काँग्रेसने आपल्या २०१९ च्या लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम १२४ अ रद्द करणार म्हणून जाहीर केले होते. गंमत म्हणजे आज तीच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सत्तेत असलेल्या आघाडी सरकारने अमरावतीचे आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांना अटक करून तेच बदनाम राजद्रोहाचे कलम १२४ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे… Did the Rana couple really commit ‘treason’ ..?
महेश वैद्य
तुम्हाला जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, दिल्ली मधील त्या घोषणा आठवतात का? त्याच “भारत तेरे तुकडे होंगे”, “अफजल हम शर्मिदा है, तेरे कातील जिंदा है” त्या नंतर प्रकाशात आलेले कन्हैय्या कुमार, उमर खालिद आणि शेहला राशीद ! त्या नंतर गाजलेले “आझादी” च्या घोषणा ! डफली हातात घेऊन घोषणा देणारा “कन्हैय्या कुमार” ! डाव्या विद्यार्थी संघटनेचा नेता, तत्कालीन काळात समस्त विरोधकांच्या काळजाचा तुकडा झाला होता. जे एन यु मधील वर सांगितलेल्या घटनेनंतर या कन्हैय्या कुमार याच्यावर केंद्र सरकारने जे राजद्रोहाचे कलम लावले होते ते होते “कलम १२४ अ” ! या नंतर या कलमाच्या विरोधात समस्त विरोधी पक्ष विशेषतः डाव्या विचारांचे पक्ष आक्रमक झाले होते.
काँग्रेसने आपल्या २०१९ च्या लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम १२४ अ रद्द करणार म्हणून जाहीर केले होते. गंमत म्हणजे आज तीच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सत्तेत असलेल्या आघाडी सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर “हनुमान चालीसा” म्हणायचा प्रयत्न केला म्हणून अमरावतीचे आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांना अटक करून तेच बदनाम राजद्रोहाचे कलम १२४ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तेव्हा विरोध करणारे नेते सध्या तोंडात माणिकचंद टाकून बसले आहेत. इतकेच नाही तर कन्हैय्या कुमार, बंगलोर मध्ये सी ए ए विरोधातील ओवेसी यांच्या रॅली मध्ये मंचावरून “पाकिस्थान जिंदाबाद” च्या घोषणा देणारी अमूल्या लियोना, मग शेतकरी आंदोलनाच्या वेळेस असेच देशविरोधी ट्विट असलेली सामुग्री वितरित केल्या बद्दल दिशा रवी, महाराष्ट्रातील पुणे येथे झालेली “एल्गार परिषद” त्या नंतर उसळलेली दंगल. या अनुषंगाने “शहरी नक्षली” यांना झालेली अटक याच कलमाखाली झाली आहे. जे एन यु प्रकरणात कन्हैय्या कुमार याचा मित्र उमर खालिद वर अमरावती येथे असेच देशविरोधी भावना भडकवण्याचे भाषण दिल्याबद्दल हेच कलम लागू आहे. ही यादी खूप मोठी आहे.
वरील सगळ्या प्रकरणाच्या वेळेस केंद्र सरकारने १२४ अ कलमाचा वापर केला म्हणून काँग्रेस सकट सगळ्याच विरोधी पक्षांनी आदळआपट केली आहे. विशेषतः भारतातील डाव्या पक्षांनी. याच डाव्या विचारांच्या द वायर, द प्रिंट, द हिंदू सारख्या देशी, तर बी बी सी सारख्या आंतराष्ट्रीय वृत्तपत्र आणि वाहिन्यांनी हा कायदा कसा चुकीचा आहे यावर भरभरून लिहले आहे. आज तेच वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या मात्र राणा दाम्पत्यावर लागलेले राज्यद्रोहाचे कलम का योग्य आहे हे आडून आडून सांगायचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा हे कलम नक्की काय आहे ते समजून घ्या ! हे कलम रद्द केले तर काय? आणि नाही केले तर काय? हे पण आपल्याला समजून घ्यावे लागेल.
कलम १२४ अ मुख्यतः हे “देशद्रोह” म्हणून वापरात येणारे एकमेव कलम नाही. तर भारतीय दंड विधान मधील प्रकरण ६ मध्ये कलम १२१, १२१ अ, १२२, १२३, १२४, १२४ अ, १२५, १२६, १२७, १२८, १२९ आणि १३० इतक्या कलमात देशाविरुद्ध कारस्थान केले तर शिक्षा होऊ शकते.
कलम १२१, १२१ अ, १२२, १२३ ही कलमे देशा विरोधात युद्ध पुकारणे किंवा त्या साठी मदत करणे, या कामासाठी पैसा, दारुगोळा लपवणे किंवा देशा विरोधात युद्ध करण्याची योजना लपवणे अशी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात.
यातील कलम १२५ नुसार तर भारताचे मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या कोणत्याही एशियायी सत्तेविरुद्ध भारताच्या भूमीचा वापर करणे किंवा या सत्तेविरुद्ध लढाईत भाग घेणे हा गुन्हा आहे. तर कलम १२६ नुसार भारताचे ज्या देशांशी शांततेचे संबंध आहेत त्या देशात खून, दरोडा, लूटमार आदी करणे किंवा तशी योजना आखली तरी शिक्षा होऊ शकते.
पण या प्रकरणातील कलम १२४ अ सगळ्यात जास्त बदनाम आणि जुने म्हणजे ब्रिटिश राजवटी पासून आजच्या सरकार पर्यंत सगळ्यांनी या कलमाचा उपयोग किंवा दुरुपयोग केला आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पासून गीतकार मझजर सुल्तानपुरी ते व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी पर्यंत सगळ्यांवर या कलमाचा वापर झाला आहे.
हे कलम म्हणते, जो कोणी भारतामध्ये कायदेशीर स्थापन झालेल्या शासनाबद्दल द्वेषाची किंवा तुच्छतेची भावना निर्माण करतो अगर तसा प्रयत्न करतो. अगर अप्रीतीची भावना चेतवितो, अगर प्रयत्न करतो. त्याकरिता तोंडी किंवा लेखी शब्दांमार्फत अथवा खुणांमार्फत अगर दृश्य देखाव्यामार्फत अथवा अन्य मार्गांचा वापर करतो- तर त्याला आजन्म कारावासाची शिक्षा होईल आणि सोबत द्रव्यदंड पण लादता येईल अगर तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही कारावासाची शिक्षा होईल.
या व्यतिरिक्त पण व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्वे २०१५ या वर्षी हे कलम लावतांना आखून दिली आहे. तसे परिपत्रक प्रत्येक राज्याला आपल्या पोलीस दलाला देण्यास सांगितले आहे आणि त्याची अमलबजावणी योग्य प्रकारे होईल याची काळजी घेण्याचे यात म्हंटले आहे. या नुसार २७ ऑगस्ट २०१५ रोजी काढलेल्या महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक क्रमांक फौरिया ०४१५/१२७२/प्र.क्र.६३/वी शा १ अ नुसार ती मार्गदर्शक तत्वे खालील प्रमाणे आहेत.
इतके स्पष्ट निर्देश या कलमात असतांना या कलमाच्या विरोधात आक्षेप का? तर या कलमात असलेल्या अभिप्रेत “देशद्रोह” या संकल्पनेत “देश” न म्हणता “शासन” असे म्हंटले आल्यामुळे अनेक केंद्र आणि राज्य शासनाने अनेकदा या कलमाचा दुरुपयोग केल्याचे या कलमाच्या विरोधकांचे म्हणणे आहे.
अर्थात या कलमाचा दुरुपयोग अनेक राज्यांनी केला आहे. व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी प्रकरणात तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात प्रकाशित केलेल्या व्यंगचित्रामुळे राज्यद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रकरणात मग सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे लागू केली हे वर सांगितले आहेच. मात्र त्याच बरोबर भारतीय न्यायव्यवस्थेने चुकीच्या पद्धतीने लावलेले हे १२४ अ कलम रद्द पण केले आहे आणि केंद्र – राज्य सरकारचे वाभाडे पण काढले आहे. तेव्हा आता तुम्ही ठरवा की आता राणा दाम्पत्यावर लावलेले हे कलम बरोबर आहे का? नसेल कळत तर थोडी कळ काढा बस…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App