विशेष प्रतिनिधी
मुंबई : ज्याचसाठी केला होता अट्टाहास, ते स्वतःचे पंतप्रधान पद आणि अजित पवार यांचे मुख्यमंत्री पद कसं हुकलं??, याची सविस्तर कहाणी स्वतःच शरद पवारांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत सांगितली. Sharad pawar told the story how prime ministership and chief ministership dodged pawar uncle – nephew!!
प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांनी शरद पवारांवर पंतप्रधान पद आणि मुख्यमंत्रीपद याबद्दल केलेल्या आरोपांना शरद पवारांनी उत्तरे दिली. राष्ट्रवादीत 2004 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार नसल्याची धक्कादायक कबुली पवारांनी दिली. त्याचबरोबर देवेगौडा पायउतार झाल्यानंतर आपण पंतप्रधान बनलो असतो, तर काँग्रेसमधल्या एका गटाने आपल्याला पाठिंबा दिला नसता. त्यामुळे आपल्याला शपथविधीच्याच दिवशी राजीनामा द्यायला लागला असता, असा धक्कादायक दावाही पवारांनी केला.
अजित पवारांचा आक्षेप काय??
प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांनी शरद पवारांवर 1996 आणि 2004 या दोन वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडींबाबत आरोप केले होते. शरद पवारांनी देवेगौडा पायउतार झाल्यानंतर आलेली पंतप्रधानपदाची संधी घालवल्याचा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला होता. त्याशिवाय, 2004 साली महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जास्त असूनही शरद पवारांनी पक्षाकडे चालून आलेले मुख्यमंत्रीपद नाकारले, असाही दावा अजित पवारांनी केला. लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी या दोन्ही संदर्भात स्पष्टीकरण दिले.
शरद पवार म्हणाले :
पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यानंतर नंतर दिल्लीत अस्वस्थता होती. तेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो. पक्षाचा लोकसभेतला सभागृह नेता होतो. तेव्हा देवेगौडांचा पाठिंबा काढण्यात सीताराम केसरी आणि इतर काहींची भूमिका प्रमुख होती. हे काही खासदारांना आवडलं नाही. माझ्या घरी बैठक झाली. जवळपास बहुसंख्य खासदार तिथे हजर होते. तेव्हा मला सुचवण्यात आलं की तुम्ही पंतप्रधानपदावर दावा करा.
पण मी जर तेव्हा असं केलं असतं तर राष्ट्रपतींनी मला शपथही दिली असती. त्यांची ती तयारी होती. पण मला हे दिसत होतं की काँग्रेसमधला एक गट या प्रस्तावाला अजिबात पाठिंबा देणारा नव्हता. त्यामुळे त्यांनी विरोधात मत दिलं असतं तर मी पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याच्याच दिवशी मला राजीनामा द्यावा लागला असता. तेव्हा तो प्रस्ताव स्वीकारणं मला शहाणपणाचं वाटलं नाही. प्रफुल्ल पटेल वगैरेंचं म्हणणं होतं की करून टाकू या. नंतर काय होईल??, ते बघू. पण अशी भूमिका पंतप्रधानपदासंदर्भात घेणं मला शहाणपणाचं वाटलं नाही.
तेव्हा काँग्रेसमध्ये दोन गट
देवेगौडा पायउतार झाले त्या काळात काँग्रेसमध्ये दोन गट होते. त्या काळात कळत – नकळत काँग्रेसमध्ये दोन भाग झाले होते. आम्ही यशवंतराव चव्हाणांचे विचार मानणारे होतो. दुसरा गट इंदिरा गांधींच्या विचारांशी संबंधित असणारा होता. आम्ही त्यापासून थोडे बाजूला होतो. इंदिरा गांधींच्या विचारांच्या गटाला मी पंतप्रधान होणं पचलं नसतं. त्यांनी ते सरकार पाडलं असतं. त्यामुळे पंतप्रधान पद स्वीकारणं योग्य नाही, असं माझं मत होतं.
२००४ साली मुख्यमंत्रीपद का नाकारलं?
२००४ साली जास्त आमदार असूनही मुख्यमंत्रिपद का नाकारलं??, तर राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर ते कोण चालवणार? याचा विचार आम्ही करत होतो. अजित पवारांचं नाव तेव्हा नव्हतं. अजित पवार तेव्हा अनुभवाने नवीन होते. तेव्हा छगन भुजबळांसारखी आणखीही काही नावं होती. पण त्यांची निवड केली असती, तर पक्ष एकत्र राहिला नसता. पक्षात तेव्हाच फूट पडली असती. परिणामी महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यात आम्ही अपयशी ठरलो असतो. त्यामुळे आम्ही एकमताने हा निर्णय घेतला.
तेव्हा विलासराव देशमुख यांच्यासारखे लोक प्रशासन व्यवस्थित चालवतील असं आम्हाला वाटलं. दुसरं म्हणजे ते किंवा आम्ही असे आम्ही सगळे काँग्रेसच्याच विचारसरणीचे होतो. दोन भाग झाले त्याची कारणं वेगळी होती. त्यामुळे एका दृष्टीने सरकार चालवायचं असेल, तर एक विचाराचेच लोक सत्तेवर असले पाहिजेत, असा आमच्या काही वरीष्ठ सहकाऱ्यांचा आग्रह होता. तेव्हा मुख्यमंत्रीपदाच्या ऐवजी मंत्रीपदाच्या काही जागा आणखी मिळत असतील, तर तेव्हाच्या आमच्या नव्या पिढीच्या लोकांना अनुभव घेण्याची संधी मिळेल. मग भविष्यात मुख्यमंत्रीपदाचा विचार करू, असा आमचा विचार होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App