नाशिक : ओमराजे निंबाळकर म्हणे, दोन दिवसांनी निर्णय जाहीर करतील. ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहणार की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार हे ते स्वतःच धाराशिव मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून सांगतील. पण ओमराजे निंबाळकर यांनी दोन दिवसांपूर्वीच केलेल्या वक्तव्यात त्यांच्या निर्णयाचे “रहस्य” दडलेय. किंबहुना ते “रहस्य” सुद्धा नाही, तर ते उघड “राजकीय सत्य” बोलून गेलेत!!Omraje Nimbalkar’s decision is reportedly due in two days
ओमराजे निंबाळकर एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आणि त्यांच्या शिवसेनेत गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. शिवसेनेचे तसे पत्र लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यापर्यंत पोहोचले. ओम बिर्ला यांनी शिवसेनेच्या स्वतंत्र गटाला सुद्धा मान्यता दिली, पण तरीसुद्धा ओमराजे निंबाळकर यांचा निर्णय झाला नसल्याचा दावा मात्र त्यांच्याच वेगवेगळ्या विधानांमुळे अनेकांना करावा लागला. याच दरम्यान आज उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी फोनवर बातचीत केली. उद्धव ठाकरे यांनीच आपल्याला मोठे केले हे त्यांनी फोनवरून कबूल केले, पण मुंबईहून धाराशिवला निघताना ओमराजे निंबाळकरांनी कुठल्या शिवसेनेत राहायचा याचा निर्णय मात्र दोन दिवसांनी जाहीर करणार असल्याचे सांगितले.
– मशाल चिन्हावर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पराभव
पण त्याचवेळी त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे मशाल या चिन्हावर आपण खासदार झालो असलो तरी धाराशिव मतदारसंघामध्ये मशाल चिन्हावर कुठली नगरपालिका किंवा कुठली स्थानिक स्वराज्य संस्था का जिंकू शकलो नाही याचा विचार करावा, असे वक्तव्य केले. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयाविषयी अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
– भावनिक दृष्ट्या चूक, राजकीय दृष्ट्या बरोबर
पण खरं म्हणजे ओमराजे निंबाळकर यांनी दोन दिवसांपूर्वीच केलेल्या एका वक्तव्यातून त्यांच्या संभाव्य निर्णयाची झलक दिसली. शिवसेनेचे सहा खासदार फुटल्यानंतर सोशल मीडियातून जो उद्रेक झाला, त्या उद्रेकाला उत्तर देताना ओमराजे निंबाळकर भावनिक झाले होते. पण त्यांनी लगेच स्वतःला सावरून आपण भावनिक दृष्ट्या चुकलो असलो, तरी राजकीय दृष्ट्या बरोबर आहोत, असे सांगितले होते. त्यावेळी सुद्धा ओमराजेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा उल्लेख केला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मशाल चिन्हावर आपली माणसे निवडून येत नसतील, तर भविष्यात सगळ्यांचेच राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते, असे ते म्हणाले होते.
– “राजकीय सत्य”
याचा सरळ अर्थ असा, की ओमराजे निंबाळकरांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जायचा निर्णय राजकीय दृष्ट्या घेतला, भावनिक दृष्ट्या नाही. त्यामुळेच त्यांनी आपण उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर टीका करणार नसल्याचे सांगितले. पण एकनाथ शिंदे आज सत्तेवर आहेत. त्यांच्या मागे भाजपची महाशक्ती उभी आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जायचा निर्णय जाहीर करतील हे उघड “राजकीय सत्य” दिसले. ते त्यांनी स्वतःच्या तोंडून दोन दिवसांपूर्वीच जाहीर केले होते, फक्त निर्णय ते दोन दिवसानंतर जाहीर करतील. बाकी एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना ओमराजे निंबाळकर यांच्या मागे जायला सांगितले. त्यांच्याबरोबर राहायला सांगितले, हा भाग अलहिदा!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App