विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Abdul Sattar विधान परिषद निवडणुकीतील नाराजीचा सूर नुकताच शांत झाल्यानंतर शिवसेना नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत त्यांचे पुत्र समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान बाद ठरवण्यात आला आहे. या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत सत्तार यांनी यामागे कोणते राजकारण आहे हे सध्या सांगता येणार नसले तरी संपूर्ण प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे स्पष्ट केले.Abdul Sattar
सत्तार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त करत, “देवेंद्रजी स्वतः कायद्याचे जाणकार आहेत. ते नियमांचा योग्य अभ्यास करून आम्हाला न्याय देतील, अशी अपेक्षा आहे,” असे म्हटले.Abdul Sattar
समीर सत्तारांचा अर्ज नेमका का बाद झाला?
निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या जागेच्या आधारे व्यवस्थापनाशी संबंधित पात्रता दाखवण्यात आली होती, ती जागा भाडेतत्त्वावर दिलेली असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्याआधारे समीर सत्तार यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला.
मात्र, या निर्णयावर आक्षेप घेत अब्दुल सत्तार म्हणाले की, संबंधित नियम त्यांना लागू होत नाही. नियम ५८ अंतर्गत सदस्यत्वाशी संबंधित अट चुकीच्या पद्धतीने लावण्यात आली आहे, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे केवळ तांत्रिक कारणावर उमेदवारी नाकारणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले.
“यामागे राजकारण आहे का?” सत्तारांचा सवाल
अर्ज बाद झाल्यानंतर सत्तार यांनी अप्रत्यक्षपणे राजकीय कटकारस्थानाची शक्यता व्यक्त केली. “यामागे नेमके कोणाचे राजकारण आहे, हे सध्या सांगणे योग्य ठरणार नाही. मात्र, संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर याबाबत भूमिका मांडू,” असे ते म्हणाले.
या संदर्भात ते लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून, अर्ज बाद करण्यामागील कारणांची सविस्तर माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रावसाहेब दानवेंनाही धक्का; संजना जाधव यांचा अर्जही बाद
या निवडणुकीत केवळ समीर सत्तार यांनाच धक्का बसलेला नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या तसेच कन्नडच्या शिवसेना आमदार संजना जाधव यांचाही उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे.
अर्जांमधील किरकोळ त्रुटींचा आधार घेत जाणीवपूर्वक उमेदवारी नाकारण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे हा मुद्दा आता केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता महायुतीतील अंतर्गत राजकारणाशी जोडला जाऊ लागला आहे.
महायुतीत नव्या वादाची चिन्हे?
समीर सत्तार आणि संजना जाधव या दोघांचेही अर्ज बाद झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील भाजप-शिवसेना संबंध पुन्हा चर्चेत आले असून, यामुळे स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि सत्तासंघर्ष उघड झाल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच विधान परिषद निवडणुकीतील नाराजीमुळे अब्दुल सत्तार चर्चेत आले होते. त्यानंतर आता मुलाचा अर्ज बाद झाल्याने त्यांच्या अडचणीत आणखी भर पडल्याचे मानले जात आहे.
८ जुलैला मतदान
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी १ जून रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या निवडणुकीसाठी एकूण २१४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये अनेक विद्यमान आणि माजी मंत्री, आमदार, खासदार तसेच त्यांच्या वारसदारांचा समावेश होता.
छाननी प्रक्रियेनंतर अनेक अर्ज वैध ठरले असले तरी समीर सत्तार आणि संजना जाधव यांचे अर्ज बाद झाल्याने निवडणुकीत मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.
येत्या ८ जुलै रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीकडे आता केवळ सहकारी क्षेत्राची निवडणूक म्हणून नव्हे तर महायुतीतील अंतर्गत समीकरणांची चाचणी म्हणूनही पाहिले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App