विशेष प्रतिनिधी
नागपूर : चेहरा नाही अन् मोहरा नाही, मुकाट कामाला लागा; फुरफुरणाऱ्या नेत्यांच्या इच्छांवर काँग्रेसने फिरवला बोळा!!, असे आज प्रत्यक्ष घडले. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करायला ठाम नकार दिला. Congress rejects announcement of chief ministerial candidate in maharashtra
आत्तापर्यंत महाविकास आघाडीतले शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची उघड मागणी करत होते. त्यामध्ये उद्धव ठाकरे स्वतःच आघाडीवर होते. काँग्रेस नेते छुप्या पद्धतीने आपापल्या मागण्या रेटून धरत होते. शरद पवारांनी मनातली इच्छा बोलून दाखवली नाही, तरी ती इच्छा उघड गुपित होती आणि आहे, पण काँग्रेसने आत्तापर्यंत उघडपणे त्यावर भाष्य केले नव्हते. पण आज नागपुरात मात्र रमेश चेन्निथला यांनी स्पष्ट शब्दांमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करायला नकार दिला. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने काँग्रेस नेत्यांबरोबरच ठाकरे आणि पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनाही, “चेहरा नाही अन् मोहरा नाही, मुकाट कामाला लागा; फुरफुरणाऱ्या नेत्यांच्या इच्छांवर काँग्रेसने फिरवला बोळा!!” याचे प्रत्यंतर आणून दिले.
उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या पहिल्याच मेळाव्यात ष्णमुखानंद हॉलमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा, असे जाहीर भाषण करून शरद पवार आणि काँग्रेसला आवाहन केले होते. परंतु त्यावेळी कुठल्याच बाकीच्या पक्षाच्या नेत्याने त्यावर भाष्य केले नव्हते. आमच्या पक्षाकडे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नाही, असे सांगून शरद पवारांनी नंतर हात झटकले होते, तर पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांना मुलाखती देताना कुठल्याही राज्यात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आधी जाहीर करण्याची काँग्रेसची पद्धत नाही, असे स्पष्ट शब्दांत उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे सुनावले होते.
Assam : आसाम विधानसभेने मुस्लीम विवाह आणि घटस्फोटाशी संबंधित विधेयक केले मंजूर
तरी देखील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातल्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षी नेत्यांची राजकीय फुरफुर बंद झाली नव्हती. काँग्रेसमध्ये नाना पटोले यांचे नाव कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून लाडू लिहिले होते. नंतर ते केकवर लिहिले गेले. बाळासाहेब थोरात यांचीही पोस्टर्स भावी मुख्यमंत्री म्हणून झळकली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार यांची भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स नियमितपणे झळकवली गेली. त्यामुळे नेत्यांच्या सुप्त इच्छा जाहीरपणे पोस्टरवर तरी झळकल्या किंवा माध्यमांमध्ये चर्चिल्या गेल्या.
काँग्रेसचे ठाकरेंना आश्वासन नाही
पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षांमध्ये सर्वात निर्णायक भूमिका घेणाऱ्या काँग्रेस हायकमांडने त्यावर मौन पाळणे पसंत केले होते. अगदी उद्धव ठाकरे हे सहकुटुंब सोनिया गांधी आणि राहुल गांधींना भेटून आले तरी, त्या दोन्ही नेत्यांनी आपल्या मनातले त्यांना काहीही सांगितले नव्हते. त्यांना कुठलेही आश्वासन देखील दिल्याचे अधिकृतरित्या काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याने सांगितले नव्हते. आज मात्र नागपुरात रमेश चेन्नई मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगून महाविकास आघाडीतल्या सर्व महत्त्वाकांक्षी नेत्यांच्या इच्छांवर बोळा फिरवून टाकला.
बाकी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे, बदलापूरची घटना या विषयांवर काँग्रेसच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. महायुती सरकारवर टीका केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोलकत्यातल्या घटनेबद्दल तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली, तशीच बदलापूरच्या घटनेबद्दल करायला हवी होती, असा टोमणा चेन्निथलांनी मारला, पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसच्याच आंदोलनात सहभागी होऊन रमेश चेन्निथला यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या महत्त्वाकांक्षांवर बोळा फिरवून टाकला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App