विशेष प्रतिनिधी
बारामती : बारामती एमआयडीसी परिसरातील फेरेरो चॉकलेट कंपनीजवळ गुरुवारी (ता. २७) कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोन महिलांचा मृत्यू झाला. कामावरून घरी परतत असताना झालेल्या या भीषण अपघातामुळे एमआयडीसी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बारामती शहर व औद्योगिक परिसरातील वाढत्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संगीता लोंढे (वय ३३) आणि मनीषा शिंदे (वय ४३), दोघी रा. राजाळे, ता. फलटण, जि. सातारा, अशी मृत महिलांची नावे आहेत. दोघीही बारामती एमआयडीसीतील ड्रीम प्लास्ट कंपनीत कामगार म्हणून कार्यरत होत्या. काम संपल्यानंतर त्या दुचाकीवरून घरी परतत असताना फेरेरो चॉकलेट कंपनीजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव कारने पाठीमागून धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे.
धडक जोरदार असल्याने दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात कारचालकही जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नेमकी कारणे आणि वाहनाचा वेग याबाबत पोलिसांच्या तपासानंतर अधिक स्पष्टता येणार आहे.
नगरसेवक ते मुख्यमंत्री; ‘दबाव’ कसा हाताळतात? देवेंद्र फडणवीसांनी Gen Z ला सांगितला राजकीय प्रवासाचा किस्सा
दरम्यान, बारामती शहरासह एमआयडीसी परिसरात वारंवार गंभीर अपघात घडत असल्याने वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. एमआयडीसी परिसरात कामगारांच्या वाहनांसह दुचाकी, कार तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे या परिसरातील वाहतूक व्यवस्थेकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन होण्याबरोबरच काही ठिकाणी वाहतूक नियमनाचा अभाव जाणवतो. अपघात झाल्यानंतर प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना केल्या जातात; मात्र काही दिवसांनंतर परिस्थिती पुन्हा पूर्ववत होते. त्यामुळे एखादी जीवघेणी घटना घडल्यानंतरच वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींची चर्चा करण्याऐवजी अपघातप्रवण ठिकाणांचा कायमस्वरूपी आढावा घेऊन उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
एमआयडीसी परिसरातील धोकादायक ठिकाणे, चौक आणि वळणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, वेगमर्यादेची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि आवश्यक ठिकाणी वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दोन महिला कामावरून घरी परतत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या घटनेमुळे बारामती एमआयडीसीतील रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियोजनाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App