इंदापुरचे आमदार म्हणून एक भूमिका आणि सोलापुरचे पालकमंत्री म्हणून दुसरी भूमिका असा दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर होत होता. उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी बारामती आणि इंदापुर तालुक्याकडे वळवण्याचा बेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आखला होता. मात्र त्यास सोलापुरातून जोरदार विरोध झाला. अखेरीस राज्य सरकारला सोलापुरकरांच्या एकजुटीपुढे झुकावे लागले आणि हा निर्णय शेवटी झालाच. Withdrawal of NCP ministers in front of Solapurkar’s unity, Proposal of diverting of 5 TMC water from Ujanai Dam towards Baramati, Indapur scrapped
विशेष प्रतिनिधी
पुणे : उजनी धरणातून बारामती-इंदापुरसाठी पाच टीएमसी वळवण्यासाठीचा आदेश राज्य सरकारने गुरुवारी (दि. 27) रद्द केला. गेल्या आठ दिवसांपासून या निर्णयाची प्रतिक्षा सोलापूर जिल्ह्याला होती.
उपसचिव वैजनाथ चिल्ले यांनी जलसंपदा विभागाच्या कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना या संदर्भातला आदेश दिला. त्यानुसार उजनी जलाशयाच्या ऊर्ध्व बाजूस बिगरसिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयातून उचलून नवीन मुठा उजवा कालव्यात सोडण्याबाबतचा शासनाचा २२ एप्रिल २०२१ चा आणि समकक्ष असणारे इतर आदेश रद्द करण्यात आले.
दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यासाठी बांधण्यात आलेल्या उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी इंदापूर आणि बारामती या तालुक्यांसाठी वळवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारने चालू केला होता. बारामती आणि इंदापुरात अनुक्रमे अजित पवार आणि दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आहेत. तर भरणे यांच्याकडे राज्यमंत्रीपद आणि सोलापुरचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे. शिवाय राज्याचा जलसंपदा विभागही राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांकडे आहे. त्यामुळे सोलापुरच्या दुष्काळी जनतेसाठीचे पाणी पळवण्याचा डाव राष्ट्रवादी कॉंग्रेसने आखला असल्याची टीका होऊ लागली होती. यामुळे सोलापूर जिल्ह्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला. सत्ताधारी असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्याच सोलापुरातील लोकप्रतिनिधींनी जनरेट्यामुळे सरकारविरोधी भूमिका घेतली. भाजपानेही जोरदार आंदोलन उभे केले होते. यापुढे सरकारला माघार घ्यावी लागली.
इंदापुर तालुक्यातून ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करुन दत्तात्रय भरणे निवडून आले. इंदापुर तालुक्याला पाणी देण्याचे आश्वासन त्यांनी निवडणुकीत दिले होते. त्यानुसार राज्यमंत्री झाल्यावर त्यांनी उजनीतूनच पाणी वळवण्याचा प्रयत्न केला. भरणे यांच्याकडे सोलापुरचेही पालकमंत्रीपद आहे. त्यामुळे सोलापुरकरांनी केलेल्या विरोधाची दखल त्यांना घ्यावी लागली. खडकवासला कालव्यावर इंदापुर तालुक्यातील 36 गावांचा आणि नीरा डावा कालव्यावर 22 गावांचा पाणी प्रश्न अवलंबून आहे. उजनीवरील उपसा सिंचनाला मंजुरी मिळाल्याने या गावांचा प्रश्न सुटण्याची चिन्हे होती. मात्र तसे न झाल्याने आमदार भरणे यांची स्वतःच्या मतदारसंघात कोंडी झाली आहे.
इंदापूर तालुक्याला दर उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न भेडसावतो. नवीन उपसा सिंचनामुळे शेटफळगढे पासून बेडशिंगेपर्यंत सुमारे ३६ गावातील क्षेत्र बारमाही ओलिताखाली येण्याची शक्यता होती. खडकवासला कालव्यावरुन सणसर जोड कालव्यामधून 22 गावांना पाणी देण्यासाठी अनेक वर्षे संघर्ष झाला आहे. अनेकदा आंदोलने झाली. मात्र पुण्याची लोकसंख्या सातत्याने वाढत गेल्याने पुण्याची पिण्याच्या पाण्याची तसेच औद्योगिक गरज दरवर्षी वाढत चालली आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीवरील पाण्याचा ताण वाढला आहे. परिणामी या धरणसाखळीतून शेतीला मिळणारे पाणी दिवसेंदिवस कमी होत चालले आहे.
दरम्यान, अनेक वर्षे पुणे जिल्ह्याचे नेतृत्त्व करणाऱ्या शरद पवार, अजित पवार या बड्या नेत्यांना पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणी वापरासंदर्भात गांभीर्याने काम करण्यात अपयश आले आहे. आजही पुणे आणि पिंपरी-चिंचवड या मोठ्या महापालिकांमधून बहुतांश सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीमार्गे उजनी धरणात येते. या दोन्ही शहरातील सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया झाल्यास पुणे जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना पाणी देता येऊ शकते. यामुळे उजनी धरणावरील ताणही कमी होणार आहे. मात्र हा मुद्दा पवारांनी आजवर धसास लावलेला नाही. परिणामी पाण्याची कमतरता वाढत असून त्याला जिल्हास्तरीय संघर्षाचे स्वरुप येऊ लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App