विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिंसाचाराची आग भडकली आहे बांगलादेशात, पण नोबेल विजेते बांगलादेशी अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांनी आगपाखड केली भारतावर!! Bangladesh student protest; nobel laureate muhammad yunus criticize india
एरवी मोहम्मद युनूस हे भारतप्रेमी अर्थतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. पण बांगलादेशातला हिंसाचार रोखण्यासाठी भारताने मदत केली नाही म्हणून त्यांनी भारतावर आगपाखड केली. इतकेच नाहीतर आरक्षणाच्या मुद्द्यावर बांगलादेशात हिंसाचाराचे थैमान घालणारे हिंसक युवक भारतात घुसून तसेच थैमान घालतील, असली धमकीची भाषा देखील मोहम्मद युनूस यांनी वापरली. बांगलादेशातल्या हिंसाचार आवरण्याची जबाबदारी त्यांनी भारतावर ढकलून दिली. त्यासाठी त्यांनी “सार्क” नावाच्या इतिहासजमा झालेल्या संघटनेचा आधार घेतला. पण बिमस्टेक संघटनेत भारताने बांगलादेशाला सामावून घेतल्याचे वास्तव हे नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस विसरले. त्यांनी अखेर आपले खायचे दात दाखवलेच!!
आरक्षणावरूनच बांगलादेशमध्ये भीषण स्थिती निर्माण झाली आहे. या मुद्द्यावरून बांगलादेशी तरुण गेल्या महिन्याभरापासून आक्रमक आंदोलन करत आहेत. नुकत्याच झालेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत जवळपास 300 जणांना जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये ग्रामीण बँकेचे संस्थापक नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत भारतावर आगपाखड केली.
बांगलादेशमध्ये नेमकं काय घडतंय?
बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यावरून सगळा वाद सुरू झाला. महिन्याभरापूर्वी बांगलादेश सरकारने यासंदर्भात एक आदेशही पारित केला. त्यानुसार, 30 % सरकारी नोकऱ्या या 1971 च्या बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धातील वीरांच्या नातेवाईकांसाठी राखीव करण्यात आल्या. तेव्हा बांगलादेशमधील तरुणांनी रस्त्यावर उतरून या निर्णयाला व्यापक विरोध केला. त्यावेळी बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण 5 % टक्क्यांवर आणलं आणि त्यातील 3 % स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या नातेवाईकांसाठी ठेवले.
मात्र, यादरम्यान बांगलादेशी सरकारने केलेल्या कारवायांमुळे संतप्त झालेली बांगलादेशी जनता रस्त्यावर उतरली. यात प्रामुख्याने तरुणांचा समावेश आहे. तरुणांचा थेट सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते, संबंधित संघटनांचे कार्यकर्ते आणि पोलिसांशी संघर्ष होऊन त्यात हिंसाचार उफाळला आहे.
भारतावर टीकास्र!
या सर्व प्रकरणामध्ये मोहम्मद युनूस यांनी भारतावर आगपाखड केली. बांगलादेशमधील या सर्व घडामोडींबाबत भारत सरकारने हा त्या देशाचा “अंतर्गत मुद्दा” आहे, अशी भूमिका जाहीर केली. त्यावरून मोहम्मद युनूस यांनी भारतावर आगपाखड केली.
मोहम्मद युनूस म्हणाले :
SAARC च्या स्वप्नावर माझा विश्वास होता. सर्व सदस्य राष्ट्रांशी युरोपियन युनियनप्रमाणे एखाद्या कुटुंबासारखे संबंध ठेवण्याची आमची इच्छा आहे. त्यामुळे जेव्हा भारतानं सांगितलं की हा आमचा “अंतर्गत मुद्दा” आहे, तेव्हा मला प्रचंड वेदना झाल्या. जर माझ्या भावाच्या घरात आग लागली असेल, तर मी तो त्याचा अंतर्गत मुद्दा आहे असं कसं म्हणू शकतो?? राजनैतिक भाषेत “अंतर्गत मुद्दा” यापेक्षाही अनेक योग्य शब्द आहेत.
शेजारी राष्ट्रांमध्येही धग पोहोचणार”
जर बांगलादेशमध्ये काहीतरी घडतंय, 17 कोटी लोक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत, तरुणांची सरकारी गोळ्यांनी हत्या होत आहे, कायदा-सुव्यवस्था अदृश्य झाली आहे तर हे सांगायला कोणत्याही तज्ज्ञाची गरज नाही की हे लोण शेजारी राष्ट्रांमध्येही पसरेल
हिंसक तरुण त्यांच्या सुरक्षेसाठी शेजारी देशांत पलायन करतात. आपण आगीशी खेळत आहोत. हे देशातच सीमित राहणार नाही. जर परिस्थिती कायम राहिली, तर लोक सीमेपलीकडे जातील. शांततेच्या काळात स्थलांतरितांना सहन केलं जाऊ शकतं. पण अशा तणावपूर्ण वातावरणात हे तरुण सीमेपलीकडे मोठं आव्हान निर्माण करू शकतात.
भारताकडून काय अपेक्षा?
भारतानं बांगलादेशमध्ये पारदर्शी निवडणुका होण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. शिवाय, तशा त्या झाल्या नाहीत, तर त्याचा निषेधही करायला हवा. भारतात नियमित अंतराने निवडणुका होतात. भारत यशस्वी आहे. त्यामुळे आम्ही किती अपयशी आहोत, हे दिसते. आम्हाला हे यश साध्य करण्यासाठी राजनैतिक मार्गांनी प्रोत्साहन न देणे हा भारताचा दोष आहे. हे पाहून आम्हाला वेदना होतात. आम्ही भारताला यासाठी माफ करणार नाही!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App