विशेष प्रतिनिधी
मुंबई : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या पालघर जिल्ह्यातील ‘मॉब लिंचिंग’ची घटना म्हणजे महाराष्ट्राच्या गृहखात्याच्या अपयशाची रक्तरंजित कहाणी असल्याचे इंडियन एक्सप्रेस या प्रख्यात वृत्तपत्राच्या बातमीतून स्पष्ट झाले आहे. मॉब लिंचिंगची घटना घडण्यापुर्वीच या भागातला अफवांचा सुळसुळाट रोखण्यात उद्धव ठाकरे सरकारचे गृहखाते सपशेल अपयशी ठरले. अडचणीत सापडलेल्या साधुंची सुटका करण्यात उद्धव ठाकरे सरकारचे गृहखाते अपयशी ठरले. मॉब लिंचिंगच्या घटनेतील आरोपींना ताब्यात घेण्यात उद्धव ठाकरे सरकारच्या गृहखात्याला अद्याप यश आलेले नाही.
या संदर्भात इंडियन एक्सप्रेसने सविस्तर वृत्तांत दिला आहे. त्यात नमूद केले आहे की, संबंधित गावातल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नेता आणि माजी आमदार याला जमावावर नियंत्रण ठेवता आले नाही. स्थानिक रहिवासी, प्रत्यक्षदर्शी पोलिस आणि स्थआनिक अधिकाऱ्यांशी बोलून इंडियन एक्सप्रेसने हा खळबळजनक वृत्तांत दिला आहे. तिघांची हत्या पोलिसांच्या नाकाखाली झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
एप्रिलच्या त्या संध्याकाळी दुर्गम गावाजवळच्या महामार्गावर शेकडो माणसं काही मिनिटात जमली. डहाणू तालुक्यातील महाराष्ट्र आणि दादरा-नगर-हवेलीच्या सीमेवरचं हे गाव मुंबईपासून दीडशे किलोमीटर अंतरावर आहे. चिनी विषाणूच्या उद्रेकानंतर उन्हाळ्यातील शेती कामे या भागात थांबली. मॉब लिंचींग ज्या गावात झाले त्या गडचिंचले आणि आसपासच्या गावात गेल्या काही दिवसांपासून जोरदार अफवा पसरवल्या जात होत्या. सोशल मीडियातून अपहरण केले जाते, अवयव चोरीच्या घटना घडत आहेत, मुले पळवली जात आहेत आदी अफवा पसरत होत्या. मात्र त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी गृहखात्याने काहीच केले नाही. ना अफवा थांबल्या, ना त्या पसरवणाऱ्यांना शिक्षा झाली. परिणामी गावकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण होते. त्यावर उपाय म्हणून लोकांनी गस्त चालू केली. एकमेकांना शिट्या घालून, टॉर्च-मोबाईलचे दिवे दाखवून लोक रात्री-अपरात्री फिरू लागले.
याच काळात रात्री आठ वाजता मारुती इको या वाहनातून पीडित महंत कल्पवृक्ष गिरी, सुशीलगिरी महाराज आणि त्यांचा चालक नरेश येलगडे हे राज्य महामार्ग 73 वरुन डहाणू-जव्हार रोडवरुन सुरतकडे निघाले होते. मुंबई-गुजरात महामार्ग तपासणी केंद्रावर गस्त चालू होती. महाराजांची गाडी गडचिंचलेपासून १ किमी अंतरावर दादरा-नगर हवेलीच्या सुरक्षारक्षकांनी बंदिस्त केलेल्या बॅरीकेडजवळ थांबवण्यात आली. तेथून त्यांना मागे फिरायला लागले. गडचिंचलेच्या सरपंच चित्रा चौधरी या परिसरातच राहतात. रात्रीच्या शांततेत त्यांनी वाहनाचा आवाज ऐकला. त्यानंतर काही वेळाने त्यांनी पाहिले की, सुमारे पंचवीस माणसं आसपासच्या गावातून जमले होते. इको गाडीभोवती गर्दी गोळा झाली. सगळे पुरुष ओरडत होते. त्यांना मी समजावण्यास गेले तर माझ्या किडन्या मी त्यांना देऊन मोकळा होतो, असे सांगून मला मागे ढकलण्यात आले, असे चौधरी म्हणाल्या.
गाडीतले लोक कोण आहेत, याची शंका त्यांना होती. अपहरणकर्ते पोलिसाच्या वेशात येतात, अभिनय करणारे असू शकतात, परफॉर्मर्स असू शकतात अशा अफवा सोशल मीडियातून पसरवल्या गेल्या होत्या. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, मी तिथे दोन तास होतो. जमाव दगडांचा पाऊस पाडत होता आणि त्यांची गाडी हादरवत होता. पण आत असलेले लोक अजूनही जखमी झाले नव्हते. पोलिस दोन तुकड्यात आले आणि काही वेळाने निघून गेले. रात्री उशीरा दोननंतर हिंसाचारात सहभागी असणाऱ्यांची चौकशी चालू झाली. तेव्हा अटक झालेल्यांचे कुटुंबीय इतरांना धमकावू लागले. त्यांच्या घरातल्या बायका धमकावू लागल्या. घर फोडण्याची धमकी देऊ लागल्या.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते काशिनाथ चौधरी जे पालघर जिल्हा परिषदचे सदस्य आहेत आणि डहाणू विधानसभा 2019 च्या निवडणुकीत ज्यांचा पराभव झाला होता ते रात्री दहाच्या सुमारास कासा पोलिस ठाण्यात आले. पोलिसांच्या दुसर्या तुकडीसह ते मॉब लिंचिंग जिथे झाले त्या ठिकाणी पोहोचले. “आम्हाला वाटेत लॉकडाऊनचे अडथळे दिसले आणि जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा जमाव हे विचारत राहिला की हा इको रस्त्याच्या अडथळ्यापासून आत कशी आली आहे. जे कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करतात त्यांची वाहने जप्त केली जातात आणि ही गाडी त्या भागात फिरत असल्याचे दिसून आले,” असे त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.
गावच्या सरपंच ज्या भाजपाच्या सदस्य आहेत, त्यांनी सांगितले राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याच्या आगमनानंतर जमाव प्रक्षुब्ध बनला. जमावातले काहीजण ‘दादा आला, दादा आला’ म्हणून ओरडू लागले. व्हिडीओ क्लिपमध्ये हल्लेखोरांकडून मागे उभे राहून टी-शर्ट परिधान केलेले हे राष्ट्रवादीचे नेते दिसतात. त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की त्याने लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत इको गाडी उभी होती. “पोलिसांनी पुरेपूर प्रयत्न केला, पण ते पुरुष नशेत होते. तरीही, एका साधूला चौकीच्या आत बसविण्यात आम्ही यशस्वी झालो कारण तो जखमी झाला होता आणि इतर दोघांना दुसर्या पोलिसांच्या गाडीत ठेवले. परंतु, अचानक पोलिस चौकीमधून त्या व्यक्तीला पोलिसांच्या वाहनात घेऊन जात होते, तेव्हा पुन्हा हल्ला सुरु झाला आणि काही मिनिटांत तो संपला.” राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते म्हणाले की घटनास्थळी भेट देण्याचा कोणताही राजकीय हेतू नव्हता आणि जनतेला शांत करण्यासाठी भाजपच्या सरपंचांनी खूप प्रयत्न केल्याचेही त्यांनी कबुली दिली. ते म्हणाले, “परंतु पोलिसांवरही हल्ला करण्यात आला आणि मारहाणही केली गेली आणि आम्ही काहीही करू शकलो नाही.” पोलिस येण्यापुर्वी त्यांना थोडीफार मारहाण झाली होती आणि त्यांच्या गाडीचे नुकसान झाले होते. मात्र पोलिस आल्यानंतर या तिघांची हत्या करण्यात आली, पोलिसांच्या उपस्थितीत तिघांचे मॉब लिंचिंग झाल्याचेही त्यांनी मान्य केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App