प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रीय महामार्गातील कामांमध्ये शिवसेना लोकप्रतिनिधींनी अडथळे आणण्यावरून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राचा विषय आजही चर्चेत आहे. या पत्रावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.Ajit pawar reaction affirmative over nitin gadkari’s letter to CM uddhav Thackeray
चांगल्या विकास कामांमध्ये कोणी अडथळा आणत असेल तर ते योग्य नाही. जिथे कुठे असं घडत असेल तर त्याची योग्य ती चौकशी करून कार्यवाही केली जाईल. मुख्यमंत्री ती करतील, अशी ग्वाही अजितदादांनी आज पुण्यातील ध्वजारोहण कार्यक्रमानंतर दिली.
मुख्यमंत्र्यांबरोबर मी गेले पावणेदोन वर्षे काम करतोय ते चांगल्या कामाचा आणि गुणवत्तापूर्ण कामाचा आग्रह धरतात. कामात गुणवत्ता नसेल तर संबंधित ठेकेदाराची चौकशी करण्याचे आदेश देतात. नितीन गडकरी यांनी लिहिलेल्या पत्रातील मुद्द्यांबाबत मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. परंतु काम चांगले असेल तर कंत्राटदाराला कोणी त्रास देता कामा नये. मग तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असो. त्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे, असे मत अजित दादा यांनी व्यक्त केले.
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते पुण्यातील राजभवनात ध्वजारोहण झाले. त्यानंतर राज्यपालांना अनेक मान्यवर भेटायला आले. त्यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार शरद रणपिसे होते. शरद रणपिसे यांनी राज्यपालांना विधान परिषदेच्या 12 नियुक्त आमदारांचा संदर्भात प्रश्न विचारला. त्यावेळी राज्यपालांनी हजरजबाबीपणाने अजित दादांकडे बोट दाखवून हे सरकार मला प्रश्न विचारत नाही तुम्ही का प्रश्न विचारत आहेत?, असा उलटा सवाल केला.
परंतु या वेळी राज्यपालांनी अजित दादांकडे बोट दाखविल्यामुळे त्याची राजकीय चर्चा रंगली आहे. 12 आमदारांच्या नियुक्ती संदर्भात राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यांच्यावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष दबाव आणत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्यावर टिपण्णी केली आहे.
परंतु त्यानंतर देखील राज्यपालांनी अजित दादांकडे बोट दाखवून नेमके काय साध्य केले आहे?, यावर चर्चा रंगली आहे. १२ नियुक्त आमदारांच्या विषयात नेमका कोण राजकीय खोडा घालत आहे?, असे प्रश्न राजकीय वर्तुळातून आता विचारायला सुरुवात झाली आहे. राज्यपालांवर उघडपणे दबाव आणायचा परंतु छुप्या मार्गाने वेगळी सूचना करायची अशी यातून काही वेगळी राजकीय खिचडी शिजते आहे काय?,असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App