उपटलेले फायदे, भोगलेली सत्ता; मध्यमवर्गीय मतदार काँग्रेसच्या बापाचा माल आहे का??, असा संतप्त सवाल करायची वेळ दुसऱ्या – तिसऱ्या कोणी आणली नसून खुद्द काँग्रेसनेच पोचलेल्या “विचारवंती” खासदाराच्या एका वक्तव्याने आणली आहे. हे खासदार मार्क्सवादी विचारांवर पोसून काँग्रेसच्या पालख्या वाहत आहेत. कुठल्या विचारांनी भरण पोषण करून घेऊन कुठल्या विचारांच्या पालख्या वाहायच्या, हा ज्याचा त्याचा सवाल आहे, पण म्हणून कुठल्याच मतदारांवर दुगाण्या झोडायचा कुणाला अधिकार दिलेला नाही. हे कुमार केतकर नावाच्या मार्क्सवादी विचारांवर पोसून काँग्रेसच्या पालख्या वाहायला लागलेल्या “विचारवंती” खासदाराला नक्कीच सुनवावे लागेल.
कुमार केतकर यांनी मनमोहन सिंग यांच्या श्रद्धांजली सभेमध्ये जी मुक्ताफळे उधळली आणि मध्यमवर्गीय मतदारांवर जी आगपाखड केली, ते पाहता शीर्षकात विचारलेलाच प्रश्न त्याच आक्रमक भाषेत विचारणे उचित ठरेल, यात शंका नाही.
काय म्हणाले कुमार केतकर?? म्हणे, मध्यमवर्गीय मतदारांनी सगळे फायदे काँग्रेसकडून उपटले आणि आज ते भाजपला पाठिंबा देत आहेत. पंडित नेहरूंनी स्थापन केलेल्या आयटी मधून शिकून अमेरिकेत गेलेले मध्यमवर्गीय आज नेहरू विरोधी झालेत. 1991 मध्ये चाळीत राहणारे मध्यमवर्गीय आज आलिशान घरात राहतात. सायकल घेण्याची मारामार असणारे मध्यमवर्गीय आज दोन – दोन मोटारी बाळगळ बाळगतात. ही म्हणे, सगळी काँग्रेसची देन आहे. काँग्रेस – पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याकडून फायदे उपटणारे मध्यमवर्गीय आज भाजपला पाठिंबा देत आहेत.
ही सगळी आगपाखड कुमार केतकरांनी मनमोहन सिंग यांच्या श्रद्धांजली सभेत केली, पण नेहमीप्रमाणे मार्क्सवादी अर्धवट बुद्धिवादाचा तो अविष्कार ठरला.
कारण कुमार केतकर यांनी मध्यमवर्गीयांनी काँग्रेसकडून उपटलेले फायदे सांगितले, पण ज्या काळात काँग्रेसने मध्यमवर्गीयांना हे तथाकथित फायदे मिळवून दिले, त्या बदल्यात कुमार केतकर यांनीच घेतलेल्या नावांनी म्हणजे पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी दोन – दोन दशके संपूर्ण देशाची सत्ता भोगली, ते मात्र सांगितले नाही!! पंडित नेहरू देशाचे 17 वर्षे पंतप्रधान होते. त्यांची कन्या इंदिरा गांधी तीन टर्म पंतप्रधान राहिल्या. देशाचे जे काही भले बुरे व्हायचे, ते या दोन पंतप्रधानांच्या काळात सर्वाधिक झाले.
पंडित नेहरूंनी जशा आयआयटी स्थापन केल्या, तशा काँग्रेसमध्ये अपप्रवृत्ती देखील शिरू दिल्या, हा इतिहास आहे. ज्या नेहरूंनी विज्ञानवादाची कास धरून आयआयटी, इसरो यांसारख्या संस्था स्थापन केल्या, त्यांनीच देशाच्या संरक्षण क्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष केले होते आणि त्यांच्याच पंतप्रधान पदाच्या काळात चीनकडून भारताला दारुण पराभव स्वीकारावा लागला होता, हे विदारक सत्य कुमार केतकर यांनी सांगितले नाही. नेहरूंच्या पदरामध्ये जसे विज्ञानवाद आणि त्यातून निर्माण झालेल्या संस्था यांचे यश कुमार केतकर यांनी टाकले, तसेच चीनविरुद्धच्या दारुण पराभवाचे अपयश नेहरूंच्या पदरात टाकले असते, तर ते न्याय्य आणि नि:पक्ष ठरले असते, पण केतकरांनी ते केले नाही.
जे नेहरूंचे, तेच इंदिरा गांधींचे. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचा पराभव करून बांगलादेशाची निर्मिती केली, हे त्यांचे “क्रेडिट” केतकरांनी त्यांना दिले, पण त्याच इंदिरा गांधींनी आणीबाणी लागून लोकशाहीचा गळा घोटला याचे “डिस्क्रेडिट” मात्र केतकरांनी इंदिरा गांधींच्या पदरात टाकले नाही. त्या उलट केतकरांना नेहरू आणि इंदिरा गांधींनी केलेल्या कामाचा “टॅक्स रिटर्न” मात्र मध्यमवर्गीयांनी राहुल गांधींना मते देऊन हवा आहे!!
मध्यमवर्गीयांनी खरं म्हणजे नेहरू आणि इंदिरा गांधी यांना त्या – त्या काळात भरभरून मते देऊन उपटलेल्या तथाकथित फायद्यांचा “रिटर्न” दिला होता म्हणूनच ते दोन- दोन दशके सत्ता उपभोगू शकले होते. पण तरीही आता मध्यमवर्गीयांनी नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याच वारसदारांच्या सत्ता भोगासाठी काँग्रेसला मतदान करावे केतकरांची अपेक्षा आहे, म्हणूनच शीर्षकात उल्लेख केलेला सवाल त्याच आक्रमक भाषेत करायची गरज आहे, काँग्रेस – नेहरू – इंदिरा गांधी यांच्याकडून घेतलेल्या कथित फायद्यांच्या बदल्यात गांधींच्या नव्या पिढीला सत्ता भोगण्यासाठी मतदान करायला मध्यमवर्गीय मतदार काँग्रेसच्या बापाचा माल आहे का??
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App