विशेष प्रतिनिधी
पुणे : SRPF राज्य राखीव पोलिस दल (SRPF) गट क्रमांक ५, दौंड येथील सशस्त्र पोलिस शिपाई भरतीची लेखी परीक्षा अखेर अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे. गेल्या २ मे रोजी झालेल्या या परीक्षेतील १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न एका खाजगी प्रकाशन संस्थेच्या सराव प्रश्नसंचातातून जसेच्या तसे आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या गंभीर गैरप्रकाराची दखल घेत अप्पर पोलिस महासंचालकांनी ही परीक्षा रद्द केली असून, आता २४ मे २०२६ रोजी नव्याने लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.SRPF
एसआरपीएफ-5 या गटाची 100 गुणांची लेखी परीक्षा २ मे शनिवारी इंदापूरच्या एका महाविद्यालयात झाली. परीक्षेत प्रत्येकी 1 गुणाचे 100 प्रश्न होते. त्याच समान 100 प्रश्नांची क्रमवारी मागे – पुढे करून ए, बी, सी, डी असे प्रश्नसंच पुरविण्यात आले. चारही प्रश्नपत्रिकेत 85 प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या (महाराष्ट्र पब्लिकेशन) ‘पोलिस भरती 2026- 50 प्रश्नपत्रिका संच’ पुस्तकातील ‘सराव प्रश्नसंच 10’ या एकाच प्रश्नपत्रिकेतून उचलले आहेत. खासगी प्रकाशनाच्या ‘सराव प्रश्नसंच 10’ या प्रश्नपत्रिकेतील सलग 85 प्रश्न एसआरपीएफच्या प्रश्नसंच ‘ए’मध्ये अगदी त्याच क्रमवारीनुसार आणि त्याच पर्यायांनुसार जसेच्या तसे घेण्यात आले होते. गंभीर बाब म्हणजे परीक्षकांनी या प्रश्नांची निवड करताना त्यांचा क्रम व पर्यायही बदलले नाही. त्यामुळे या प्रकरणी एखादा घोटाळा तर झाला नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.SRPF
सखोल चौकशीनंतर ‘अप्पर पोलिस महासंचालकांचा’ कडक निर्णय
हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस बल, पुणे यांनी ४ मे रोजीच या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले होते आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती. आता चौकशीचा प्राथमिक अहवाल समोर आल्यानंतर, अप्पर पोलिस महासंचालकांनी ही वादग्रस्त परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एसआरपीएफ प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, माध्यमांमधून प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली असून, दोषींवर योग्य ती कार्यवाही केली जाईल.
२४ मे रोजी होणार पुनर्परीक्षा
नवीन वेळापत्रकानुसार, एसआरपीएफ गट ५, दौंड येथील सशस्त्र पोलिस शिपाई भरतीची लेखी परीक्षा आता २४ मे २०२६ रोजी घेतली जाईल. ही परीक्षा ‘दत्तकला शिक्षण संस्था, स्वामी चिंचोळी, दौंड’ येथे पार पडणार आहे. या पुनर्परीक्षेमुळे सर्वसामान्य आणि कष्टकरी उमेदवारांना न्याय मिळेल आणि पोलिस भरती प्रक्रियेवरील विश्वास पुन्हा दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App