मुंबईमध्ये शिवसेना आणि कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र लढल्यामुळे प्रचंड तोटा होण्याची शक्यता कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. मात्र, या दोन्ही पक्षांचे खच्चीकरण होऊन मुंबईत बेदखल असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला आघाडी करुन लढण्यातच रस आहे. यामुळे शिवसेना आणि कॉंग्रेसची ताकद असलेल्या मुंबईत पाय ठेवायला तरी जागा मिळेल असा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा होरा आहे. त्यासाठी मुंबईत आघाडी करण्याची तयारी राष्ट्रवादीने दाखवली आहे. कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मात्र यातला धोका स्पष्टपणे जाणवत असल्याने त्यांचा तीव्र विरोध सुरु झाला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत शिवसेना आणि कॉंग्रेस एकत्र लढल्यामुळे दोन्ही पक्षांचा प्रचंड तोटा होण्याची शक्यता कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. मात्र, या दोघांचे खच्चीकरण होऊन मुंबईत आपल्याला पाय ठेवायला जागा मिळावी यासाठीच राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तीनही पक्षांच्या आघाडीतर्फे एकत्रित निवडणूक लढविण्याची तयारी केली जात आहे. याला शिवसैनिकांचा कडवा विरोध आहे.
Mumbai Municipal Corporation ncp shivsena congress news
मुंबई महापालिकेत शिवसेना आणि कॉंग्रेसची किमान ताकद आहे. काही अधिकार आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसल औषधालाही नाही. त्यामुळे आघाडी झाली तर आपल्या पदरात काहीतरी पडेल अशी आशा राष्ट्रवादीला वाटत आहे. परंतु, शिवसेनेला जागा वाटपात अडचण आहे. त्यांना दोन्ही पक्षांसाठी जागा सोडाव्या लागणार आहे. शिवसेनेशी युती केल्यामुळे मुस्लिम मते आपल्यापासून दूर जातील. त्याचा फायदा एमआयएमआयला होईल, असे कॉंग्रेसला वाटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र तिन्ही पक्ष एकत्र आल्यास कधी नव्हे ते मुंबईमध्ये पक्ष वाढण्याची आशा असल्याने त्यांना स्थानिक पातळीवरची ही आघाडी हवी आहे.
शिवसेनेला ही निवडणूक एकत्रितपणे लढविणे तेवढे सोयीचे ठरणार नसल्याचे शिवसेनेचे नेते खासगीत सांगत आहे. मुंबई महापालिकेवर भगवाच फडकला पाहिजे, यासाठी आग्रही असणारी शिवसेना विनाकारण मुंबईची सत्ता वाटून घेणार नाही. एकत्रित निवडणुका लढवायच्या झाल्यास शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जागा सोडाव्या लागणार आहेत. जास्तीत जास्त जागा लढवून, जास्तीत जास्त जागा जिंकण्याची रणनिती आखणाऱ्या शिवसेनेला हे कधीही परवडणार नाही, त्यामुळे जागवाटपाचे त्रांगडे शक्यता टाळण्यावर शिवसेनेचा भर राहील.
काँग्रेसच्या मुंबईतील स्थानिक नेत्यांनाही शिवसेनेसोबतच्या मुंबई पातळीवरील आघाडीत फारसा रस नाही. गेल्या काही वर्षात एमआयएमने मुस्लिम समाजामध्ये आपले स्थान भक्कम करायला सुरूवात केल्याचे काही निवडणूक निकालांवरून स्पष्ट होत आहे. अशावेळी मुंबईत महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेसोबत आघाडी केल्यास मुंबईत मोठ्या संख्येने असलेल्या मुस्लिम समाजाकडे कोणत्या तोंडाने मते मागायला जायचे असा प्रश्न या नेत्यांना भेडसावत आहे. राज्यात आपण विधानसभा निवडणुकानंतर एकत्रित आलो असून पुढच्या विधानसभा निवडणुकांना अजून अवकाश आहे. मात्र, आताच आपण आघाडी करून स्थानिक पातळीवरच्या निवडणुका लढविल्या तर त्याचा राजकीय फायदा एमआयमला मिळेल अशी त्यांना भिती वाटते.
मुंबई महापालिकेत जेमतेम ८ नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र, मुंबई महापालिका निवडणूक आघाडीने एकत्रित लढविल्यास सर्वाधिक फायदा होईल असे वाटते. गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिका निवडणूक गांभीर्याने लढवत असला तरी त्यांना म्हणावे तसे यश मिळत नाही. मात्र, यावेळी शिवसेनेच्या मदतीने आपल्याला चांगले यश मिळू शकते अशी अटकळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांनी बांधली आहे. त्यामुळे मुंबईत महापालिका निवडणुकीत आघाडी व्हावी यासाठी त्यांच्या नेत्यांनी आग्रह धरला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App