मुंबई – गेल्या काही दिवसांमध्ये सिल्वर ओकमध्ये चाललेल्या भेटीगाठींचा आपल्या राजवटीला शह बसतोय, असे लक्षात येताच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत २० मिनिटांची भेट घेऊन काटशह दिल्याची चर्चा दिल्ली आणि मुंबईतील राजकीय वर्तुळात रंगविण्यात येते आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत गेलेल्या शिष्टमंडळाशी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री स्वतंत्रपणे पंतप्रधानांना भेटत असतात, हा प्रोटोकॉल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला आहे… तरीही ती भेट फक्त प्रोटोकॉलपुरतीच होती असे कोणी मानायला तयार नाही. आणि तशी शक्यताही नाही. silver oak meetings a checks to CM uddhav thackeray; 7 lok kalyan marg meeting a counter check
भेटीगाठी घेऊन शह देण्याचे राजकारण फक्त ज्येष्ठ नेते शरद पवार हेच करू शकतात, हा समज काही पत्रकारांनी महाराष्ट्रात पसरवून दिला आहे. पण आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपणही भेटीगाठी घेऊन काटशहाचे राजकारण करू शकतो, हा इशाराच जणू शरद पवारांना दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
पवार – फडणवीस हे राजकीय कॉम्बिनेशन महाराष्ट्रात बसू शकते. याची चर्चा मीडियातला एक सेक्शन गेल्या काही दिवसांपासून चालवतो आहे. फडणवीसांच्या सिल्वर ओक भेटीनंतर तर त्या शक्यतेला बळकटी आणली गेल्याचाही दावा करण्यात आला. पण पवारांच्या भेटीगाठींचा सिलसिला काही फडणवीसांपुरता मर्यादित राहिला नाही. तो कालच्या वर्षाभेटीपर्यंत सगल सुरू राहिला.
नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधलात याचा आनंद आहे उद्धवजी पण….
आणि आज सकाळी उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सेपरेट भेट घेतली. या भेटीत काय शिजले याची अधिकृत माहिती कोणी दिली नाही. तशी अधिकृत माहिती सिल्वर ओकच्या भेटीगाठींची बाहेर आली नाही. पवारांच्या तब्येतीची चौकशी यापेक्षा वेगळे काही कोणी बोलले नाही. त्यामुळे अफवांचा बाजार गरम राहिला. या अफवांच्या बाजाराला मोदी – उध्दव भेटीने फोडणी मिळाली आहे.
पवारांनी म्हणे उध्दव ठाकरेंना सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला दिला. या फॉर्म्युलावर पवार सिरियसली काम करताहेत असे सांगण्यात आले. पण हा नॅरेटिव्ह चालवणारे नेते आणि पत्रकार या बातमीतला उध्दव ठाकरे आणि मोदी हा घटक विसरत तरी होते किंवा जाणून बुजून बाजूला तरी ठेवत होते. आता भेटीगाठींच्या बातमीच्या नॅरेटिव्हमध्ये त्यांना फक्त सिल्वर ओक गृहीत धरून चालणार नाही. ७ लोककल्याण मार्ग देखील त्यात सामील करावाच लागले… कारण कोणाला काहीही वाटो… सिल्वर ओकचे महत्त्व कोणी कितीही वाढवून सांगो… महाराष्ट्राच्या राजकारणाचा अंतिम फैसला सिल्वर ओकवर नव्हे, तर ७ लोककल्याण मार्गावर ठरणार आहे, हे निश्चित… आजच्या २० मिनिटांच्या चर्चेचे हे फलित आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App