मिलिंद देवरा, जितेन प्रसाद, ज्योतिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट हे एकेकाळी कॉंग्रेसची युवा ब्रिगेड, भविष्यातील नेतृत्त्व मानले जात होते. कॉंग्रेस सरकारच्या काळात त्यांना पक्षात आणि सत्तेतही स्थान देण्यात आले होते. मात्र 2014 नंतर सत्तेची कवचकुंडले जनतेने काढून घेतल्यापासून राहुल गांधी, प्रियकां रॉबर्ट वड्रा हे नेते फावल्या वेळेत कॉंग्रेस पक्ष चालवू लागले. त्यामुळे या तरुण नेत्यांना पक्षात अंधार दिसू लागला. त्यातूनच सिंधिया, प्रसाद यांनी पक्ष सोडला. पायलट, देवरा हेही कमालीचे नाराज आहेत. पक्षात राहूनच कॉंग्रेस पक्ष कधी सुधारणार अशी अपेक्षा देवरा व्यक्त करत आहेत. When will Rahul Gandhi’s Congress improve? Young turks like Jotiraditya Sindhiya, Jitin Prasad already left Congress, many more on the way; Milind Deora questioning anxiously
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे तरुण तुर्क जितेन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कॉंग्रेस पक्षात प्रचंड खळबळ माजली आहे. सोनिया गांधी या प्रकृती अस्वास्थ्यामुळे दैनंदिन पक्ष कार्यातून बाजूला होत असताना राहुल गांधी किंवा प्रियंका रॉबर्ट वड्रा हे गांधी घराण्यातील नेते सक्षमपणे पुढे येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कॉंग्रेसला भवितव्य नाही, या पक्षात राहून भविष्य नाही, असे तरुण नेत्यांना-कार्यकर्त्यांना वाटू लागले आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबईतील कॉंग्रेसचे तरुण नेते मिलिंद देवरा यांनी गंभीर मतप्रदर्शन केले आहे. देवरा म्हणाले की, भारताचा सर्वात मोठा राजकीय पक्ष या नात्याने कॉंग्रेसनेच पुन्हा आपली भूमिका पुन्हा स्वीकारली पाहिजे, असे देवरा यांनी सुचवले आहे. मात्र त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी राहुल किंवा प्रियंका दाखवणार का असा मोठा प्रश्न आहे. सन 2014 मध्ये सत्तेचे कवच गेल्यापासून हे दोन्ही नेते फावल्या वेळेत राजकारण, समाजकारण करत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मिलिंद देवरा यांनी आशा व्यक्त केली आहे की, अजूनही सशक्त व चांगल्या पद्धतीने पर्याय देण्याची ताकद कॉंग्रेसकडे आहे. मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष असलेल्या देवरा यांनी आशा व्यक्त केली की यासाठी माझ्या अनेक मित्रांनी आणि बहुमोल साथीदारांनी अजूनही कॉंग्रेसचा त्याग केला नसेल असे मला वाटते.
दरम्यान कॉंग्रेसमधून भाजपामध्ये आलेले तरुण नेते जितेन प्रसाद यांनी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे. येत्या 2022 मध्ये उत्तर प्रदेशातील निवडणूक आहे. त्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि भाजपाचे मुख्य प्रवक्ते अनिल बलूनी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडीवर व्यक्त होताना देवरा यांनी ट्वीट केले की, “कॉंग्रेसवर माझा विश्वास आहे. देशातला सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून कॉंग्रेसला पुन्हा पूर्वीचे स्थान पुन्हा मिळवून दिले पाहिजे.” मात्र देवरा यांचे हे ट्वीट निराशेतून आल्याचे सांगितले जाते. स्वतः देवरा यांना मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष असूनही पूर्ण स्वातंत्र्याने काम करता येत नसल्याची परिस्थिती आहे. स्थानिक कॉंग्रेस नेत्यांशी त्यांचा संघर्ष चालू आहे.
महाराष्ट्रातील तरुण कॉंग्रेस नेते राजीव सातव यांचे दुर्दैवी अकाली निधन नुकतेच झाले. त्यानंतर महाराष्ट्र कॉंग्रेसकडेही तरुण नेतृत्त्व नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पक्षात स्थान नसल्याचे चित्र आहे. केवळ धनिक आणि प्रस्थापित राजकारण्यांच्या नेत्यांनाच कॉंग्रेसमध्ये स्थान मिळत असल्याची नाराजी कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. एकीकडे पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात असे साठी ओलांडलेले नेते आहेत. कॉंग्रेसी तत्त्वे, मूल्ये पायदळी तुडवून महाराष्ट्राच्या सत्तेत शिवसेनेसोबत आघाडी केली खऱी पण सत्तेतही पक्षाला तिय्यम दर्जाचे स्थान आहे. कॉंग्रेसचे प्रमुख मंत्री सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकुर, नितीन राऊत ही सगळी मंडळी विदर्भातली आहेत. त्यामुळे सत्तेतले भागीदार असणाऱ्या आक्रमक राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्याशी स्पर्धा करत उर्वरीत महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष कसा वाढीस लागणार याची चिंता कॉंग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांना आहे. मात्र याकडे राहुल गांधी लक्ष द्यायला तयार नसल्याची त्यांची भावना झाली आहे. या पार्श्वभूमीवर देवरा यांचा आशावाद पोकळ असल्याचे मानले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App