असतानाच त्यांचे पंख कातरण्याच्या दृष्टीने काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते आज शरद पवारांच्या घरी जाऊन धडकले. शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी त्यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत असले, तरी या भेटीत महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा झाल्याचेच बोलले जात आहे. Maharashtra Congress in-charge HK Patil, State Revenue Minister Balasaheb Thorat, and Public Works Minister Ashok Chavan call on NCP Chief Sharad Pawar
काँग्रेसचे महाऱाष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पवारांची सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली. या भेटीत या नेत्यांनी नाना पटोले यांना वगळल्याचे अधोरेखित झाले. त्यामुळे त्याची चर्चा राज्याच्या राजकारणात जास्त रंगली आहे.
त्यातही नानांनी काँग्रेसचा स्वबळाचा नारा देऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य भरण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यामुळे शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे दुखावले आहेत. त्यातही नानांनी खंजीर खुपसण्याचा केलेला उल्लेख पवारांना जास्त डाचला आहे. या राजकीय पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते पवारांना घरी जाऊन भेटले आहेत.
अर्थात या भेटीत नुसते नाना पटोले नसणे हेच वेगळेपण आहे असे नाही, तर सहसा दुसऱ्या पक्षाच्या नेत्याच्या घरी जाऊन न भेटणारे काँग्रेसचे प्रभारी देखील पवारांच्या घरी जाऊन भेटल्याने त्याची चर्चा जास्त सुरू आहे. काँग्रेसचे राज्य प्रभारी हे केंद्रीय नेतृत्वाचे प्रतिनिधी असतात. ते राज्याच्या पातळीवरच्या नेत्यांना गेस्ट हाऊसवर किंवा मोठ्या नेत्याच्या निवास्थानी बोलावून घेऊन भेटत असतात.
याच्या विपरित काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे शरद पवारांना घरी जाऊन भेटले आहेत. यातला राजकीय संदेश नानांचे पंख कातरण्याचा तर नाही ना, असाही घेतला जात आहे.
नानांनी महाविकास आघाडीविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीत आलबेल नसल्याच्या चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यामुळे अलिकडेच पवार यांनी मी नानांसारख्या लहान माणसांवर प्रतिक्रिया देत नाही, असे म्हणून त्यांना झटकले होते.
यानंतर काँग्रेस नेत्यांनी पवारांची घेतलेली भेट चर्चेचा मुद्दा बनली आहे. पवारांच्या भेटीत महाविकास आघाडीतील धुसफूस, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभेच्या अध्यक्षपद याबाबत देखील चर्चा झाल्याचे समजते. केंद्र सरकारने नवे सहकार खाते निर्माण करण्याच्या धोरणावरही या भेटीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App