विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis शिवसेना पक्षप्रमुख पद सोडण्याची तयारी असल्याचे वक्तव्य करणारे उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोला लगावला आहे. “हे म्हणजे उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो, असे म्हणण्यासारखे आहे. आता राहिलाच कोणता राजीनामा?” अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.Devendra Fadnavis
शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख पद सोडण्याची तयारी दर्शवली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि शिवसेनेतील अलीकडच्या घडामोडींवर निशाणा साधला.Devendra Fadnavis
‘विचारांचा वारसा सोडल्यानेच लोक दूर गेले’
फडणवीस म्हणाले की, शिवसेना ही केवळ एक राजकीय पक्षाची संघटना नाही, तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा आहे.
“शिवसेना हा संपत्तीचा वारसा नसून विचारांचा वारसा आहे. ज्या क्षणी तो विचारांचा वारसा सोडण्यात आला, त्याच क्षणी त्या विचारांवर विश्वास ठेवणारे अनेकजण पक्षापासून दूर गेले. आत्मचिंतन करण्याची गरज असताना ते झाले नाही, त्याचाच हा परिणाम आहे,” असे फडणवीस म्हणाले.
‘बाळासाहेबांची शिवसेना आता शिंदेंकडे’
शिवसेनेच्या मूळ वारशावर दावा करताना मुख्यमंत्री म्हणाले की, आज बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे चालवत आहेत.
“बाळासाहेबांचा विचार, धनुष्यबाण आणि शिवसेनेचा वारसा आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सध्याच्या परिस्थितीबाबत आश्चर्य वाटण्याचे कारण नाही,” असा दावा त्यांनी केला.
नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. त्याचवेळी पक्षातील नेतृत्वाबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर भाष्य करताना त्यांनी पक्षप्रमुख पद सोडण्याची तयारी दर्शवली होती.
“माझ्या नेतृत्वावर जर खरोखर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल आणि शिवसैनिकांना वाटत असेल की मी पदावर राहू नये, तर मी पक्षप्रमुख पद सोडायला तयार आहे. मात्र ही सोन्यासारखी शिवसेना गद्दार आणि दरोडेखोरांच्या हाती जाता कामा नये,” असे ठाकरे म्हणाले होते.
तसेच, “मला पदाची हाव नाही. मी मुख्यमंत्रिपदही सोडले. भविष्यात शिवसैनिकांना वाटले की मी पदावर राहू नये, तर मी एका क्षणाचाही विलंब न लावता पद सोडेन,” असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
शिवसेनेतील फुटीनंतर आरोप-प्रत्यारोप तीव्र
ठाकरे गटातील अनेक खासदारांनी बंडखोरीची भूमिका घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे नेतृत्वावर विश्वास असल्याचा दावा करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला महायुतीतील नेते हीच वेळ आत्मपरीक्षणाची असल्याचे सांगत आहेत.
याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी केलेला “उजाडलेल्या गावाची पाटीलकी” हा टोला राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App