शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या “द्रष्ट्या” नेत्या आहेत. 25 सप्टेंबर 2023 रोजीच त्यांनी वर्तविले होते “भाकीत”!!, हे शीर्षक जरा विचित्र वाटेल पण ते विचित्र नाही. उलट त्यात विशिष्ट आशय निश्चित भरला आहे, हे पुढे वाचल्यावर लक्षात येईल!!Supriya sule predicted baramati defeat on 25 September 2023 itself
काय म्हणाले होत्या सुप्रिया सुळे 25 सप्टेंबर 2023 ला??
त्या म्हणाल्या होत्या :
मी राज ठाकरेंचे कौतुक करते. शिवसेनेत त्यांचे मतभेद झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. मनसे अस्तित्वात आणली. त्यांनी शिवसेना माझीच असा दावा सांगितला नाही. पण आज बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचा अपमान करण्यासाठी दिल्लीतल्या अदृश्य हातांनी पक्ष फोडण्याचे काम चालवले आहे. बाळासाहेब आणि पवारांचे यश भाजपला सहन होत नाही. मराठी माणसाचा अपमान होतो आहे!!
सुप्रिया सुळे “खरंच” बोलल्या होत्या. कारण त्या “द्रष्ट्या” नेत्या आहेत. त्यांना हे माहिती होते की, एकनाथ शिंदे काय किंवा अजित पवार काय?, त्यांनी आपापल्या पक्षांमध्ये मतभेद झाल्यानंतर स्वतंत्र पक्ष काढले असते, तर त्यांना कमी प्रतिसाद मिळाला असता. पण ते मूळ पक्षावरच दावा सांगून ते सगळा पक्षच कार्यकर्त्यांसह आपल्या बाजूला ओढून घेऊन गेले आणि त्यांच्या पक्षांना ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने निवडणुकीत भरघोस प्रतिसाद दिला. सुप्रिया सुळेंचे हे “द्रष्टेपण” ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने सिद्ध केले आहे!!
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना ग्रामीण भागातील नेत्यांनी मतदारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर ढकलले आहे!!
इतकेच नाही तर सुप्रियाताईंच्या “द्रष्ट्या” वक्तव्यातून बारामतीच्या निकालाची भीती त्यांनी किती आधी व्यक्त केली होती हे दिसून येते. बारामती तालुक्यातल्या 31 ग्रामपंचायतींचे निकाल काल म्हणजे 6 नोव्हेंबर 2023 रोजी लागले. पण त्याचे “भाकीत” सुप्रियाताईंनी 25 सप्टेंबरलाच व्यक्त केले होते. अजितदादांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून स्वतःचा स्वतंत्र पक्ष काढायला हवा होता आणि राष्ट्रवादी तसाच आपल्यासाठी सोडून द्यायला हवा होता म्हणजे मग आपला बारामतीतला पाया तरी निसटून गेला नसता हे सुप्रिया सुळेंना म्हणायचे होते. सुप्रिया सुळेंच्या 25 सप्टेंबरच्या वक्तव्यातले हे “बिटवीन द लाईन्स” कालच्या निकालातून बाहेर आले.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने अजितदादांवर “बंदी प्रयोग”!!; पण तो सुलटेल की उलटेल??
अजितदादा ज्या दिवशी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना बाजूला करून अख्खा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याबरोबर घेऊन भाजपच्या सत्तेच्या वळचणीला निघून गेले, तेव्हापासून सुप्रिया सुळे यांना बारामतीत आपल्या पराभवाची भीती भेडसावते आहे. पण त्या तसे उघड बोलू शकत नाहीत म्हणून त्या आडून आडून ते बोलत होत्या. सुप्रिया सुळे यांचे 25 सप्टेंबरचे वक्तव्य हे त्याच अनुषंगाने होते.
अजितदादांनी स्वतंत्र पक्ष काढायला हवा होता
अजित पवारांचे शरद पवारांशी काही मतभेद झाले असतील, त्यांना भाजपच्या सत्तेबरोबर जायचे होते, तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून बाहेर पडायला हवे होते. स्वतःचा स्वतंत्र पक्ष काढायला हवा होता. म्हणजे मग राष्ट्रवादी काँग्रेस आपोआप आपल्या ताब्यात आली असती आणि आपणच खऱ्या अर्थाने शरद पवारांच्या राजकीय वारस ठरलो असतो, हे सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचे खरे राजकीय इंगित आहे.
पण आता बारामतीतल्याच मतदारांनी सुप्रिया सुळे शरद पवारांच्या फक्त जैविक वारसा आहेत, पण राजकीय वारस अजित पवार आहेत हे सिद्ध करून टाकले. असेच नेमके घडेल याची भीती सुप्रिया सुळे यांना तेव्हाच वाटत होती, म्हणूनच त्या वेगवेगळ्या वक्तव्यांमधून तेच सांगू पाहात होत्या. फक्त त्यावेळी त्यातले “बिट्वीन द लाईन्स” कळत नव्हते. 6 नोव्हेंबर 2023 रोजी हे “बिटवीन द लाईन्स” बाहेर आले आणि शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार लोकसभेतल्या गटनेत्या सुप्रिया सुळे या “द्रष्ट्या” नेत्या असल्याचे सिद्ध झाले!!… आता यापुढे सुप्रिया सुळे केव्हा आणि कोणते “द्रष्टे” वक्तव्य करतील??, याची वाट महाराष्ट्र पाहतो आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App