मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना आरक्षण समितीवरून हटविण्यात यावे. आरक्षणाचा निर्णय लागेपर्यंत नोकरभरतीला स्थगिती देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना आरक्षण समितीवरून हटविण्यात यावे. आरक्षणाचा निर्णय लागेपर्यंत नोकरभरतीला स्थगिती देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी आम्ही आंदोलन करत आहोत. या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा इशाराही मराठा आंदोलकांनी दिला आहे.
Remove Ashok Chavan from reservation committee
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांनी आंदोलन सुरू केले आहे. पुणे, नाशिक, रायगड आणि मराठवाड्यातून मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. या आंदोलनात तरुणांपासून ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले असून आंदोलनात महिला आणि तरुणींचा सहभाग लक्षणीय आहे. या आंदोलकांनी सीएसटी परिसरात रस्त्यावर बसूनच घोषणाबाजी सुरू केली. या सरकारचं करायचं, काय खाली डोकं वर पाय, ठाकरे सरकार हाय हाय अशा घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
आंदोलकांचा एक गट विधानभवनाच्या दिशेने निघाला असताना पोलिसांनी आंदोलकांना मज्जाव केल्याने आझाद मैदानासमोरच पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट उडाली. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानात जाऊन आंदोलक मराठा विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला. 2185 पदांची नियुक्ती 2018 मध्ये पूर्ण झालेली आहे. न्यायालयाचा निर्णय नंतर आला, मात्र राज्य सरकारने जाणीवपूर्वक नियुक्ती दिली नाही. मराठा नेत्यांनी जाणीवपूर्वक मराठ्यांवर अन्याय केल्याचं खोत म्हणाले. शेतकऱ्यांच्या पोरांना रोजगार दिला असता तर काय झालं असतं? असा सवाल करतानाच सर्व मराठा नेते स्वत:ला राजे आणि सरदार मानतात, अशी टीकाही त्यांनी केली.
उद्या सभागृहात मराठा आंदोलनावर आवाज उठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळचे हिवाळी अधिवेशन हे दोन दिवसांचे आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न मोठा असताना या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा विषयच घेतला गेला नाही. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि या सरकारला आशीर्वाद देणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मराठा समजाला आरक्षणच द्यायचं नसल्याचा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला.
आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सोमवारी राज्यातून हजारो वाहनधारकांचा मोर्चा मुंबईत धडकणार असल्याने रविवारी मुंबईच्या वेशीवर वाहने अडवण्यात येत होती. सरकारने रविवारी संशयित वाहनांची मुंबईच्या वेशीवर धरपकड चालवली आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी केला आहे. वाहन मोर्चासाठी राज्यभरातून येणाऱ्या मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी मुलुंड नाक्यावर नाकेबंदी करण्यात आली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App