विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली / संयुक्त राष्ट्र संघ : “नमस्ते फ्रॉम भारत” असे म्हणत परराष्ट्रमंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या 78 व्या आमसभेत महिला आरक्षणाचा डंका वाजविला. भारताच्या वतीने जयशंकर यांनी काम सभेत किनोट ऍड्रेस स्वरूपात भाषण केले. यावेळी प्रथमच भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आपल्या देशाचा उल्लेख “भारत” असा केला. आतापर्यंत संयुक्त राष्ट्रसंघात अथवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचा उल्लेख “इंडिया” असा केला जायचा, तो भारताने g-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने बदलला आणि आज संयुक्त राष्ट्रसंघातही तो कायम ठेवला. namaste from bharat s jaishankar in UNO
जी 20 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर “द प्राईम मिनिस्टर ऑफ भारत” असे लिहिले होते, तसेच त्याआधी राष्ट्रपतींसमोर “द प्रेसिडेंट ऑफ भारत” असेही लिहिले गेले होते. आज संयुक्त राष्ट्र संघात जयशंकर यांनी भाषणाची सुरुवात करतानाच “नमस्ते फ्रॉम भारत” अशी केली.
संयुक्त राष्ट्रसंघात राष्ट्रभाषा हिंदीतून भाषण करण्याची प्रथा 1977 मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी सुरू केली. त्यांनी पंतप्रधान पदावरूनही संयुक्त राष्ट्र संघाला अनेकदा हिंदीतूनच संबोधित केले, पण त्यावेळी त्यांनी देशाचा उल्लेख “इंडिया” असाच केला होता. आज जयशंकर यांनी भाषण इंग्लिश मधूनच केले, पण भाषणाची सुरुवात मात्र “नमस्ते फ्रॉम भारत” या शब्दांनी केली. हे त्यांच्या भाषणाचे वेगळे वैशिष्ट्य ठरले.
त्याचबरोबर त्यांनी भारतातल्या लोकशाही व्यवस्थेचा उल्लेख करताना 33 % महिला आरक्षण विधेयक संमत केल्याचाही गौरवपूर्ण उल्लेख केला. भारत ही लोकशाही राज्यव्यवस्थेची जननी आहे. भारतात महिलांना कायमच अव्वल स्थान दिले आहे. आधुनिक लोकशाही राष्ट्रात लोकप्रतिनिधित्वाचा रूपाने 33% आरक्षण देणारे भारत हे सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र ठरले आहे, असे जयशंकर म्हणाले.
काही विशिष्ट प्रगत राष्ट्रांनी संपूर्ण जगाच्या अजेंडा ठरवायचा आणि बाकीच्या राष्ट्रांनी त्यांना फॉलो करायचे हे दिवस आता सरले. ते इतिहासजमा झाले. आता सर्वांना समान न्याय देऊन एकत्रित पुढे घेऊन जाणारी भूमिकाच सर्वमान्य होईल, अशा परखड शब्दांमध्ये जयशंकर यांनी विकसित देशांना सुनावले.
जी 20 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने सर्वसमावेशी भूमिका घेतली आणि त्याला सर्व जगाने मान्यता दिली. आज जगात पूर्व – पश्चिम असे ध्रुवीकरण आणि उत्तर – दक्षिण भेदभाव वाढला असताना भारताची सर्वसमावेशी भूमिकाच संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरेल, याचा उल्लेखही जयशंकर यांनी आवर्जून केला, पण “नमस्ते फ्रॉम भारत” आणि ते 33 % महिला आरक्षणाचा गौरवपूर्ण उल्लेख हेच त्यांच्या भाषणातले सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App