विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Raut शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. शिवसेनेच्या बळावर निवडून आलेल्या खासदारांनी मतदारांशी आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्याचा आरोप करत, “हिंमत असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवून जिंकून दाखवा,” असे थेट आव्हान त्यांनी दिले.Sanjay Raut
मुंबईतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राऊत म्हणाले की, शिवसेनेने अनेकांना राजकारणात संधी दिली, गटारातून गंगेत आणले आणि मोठे केले. मात्र आज तेच लोक पक्षाशी बेईमानी करत आहेत.Sanjay Raut
‘मशालीच्या मतांचा विश्वासघात’
फुटलेल्या खासदारांना लक्ष्य करत राऊत म्हणाले की, हे सर्वजण मशाल चिन्हावर निवडून आले आहेत. मतदारांनी त्यांना नव्हे तर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या विचारांना मतदान केले होते.
“तुम्हाला मिळालेली मते ही भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात पडली होती. त्यामुळे पक्ष सोडून तुम्ही लाखो मतदारांचा अपमान केला आहे. जर खरोखर जनतेचा पाठिंबा असेल तर आधी राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढा,” असे ते म्हणाले.
संजय दिना पाटील यांच्यावर थेट निशाणा
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्यावरही राऊतांनी थेट हल्ला चढवला. ते म्हणाले, “शिवसैनिकांनी तुम्हाला प्रेम दिले, सन्मान दिला. पक्षाने तुम्हाला खासदार केले. पण पक्ष संकटात असताना सर्वप्रथम तुम्हीच पळून गेलात. इतिहासात तुमची नोंद गद्दार आणि बेईमान म्हणूनच राहील.”
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्यांवरही निशाणा साधताना राऊत म्हणाले, “उद्धवसाहेबांची चूक नाही. त्यांनी मोठ्या मनाने संधी दिली. पण काही लोकांच्या डीएनएमध्येच गडबड आहे. त्यामुळे ते गंगेतून पुन्हा गटारात गेले.”
‘टायगर नव्हे, लांडग्यांच्या कळपात गेले’
सध्या चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेचाही राऊतांनी समाचार घेतला. “ते स्वतःला टायगर म्हणत असतील, पण प्रत्यक्षात ते लांडग्यांच्या कळपात गेले आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.
“ते ऑपरेशन टायगर म्हणत असतील तर आमच्याकडून ऑपरेशन तुडवा सुरू झाले आहे. शिवसैनिकांचा संताप प्रचंड आहे. जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांना शिवसेनेचा राडा काय असतो ते कळेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
‘मराठी माणसाशी गद्दारी करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’
फुटलेल्या खासदारांविरोधात कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याचे आवाहन करताना राऊत म्हणाले की, मराठी माणूस आणि महाराष्ट्राशी बेईमानी करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही.
“ज्यांनी महाराष्ट्राशी आणि मराठी माणसाशी गद्दारी केली, ते आयुष्यभर सुखाने जगू शकणार नाहीत. पुढचा खासदारही मशाल चिन्हाचाच असेल आणि शिवसैनिक गद्दारीचा राजकीय हिशोब चुकता करतील,” असा दावा त्यांनी केला.
फुटीनंतर ठाकरे गट आक्रमक
शिवसेनेतील खासदारांच्या फुटीनंतर ठाकरे गटाकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. पक्ष नेतृत्वाकडून फुटलेल्या खासदारांवर सातत्याने टीका केली जात असून, त्यांच्या विरोधात राजकीय आणि संघटनात्मक लढा उभारण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत या भाषणातून मिळाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App