नाशिक : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अंबादास दानवे यांच्या विधान परिषदेच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यामुळे एक बाब स्पष्ट झाली, ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी संसदीय राजकारणातून माघार घेतली. त्यांना शरद पवारांसारखी संसदीय राजकारणाची क्रेझ आणि गरज राहिली नाही. Ambadas Danve
पवारांच्या उमेदवारीसाठी वातावरण निर्मिती
महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीने (देवेंद्र फडणवीस यांच्या छुप्या पाठिंब्याने) शरद पवारांना राज्यसभेवर पाठविले. त्यावेळी सुप्रिया सुळे यांना उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटी घेऊन शरद पवारांच्या उमेदवारीसाठी कॅनव्हसिंग करावे लागले होते. शरद पवारांच्या उमेदवारीसाठी मोठी वातावरण निर्मिती करावी लागली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार नसतील त्यांच्या ऐवजी दुसरे कोणी उमेदवार असेल, तर महायुती सातवा उमेदवार मैदानात उतरवेल, अशी वातावरण निर्मिती केली होती. ती शरद पवार यांच्या पथ्यावर पडावी अशी ती “राजकीय व्यवस्था” होती. अन्यथा महाविकास आघाडीचा दुसरा उमेदवार पाडायची तयारी देवेंद्र फडणवीस यांनी केलीच होती.
उद्धव ठाकरेंना दिला होता पाठिंबा
मात्र त्याच निवडणुकीच्या वेळी शरद पवार राज्यसभेवर गेले, तर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला होता. सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन सपकाळ या दोघांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना विधान परिषदेची उमेदवारी करायची गळ घातली होती. संजय राऊत यांनी सुद्धा तेच कॅनव्हसिंग केले होते.
संसदीय राजकारणाची गरज नाही
पण उद्धव ठाकरे यांना या सगळ्यांचे प्रयत्न मान्य झाले नाहीत. त्यांना विधिमंडळातले संसदीय राजकारण मानवलेच नाही. शरद पवारांना ज्याप्रकारे संसदीय राजकारणाची क्रेझ आणि गरज राहिली, त्या प्रकारे उद्धव ठाकरेंना संसदीय राजकारणाची क्रेझ आणि गरज वाटली नाही. म्हणूनच त्यांनी विधान परिषद निवडणूक टाळली. स्वतःच्या ऐवजी अंबादास दानवे यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
विधान परिषदेचा नाईलाज
शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या डावपेचातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर यावे लागले होते. तो कायदेशीर दृष्ट्या त्यांचा नाईलाज होता. अन्यथा कुठल्याच ठाकरे यांनी संसदीय राजकारण स्वतःसाठी महत्त्वाचे मानलेच नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे कुठलीही निवडणूक लढविणार नाही असे सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी हयातभर राजकारण करून सुद्धा कधीच कुठली निवडणूक लढविली नव्हती. ठाकरेंपैकी पहिली निवडणूक लढविली, ती आदित्य ठाकरे यांनीच. त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून दोनदा विजय मिळवून विधानसभेत प्रवेश केला. पण उद्धव ठाकरे नाईलाजास्तव विधान परिषदेवर पोचले होते.
शरद पवार व्हीलचेअर वर राज्यसभेत
शरद पवारांना नेहमीच आपल्या राजकारणासाठी संसदीय टेकूची गरज आणि क्रेझ राहिली म्हणून तर अगदी गलितगात्र अवस्था असताना सुद्धा त्यांनी संजय राऊतांच्या तोंडून स्वतःच्या राज्यसभेची इच्छा अगदी सुरुवातीलाच वदवून घेतली. संजय राऊत यांच्या रोजच्या पत्रकार परिषदांमधून त्यांनी राज्यसभेचा विषय जिवंत ठेवला. त्यातूनच त्यांनी स्वतःच्या ६० वर्षांच्या संसदीय कारकीर्दीचा डंका वाजवत ठेवला. आपण राज्यसभेत गेलो नाही, तर आपला संसदीय कारकीर्दीचा विक्रम होणार नाही हे लक्षात येताच शरद पवारांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या स्वतःच्या राज्यसभा खासदारकीचा आग्रह धरला. तो पूर्ण करून घेतला. त्यांनी व्हीलचेअर वर बसून राज्यसभेत जाऊन शपथ घेतली.
बाळासाहेब ठाकरेंची परंपरा
पण उद्धव ठाकरे यांनी याबाबतीत बाळासाहेब ठाकरे यांचीच परंपरा पाळली. त्यांना विधिमंडळाच्या सदस्यत्वाची बिलकुल क्रेझ वाटली नाही किंवा स्वतःचे राजकारण पुढे रेटण्यासाठी विधान परिषदेचे आमदारकीची गरज राहिली नाही. म्हणूनच त्यांनी अंबादास दानवे यांच्यावर पुन्हा विश्वास टाकून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली. आता उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या आमदारकीसाठी कोणाचे उंबरे झिजवावे लागणार नाहीत, की शरद पवारांसारखी कुठली राजकीय वातावरण निर्मिती करावी लागणार नाही. राजकारणाच्या या शैलीत उद्धव ठाकरे शरद पवारांच्या पेक्षा जास्त पुढे निघून गेले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App