आक्रस्ताळ्या राजकारणासाठी प्रसिद्ध ममता बॅनर्जी यांनी चिनी विषाणूच्या महामारीतही हा अवगुण कायम राखला आहे. चिनी विषाणूच्या प्रादुर्भावाची माहिती घेण्यासाठी कोलकात्याला पोचलेल्या केंद्रीय पथकाला मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्या सरकारने कोणतेही सहकार्य केलेच नाही. राज्याला मदत करण्यासाठी पाठवलेल्या पथकाची कोंडी करायची आणि दुसरीकडे केंद्र राज्याला पुरेशी मदत देत नसल्याचा कांगावा करायचा, असे राजकारण बॅनर्जींना खेळायचे असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारला मदत करण्यासाठी कोलकात्यात पोहोचलेल्या केंद्रीय पथकाला बॅनर्जी सरकारच्या असहकाराचा सामना करावा लागला आहे. कोणतीही माहिती न देणे, साधने न पुरवणे एवढेच नव्हे तर निवासस्थानाहून बाहेर न पडू देणे असे प्रकार या पथकाच्या बाबतीत घडले.
वरिष्ठ आयएएस अधिकारी अपूर्व चंद्रा यांच्या नेतृत्वाखालील आंतरमंत्रालयीन संघाने निदर्शनास आणून दिले की या पथकाच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांनी दौऱ्याच्या सुरूवातीलाच सांगितले की परवानगीशिवाय गेस्ट हाऊसबाहेर जाऊ नये.
गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली की, “केंद्रीय पथक बहुतेक बीएसएफच्या गेस्ट हाऊसमध्ये अडकले आहे. गृहमंत्री अमित शहा यांना याची माहिती देण्यात आली असून राज्यांना मदत करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना कसे अडथळे आणले जात आहेत, हे त्यांच्या कानावर घालण्यात आले आहे. यामुळे अमित शहा नाराज असल्याचे समजते.
अपूर्व चंद्रा यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला सांगितले की बंगालमधल्या पाच दिवसांच्या वास्तव्यात त्यांना केवळ तीन रुग्णालये आणि एका केंद्रावर एवढ्याच भेटी देता आल्या.
अपूर्व चंद्रा यांच्या नेतृत्वाखालील केंद्राने सात राज्यांना मदत करण्यासाठी गट स्थापन केले आहेत. ज्या दिवशी केंद्राने अपूर्व चंद्राच्या टीमला बंगालला भेट देण्यास सांगितले, त्याच दिवशी त्यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथे जाण्यासाठी दुसरे संघ स्थापन केले होते. शुक्रवारी गुजरात, तेलंगणा आणि तामिळनाडू येथे जाण्यासाठी आणखी पथके तयार करण्यात आली.
केंद्रीय पथके पाठवण्याचा निर्णय झाल्यानंतरच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याकडे संशयाच्या नजरेने पाहिले. केंद्राने राज्य निवडण्यासाठी कोणते निकष वापरले, असा प्रश्न करुन शंका निर्माण केली. दरम्यान, बंगाल सरकार चिनी विषाणूच्या प्रादुर्भावाची सत्यस्थिती लपवत असल्याचा आरोप बंगाली नागरिकच करु लागले आहेत.
राज्यात मोठ्या संख्येने लोक चिनी विषाणूचे बळी ठरत असताना ममता बॅनर्जी मात्र राजकारण खेळण्यात दंग आहेत. केंद्र सरकार सातत्याने बॅनर्जी सरकारशी पत्र व्यवहार करत आहे. मात्र त्यासही बॅनर्जी सरकारकडून प्रतिसाद दिला जात नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App