पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोल्हापुरातल्या आजच्या सभेनंतर कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी न ठेवता ती मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी करण्यात महायुतीचे नेते आज यशस्वी झाले.Kolhapur battle turned into Modi V/S Rahul, than shahu maharaj V/S Mandlik
महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि सगळ्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोल्हापूरच्या सभेचे अशाप्रकारे नियोजन आणि आयोजन केले की, त्यामुळे शाहू महाराजांना काँग्रेसच्या हाताचा पंजा या चिन्हावर निवडणूक लढवायला भाग पाडणाऱ्या शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या मनसूब्यावर महायुतीच्या नेत्यांना मात करता आली.
कोल्हापूरच्या गादीचे वारसदार शाहू महाराजांना काँग्रेसच्या तिकिटावर उभे केले की महायुतीच्या नेत्यांना त्यांच्या विरोधात प्रचार करताना अडचण होईल, त्यांची कुचंबणा होईल, शाहू महाराजांविरुद्ध प्रचार करायला महायुतीच्या नेत्यांना कुठलाही मुद्दाच मिळणार नाही, असा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा होरा होता. शाहू महाराज यांनी देखील पवार – ठाकरे यांना होकार भरत वयाच्या 75 व्या वर्षी कोल्हापुरातून आपली उमेदवारी काँग्रेसच्या तिकिटावर जाहीर करून घेतली. प्रचारात सुरुवातीला त्यांनी मोठी आघाडी देखील घेतली. परंतु कोल्हापूरची निवडणूक कोल्हापूरची गादी विरुद्ध शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीचा उमेदवार अशी करण्यात महाविकास आघाडीचे नेते कमी पडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोल्हापूरच्या आजच्या सभेचे नियोजन महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि सर्व नेत्यांनी आधीपासून सुरू करून त्याची मोठी वातावरण निर्मिती केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व आमदार खासदारांना त्यासाठी टार्गेट देऊन कामाला लावले चंद्रकांतदादा पाटील, धनंजय महाडिक, प्रकाश आबीटडकर, प्रकाश आवाडे, राजेश क्षीरसागर, उदय सामंत हे सगळे नेते अत्यंत ग्राउंड लेव्हल वर जाऊन काम करत होते आणि त्यांनी कोल्हापूरची लढाई टप्प्याटप्प्याने शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी न ठेवता ती मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी वळवण्याचा प्रयत्न चालविला. तो प्रयत्न टप्प्याटप्प्याने यशस्वी होत गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर कळस चढविला.
कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून “मान देऊन गादीला, पण मत देऊ मोदीला” अशी घोषणा सर्वत्र फिरायला सुरवात झाली. सोशल मीडियामध्ये त्या घोषणेने धुमाकूळ घातला. महायुतीचे नेत्या कार्यकर्त्यांनी घराघरांमध्ये जाऊन त्याच घोषणेचा प्रचार केला. मोदींच्या आजच्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच घोषणेचा पुनरुचार केला. “मान देऊन गादीला, पण मत देऊ मोदीला” घोषणा त्यांनी जनतेकडून करवून घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील व्यासपीठावरून त्याच घोषणेला दुजोरा दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सगळ्या भाषणाचा रोख केंद्र सरकारची कामगिरी, काँग्रेसच्या जाहीरनामा, वारसा हक्क संपत्ती, महिलांचे मंगळसूत्र हिरावून घेण्याचा काँग्रेसचा डाव, जम्मू-काश्मीर मधले 370 कलम, विरोधकांनी राम मंदिराचे निमंत्रण धुडकावणे यावर ठेवला. कोल्हापूरच्या सगळ्या विकास कामांचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. फुटबॉल प्रेमी कोल्हापूरकरांना मोदींनी फुटबॉलच्या परिभाषेत आपल्या विजयाचा फॉर्म्युला समजावून सांगितला. लोकसभा निवडणुकीतले पहिले दोन टप्प्यांमधले मतदान झाले आहे. या दोन्ही टप्प्यांमध्ये भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी 2 – 0 अशा फरकाने आघाडीवर असल्याचे मोदींनी सांगितले.
छत्रपती शिवाजी, महाराज राजर्षी शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना मोदींनी वंदन केले, पण कोल्हापूरचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांचे नाव देखील मोदींनी आपल्या भाषणात घेतले नाही. त्यामुळे कोल्हापूरची लढाई काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज विरुद्ध शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक अशी न राहता ती लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी वळविण्यात महायुतीचे सगळे नेते पूर्ण यशस्वी झाल्याचे चित्र पंतप्रधान मोदींच्या सभेनंतर निर्माण झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App