वृत्तसंस्था
ढाका : बांगलादेशात थांबलेले आरक्षण आंदोलन पुन्हा एकदा सुरू झाले आहे. ते रोखण्यासाठी हसीना सरकार (Hasina government ) मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहे. गेल्या तीन दिवसांत १० हजारांहून जास्त लोकांना अटक केली आहे. यामध्ये जमात आणि मुख्य विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या(बीएनपी) ९२,०० नेते व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
विरोधी नेत्यांच्या आरोपानुसार, सरकार आपल्या राजकीय उद्देशासाठी विरोधी नेत्यांना खोट्या खटल्यांत अडकवत आहे.विशेष म्हणजे, कोटा दुरुस्तीच्या मागणीसाठी १ जुलैपासून सुरू झालेल्या विद्यार्थी आंदोलनाने १८ जुलैपर्यंत हिंसक रूप घेतले. यानंतर बांगलादेशची राजधानी ढाक्यासह देशभरातील शिक्षण संस्थांमध्ये तणाव आहे. १६ जुलैपासून देशातील प्राथमिक विद्यालये, कॉलेजसह सर्व शैक्षणिक संस्था आतापर्यंत बंद आहेत. त्या पुन्हा कधी उघडतील हे सांगता येत नाही.
जमात अन् बीएनपीचे नेते हसीना सरकारला उखडून फेकण्याचे करताहेत आवाहन
बांगलादेशच्या गृह मंत्रालयाने पाक समर्थक असणे आणि दहशतवादी कारवायांत सहभागी होण्याचा आरोप करत जमात आणि त्याची विद्यार्थी शाखा शिबीरवर बंदी घातली आहे. यानंतर जमातचे नेते उघडपणे सरकारच्या विरोधात उतरले आहेत. जमातसोबत बीएनपीने हसीना सरकारला उखडून फेकण्याचे आवाहन केले आहे. असे असले तरी कोणत्याही विद्यार्थी गट अथवा त्यांच्या नेतृत्वाने सरकार पाडण्याचे आवाहन केलेले नाही.
राजधानी ढाक्यात शुक्रवारी आंदोलकांनी विद्यार्थ्यांवरील क्रौर्य आणि हिंसाचारासाठी हसीना यांनी देशाची माफी मागण्याचे आवाहन केले. दुसरीकडे, विद्यार्थ्यांनी गृहमंत्री आणि शिक्षणमंत्र्यासह हसीना सरकारमधील ६ मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
आंदोलन भडकवण्यात सहभाग नसल्याचे बीएनपी-जमात सुरुवातीपासून म्हणत आहे. मात्र, जाळपोळीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बीएनपी आणि जमातचे नेते,कार्यकर्त्यांचे नाव समोर आले आहे. याशिवाय माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांचे नाव समोर आले. पोलिसांच्या हत्येसाठी ७ हजार रु. तर अवामी लीग विद्यार्थी कार्यकर्त्याला हत्येसाठी ३५०० रु. देण्याचे आश्वासन तारिकने दिल्याचा आरोप आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App