विशेष प्रतिनिधी
संभाजी नगर : खवड्या डोंगर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कुणाल चांदगुडेच्या आठवणींनी त्याची मावस बहीण अक्षरा भावूक झाली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर अक्षराने कुणालसोबतच्या जुन्या आठवणींचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच कुणाल आणि त्याच्या कुटुंबीयांवर सोशल मीडियावर होत असलेल्या आरोपांवरही तिने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
‘नाही विसरू शकत रे तुला कोणी…’
अक्षराने कुणालसोबत एका लग्नाच्या कार्यक्रमात नृत्य करतानाचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टमधून तिने कुणालच्या आठवणींना उजाळा देत भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘नाही विसरू शकत रे तुला कोणी… माफ कर आम्हाला, तुला वाचवू शकलो नाही’, अशा आशयाची भावनिक प्रतिक्रिया तिने दिली आहे.
कुणालवर सोशल मीडियावर होत असलेल्या आरोपांवरही अक्षराने संताप व्यक्त केला. कुणाल तसा मुलगा नव्हता आणि त्याच्यावर केले जाणारे आरोप खोटे व घाणेरडे असल्याचा दावा तिने केला आहे.
नगरसेवक ते मुख्यमंत्री; ‘दबाव’ कसा हाताळतात? देवेंद्र फडणवीसांनी Gen Z ला सांगितला राजकीय प्रवासाचा किस्सा
‘आयफोन किंवा पैशांसाठी त्याने हे केलं नाही’
अक्षराच्या म्हणण्यानुसार, कुणालच्या आई-वडिलांनी लहानपणापासून त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. त्यामुळे आयफोन किंवा पैशांसाठी त्याने हे कृत्य केले, अशी चर्चा चुकीची असल्याचे तिने म्हटले आहे.
कुणालकडे स्वतःचा आयफोन 15 प्रो होता आणि त्याला पैशांची कधीच कमतरता नव्हती, असा दावा अक्षराने केला आहे. तसेच शेतीच्या वाटणीचा विषय आणि कुणालच्या वडिलांचा विषय वेगळा असल्याचेही तिने स्पष्ट केले.
‘कुणालला फक्त वडील पुन्हा जवळ हवे होते’
अक्षराने पुढे दावा केला की, कुणालला केवळ त्याचे वडील पुन्हा आपल्या जवळ हवे होते. मात्र, त्याच्या मनात त्याच्या आत्याने वडिलांना आपल्यापासून दूर केल्याची भावना होती, असे तिने म्हटले आहे.
‘गेल्या २० वर्षांत ज्यांनी कुणालला जवळ केले नाही, त्याच्याशी बोलले नाही, त्यांनी अचानक जवळ येण्याचा प्रयत्न का केला?’ असा सवालही अक्षराने उपस्थित केला. हा मुद्दा कुणाल आणि त्याची मावशी संगीता चांदगुडे यांना खटकत असल्याचा दावाही तिने केला.
कुणालच्या वडिलांबाबतही मोठा दावा
कुणालचे वडील मुरलीधर चांदगुडे यांच्याबाबत बोलताना अक्षराने त्यांच्या स्वभावाचे वर्णन केले. मुरलीधर काकांचा स्वभाव अत्यंत निर्मळ होता. कोणी त्यांच्याशी प्रेमाने आणि गोड बोलले, तर ते त्या व्यक्तीसाठी काहीही करण्यास तयार व्हायचे, असे अक्षराने म्हटले आहे.
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर शेअर केलेल्या या भावनिक व्हिडिओच्या माध्यमातून अक्षराने कुणालच्या आठवणी जपल्या आहेत. तसेच कुणालवर कोणतेही खोटे किंवा आधारहीन आरोप करू नयेत, अशी भावनिक विनंतीही तिने केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App