विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकालात नव्या संसदेच्या लोकसभेत गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मांडलेले 33% महिला आरक्षण विधेयक लोकसभेत एकमताने मंजूर होणे अपेक्षित असताना त्यावर मतदान झाले. 454 विरुद्ध 2 मतांनी हे विधेयक संमत झाले. या विधेयकावरच्या चर्चेत सर्व पक्षांच्या 60 सदस्यांनी सहभाग घेतला. काँग्रेसने आपली मूळ भूमिका बदलत आरक्षणात आरक्षण म्हणजे ओबीसी, दलित कोटा मागितला. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस सह कोट्यात कोटा मागणाऱ्या सर्व सदस्यांना उदाहरणांसह धुतले. 33% Women’s Reservation Bill passed in Lok Sabha
ऐतिहासिक महिला विधेयकाचे श्रेय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राजीव गांधींना दिले, पण त्याच वेळी त्यांनी काँग्रेसची मूळ भूमिका बदलून ओबीसी अल्पसंख्यांक दलित असा कोटा मागितला. तृणमूळ काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मुस्लिम महिलांसाठी वेगळा कोटा मागितला.
सोनिया गांधींसह अनेक सदस्यांनी 33 % महिला आरक्षण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अंमलात आणण्याचे आवाहन केले. त्यात प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादीसह विविध विरोधी पक्षांच्या खासदारांचा समावेश होता. पण विरोधकांच्या या आवाहनातले कायदेशीर पेचाचे आव्हान कायदे राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी उधळून लावले. आज तुम्ही कोट्या अंतर्गत कोटा मागाल, पण हे विधेयक संमत होताच सुप्रीम कोर्टात जाऊन एखाद्या एनजीओ मार्फत त्यात आडकाठी आणाल. कारण मतदारसंघाचे फेररचना आणि संख्या निश्चित झाल्याशिवाय हे आरक्षण लागूच करता येणार नाही. कारण ही घटनात्मक तरतूद आहे. त्यामुळे महिला आरक्षण कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा विरोधकांचा डाव सरकारने ओळखूनच कायद्याच्या कसोटीवर टिकणारे 33% महिला आरक्षण दिले आहे, असे अर्जुन राम मेघवाल यांनी स्पष्ट केले.
गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात अनेक सदस्यांनी जे उल्लेख केले होते, त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले. ज्या बाबासाहेबांनी घटना लिहिली सर्व भारतीयांना मतांचा अधिकार दिला त्या बाबासाहेबांना काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत पराभूत केले होते, याची आठवण करून देताना त्यांनी राहुल गांधींचे नाव घेतले. राहुल गांधींना भाजपच्या उमेदवाराने अमेठीत पराभूत केले, तसेच डॉक्टर आंबेडकरांना काँग्रेसच्या उमेदवाराने लोकसभा निवडणुकीत पराभूत केले होते, असे सांगताच काँग्रेस सदस्य अस्वस्थ झाले.
आज महिला आरक्षणात जे ओबीसी कोट्याची बात करत आहेत, त्यांनी कधीच ओबीसी नेत्यांना महत्त्व दिले नाही. भाजपने ओबीसी नेत्याला पंतप्रधान केले. ओबीसी समाजातल्या 27% पेक्षा जास्त लोकप्रतिनिधींना मंत्री केले. आमदार – खासदार केले. अन्य कोणत्याही राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजपच्या ओबीसी आमदार – खासदारांची संख्या कितीतरी अधिक असल्याची आठवण अमित शाह यांनी आकडेवारीसह करून दिली.
अर्जून राम मेघवाल यांनी त्याच्या पुढे जाऊन डॉ. आंबेडकर भंडारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवू इच्छित होते, पण तिथे देखील काँग्रेसच्या उमेदवाराने त्यांना पराभूत केले, असे सांगितले. आंबेडकरांच्या संसदीय कारकीर्दीत कोणी कसे अडथळे आणले याचे सगळे पुरावे आपल्याकडे आहेत, असे ते म्हणाले.
अमित शाह आणि अर्जुन राम मेघवाल यांच्या भाषणांनंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संबंधित विधेयक मतदानाला टाकले आणि ते 454 विरुद्ध 2 एवढ्या प्रचंड बहुमताने संमत झाले. मोदी सरकारला हे विधेयक एकमताने संमत करून घ्यायचे होते परंतु ते विरोधकांनी साध्य होऊ दिले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App