विशेष प्रतिनिधी
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत कंबर जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 100 – 100 – 80 – 8 असा फॉर्म्यूला ठरल्याची चर्चा आहे. हा फॉर्म्युला शरद पवारांनी ( sharad Pawar ) पुढे आणल्याचे सांगितले जात आहे. पण हा फॉर्म्युला पुढे आणून ठाकरेंचे (Uddhav Thackeray) महत्त्व वाढवून पवारांनी काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट प्रत्येकी 100 जागा लढणार. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाटी 80 जागा सोडल्या जाणार. इतर छोट्या घटक पक्षांना 8 ते 12 जागा देण्यावर सहमती झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे ज्याच्या जास्त जागा निवडून येतील, त्याचा मुख्यमंत्री!! असंही ठरलंय. मविआत वाद टाळण्यासाठी शरद पवारांचा हा फॉर्म्युला असल्याचं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
याचा अर्थ पवारांनी चलाखीने काँग्रेसला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्हे, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या पातळीवर आणून ठेवत काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीच्या परफॉर्मन्सला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. कारण लोकसभा निवडणुकीतला काँग्रेसचा परफॉर्मन्स अव्वल आहे. त्याआधारे काँग्रेस महाविकास आघाडीतला नंबर 1 चा पक्ष बनला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतल्या जागावाटपात काँग्रेसला अव्वल वाटा मिळाला पाहिजे. पण पवारांनी लोकसभेतला काँग्रेसचा परफॉर्मन्स बाजूला ठेवून त्या पक्षाला सिंगल डिजिटवाल्या शिवसेनेच्या बरोबरीला आणून ठेवले आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला काँग्रेस मान्य करेल का??, कळीचा सवाल आहे.
महाविकास आघाडीची रणनीती
विधानसभा निवडणुकीसाठीची 15 सप्टेंबरच्या दरम्यान आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांतदेखील पावसाची शक्यता आहे. प्रचारात पावसामुळे अडथळे येण्याची शक्यता लक्षात घेऊन लवकरात लवकर जागा वाटप करण्याकडे आघाडीचा कल आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधारे तिन्ही पक्षांनी त्रयस्थ संस्थांकडून पाहणी अहवाल तयार करून घेतले आहेत. बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार जागा वाटप करण्यावर भर असल्याचे काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं. तिन्ही पक्षांचे पाहणी अहवाल तयार झाले असून त्यावर यापुढील काळात बैठका सुरु होणार आहेत. मात्र या बैठका सुरु होण्यापूर्वीच शरद पवार यांनी महाविकास आघाडीसमोर जागा वाटपाचे सूत्र ठेवून पुढील वाद टळावेत यासाठी पुढाकार घेतल्याचे समजते.
शरद पवारांच्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने समसमान जागा लढवाव्यात ज्यामुळे छोटा आणि मोठा भाऊ कोण हा प्रश्न निकाली काढण्याचा यामागचा उद्देश आहे. पण 2019 साली शिवसेना आणि भाजपनं युती करून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांचं बिनसलं आणि युती तुटली. हा पूर्वानुभव लक्षात घेता महाविकास आघाडीने आता ताकही फुंकून प्यायचं ठरवलेलं दिसंतय. जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदावरून वाद होऊ नयेत, याची खास खबरदारी घेतल्याचे दिसते आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App