विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात ‘रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयांमध्ये ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ आयोजित करण्यासंदर्भात बैठक झाली. यावेळी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच संबंधित विभागांचे सचिव आणि अधिकारी उपस्थित होते.
पदवीसोबत रोजगाराभिमुख कौशल्येही आवश्यक
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्यातील विद्यार्थ्यांना केवळ पदवीचे शिक्षण देणे पुरेसे नाही, तर त्यांच्यामध्ये रोजगाराभिमुख कौशल्ये विकसित होणे आवश्यक आहे. उद्योग क्षेत्राच्या गरजा आणि विद्यार्थ्यांकडील कौशल्ये यांची योग्य सांगड घालण्यासाठी महाविद्यालयांनी उद्योग, कंपन्या आणि उद्योजकांशी समन्वय वाढवावा.
यासाठी महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगार मेळावे आयोजित करावेत आणि ‘रोजगार महाकुंभ’सारख्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
एकाच ठिकाणी कंपन्या आणि रोजगाराच्या संधी
‘रोजगार महाकुंभ’च्या माध्यमातून एकाच ठिकाणी विविध कंपन्या, उद्योग आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे तरुणांना कंपन्यांच्या प्रतिनिधींसमोर थेट मुलाखत देण्याची संधी मिळू शकते. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचण्यासोबतच त्यांच्या कौशल्य आणि पात्रतेनुसार योग्य रोजगार मिळण्यास मदत होणार आहे.
महाविद्यालयांनी आपल्या परिसरातील उद्योगांची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि रोजगार मेळावे नियमितपणे आयोजित करावेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुणांना रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शिक्षणसंस्था आणि उद्योग क्षेत्राने एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
अधिकाधिक महाविद्यालयांनी सहभागी व्हावे
‘रोजगार महाकुंभ’ हा राज्यातील तरुणांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रभावी माध्यम ठरू शकतो. या उपक्रमामुळे युवकांना त्यांच्या कौशल्यांनुसार रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल.
त्यामुळे राज्यातील अधिकाधिक महाविद्यालयांनी ‘रोजगार महाकुंभ’मध्ये सहभागी होऊन तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण कराव्यात, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App