नाशिक : पहिल्या – दुसऱ्या रांगा आणि सन्मानाच्या खुर्च्या; माध्यमांनी खेळवल्या वादाच्या बातम्या!!, असे भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेच्या निमित्ताने घडले. नीती आयोगाची बैठक राजधानी नवी दिल्लीत झाली. त्यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खरे – खोटे मानापमान नाट्य रंगविले. बैठकीतला माईक बंद केल्याचा कांगावा त्यांनी केल्याचे काल सायंकाळीच पुराव्या सकट उघड झाले. पण माध्यमांनी मात्र पुराव्यांच्या बातम्या दिल्या नाहीत, त्याऐवजी ममता बॅनर्जी बैठकीतून संतापून बाहेर पडल्याच्या बातम्या “सिलेक्टिव्हली” दिल्या.
त्यापाठोपाठ भाजपच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पक्षाच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्या बैठकीला गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील प्रोटोकॉलनुसार उपस्थित होते, पण त्या बैठकीचा एक ग्रुप फोटो सध्या माध्यमांनी चर्चेत आणला आहे. या ग्रुप फोटोमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्र्यांच्या रांगेत बसल्याचे दिसल्याबरोबर माध्यमांनी त्याविषयीच्या बातम्या रंगविल्या. इतर सर्व मुख्यमंत्र्यांच्या रांगेत देवेंद्र फडणवीस यांना मानाची खुर्ची दिली असे माध्यमांनी बातम्यांमध्ये आवर्जून नमूद केले.
इतर वेळी फडणवीसांची कुठे आणि कशी किरकिरी झाली, कुठे गोची झाली, या बातम्या मराठी माध्यम डार्क रंगात रंगवून देत असतात. पण फडणवीसांना मुख्यमंत्र्यांच्या रांगेत मोदी – शाह यांच्या शेजारी बसविले, या बातम्या माध्यमांनी वेगळ्या पद्धतीने रंगवून दिल्या. इतर सर्व उपमुख्यमंत्र्यांना मागच्या रांगेत उभे ठेवले, पण फडणवीसांना मुख्यमंत्र्यांच्या रांगेत बसविले, हे माध्यमांनी आवर्जून सांगितले.
यात माध्यमांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दोन उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांना चिमटे काढायचे सोडले नाही. योगी आणि त्यांच्या दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये वाद असल्याच्या बातम्या गेल्या आठवड्यावर माध्यमे रंगवून सांगत आहेत. मात्र हे तिन्ही नेते प्रोटोकॉल नुसार मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजर राहिले होते. त्यापलीकडे भाजपमध्ये त्यातले कुठलेही वादाचे पडसाद उघडपणे उमटले नाहीत.
पण पहिल्या दुसऱ्या रांगा आणि सन्मानाच्या खुर्च्या हा वाद मराठी माध्यमांमध्ये रंगविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसी प्रवृत्तीच्या नेत्यांना फार रस आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर दिल्लीतल्या बैठकीला गेले होते, तेव्हा त्यांना मागच्या रांगेत उभे केले गेले होते, असा दावा जयंत पाटलांनी करून रांगेचा वाद मध्यंतरी उकरून काढला होता. पण त्या वादाला जेष्ठता क्रमानुसार आणि प्रोटोकॉल नुसार एकनाथ शिंदे यांनी उत्तर देऊन त्यावर पडदा टाकला होता.
पण त्या पलीकडे जाऊन पहिल्या – दुसऱ्या रांगा आणि सन्मानाच्या खुर्च्यांवर मराठी माध्यमांनी वाद निर्माण केला होता, तो शरद पवारांसंदर्भात होता. शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन्ही शपथविधीला उपस्थित राहिले नव्हते. कारण राष्ट्रपती भवनाच्या प्रोटोकॉल नुसार त्यांची स्थान एक खासदार म्हणून पाचव्या – सहाव्या रांगेत असल्याचे सांगितले जात होते. नुसते खासदार म्हणून पाचव्या – सहाव्या रांगेत जाऊन बसण्यापेक्षा शपथविधीला न गेलेले बरे!!, असा पोक्त राजकीय विचार शरद पवारांनी केला आणि त्यांनी मोदींच्या शपथ दोन्ही शपथविधींना उपस्थित राहणे टाळले. पण पहिल्या शपथविधीच्या वेळी मात्र मराठी माध्यमांनी पवारांना राष्ट्रपती भवनातल्या पाचव्या रांगेत स्थान दिल्याच्या बातम्या रंगवून सांगितल्या होत्या.
बाकी पहिल्या दुसऱ्या रांगा आणि सन्मानाच्या खुर्च्या हा प्रोटोकॉलचा विषय आहे. जो ज्या उच्च पदावर आहे, त्या पदांनुसार त्या रांगा आणि खुर्च्या मिळतात. केवळ माध्यमांनी वाद रंगवून किंवा माध्यमांमध्ये चमकून किंवा माध्यमांनी प्रतिमा निर्मिती करून ना पहिल्या – दुसऱ्या रांगा मिळतात, ना सन्मानाच्या खुर्च्या मिळतात!!, हे सत्य नेत्यांना आणि माध्यमांनाही कधीतरी स्वीकारावेच लागेल!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App