वृत्तसंस्था
ढाका : ५३ वर्षांपूर्वी दारुण पराभवानंतर बांगलादेशातून (तेव्हाचा पूर्व पाकिस्तान) माघार घेणाऱ्या पाकिस्तानी लष्कराची पुन्हा एंट्री होत आहे. पाक लष्करातील मेजर जनरल रँकच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एक विशेष पथक बांगलादेशच्या सैन्याला प्रशिक्षण देणार आहे. सूत्रांनुसार फेब्रुवारीपासून याला सुरुवात होईल. पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण बांगलादेशातील मेमनशाही छावणीत आर्मी ट्रेनिंग अँड डॉिक्ट्रन कमांड (एटीडीसी) मुख्यालयात होईल.
वर्षभर चालणाऱ्या पहिल्या टप्प्यानंतर बांगलादेशी लष्कराच्या सर्व १० कमांडमध्येही पाकिस्तानचे लष्कर प्रशिक्षण देईल. असे समजते की, पाकिस्तानी लष्कराचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ समितीचे अध्यक्ष जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षणाचा प्रस्ताव पाठवला होता. बांगलादेश लष्करप्रमुख जनरल वकार-उज-जमान यांनी तो स्वीकारत पाक लष्कराला औपचारिक निमंत्रण दिले आहे.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी ५ ऑगस्टला ढाका सोडल्यानंतर लष्करप्रमुख वकार यांच्या निर्देशावरूनच बांगलादेशात मोहंमद यूनुस यांच्या नेतृत्वात हंगामी सरकार स्थापन झाले होते. बांगलादेशात सध्या शक्तीचे केंद्र वकार हेच आहेत.
बदलती स्थिती : हसीनांनी पाकिस्तानी युद्धनौका रोखली, आता एकत्र सराव
पाकिस्तानसोबत बांगलादेशाचे नौदल फेब्रुवारी महिन्यात कराची बंदरावर युद्धसराव करणार आहे. याला अमन-२०२५ असे नाव देण्यात आले आहे. पाकिस्तानकडून दर २ वर्षांत होणाऱ्या या युद्धसरावात बांगलादेश १५ वर्षांनंतर पहिल्यांदाच सहभागी होत आहे. शेख हसीना यांच्या संपूर्ण कार्यकाळादरम्यान बांगलादेश या युद्धसरावापासून दूर राहिला. २०२२ मध्ये तर हसीना यांनी पाकिस्तानी युद्धनौका तैमूरला चितगाव येथे डेरा टाकण्याची परवानगी दिली नव्हती. तैमूरला म्यानमारच्या क्यायुकफू बंदरावर डेरा टाकत इंधन घ्यावे लागले होते.
अमेरिकेने सांगितले, प्रत्येक नागरिकाच्या मानवी हक्कांचे रक्षण करणे कोणत्याही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. यासाठी ठोस पावले उचला. यावर युनूस यांनीही अमेरिकेला मानवी हक्कांचे रक्षण व लोकशाही मूल्ये बळकट करण्याचे आश्वासन दिले.
मानवी हक्कांचे रक्षण करणे सरकारची जबाबदारी
बांगलादेशात अल्पसंख्याकांवर (हिंदू) होणाऱ्या हल्ल्यांबाबत अमेरिकेच्या बायडेन सरकारने बांगलादेशच्या युनूस सरकारला कडक संदेश दिला. सोमवारी रात्री अमेरिकी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी युनूसशी फोनवर चर्चेत मानवी हक्काची बिघडलेली स्थिती व लोकशाहीवर चिंता व्यक्त केली. बांगलादेशने सप्टेंबर-डिसेंबरदरम्यान पाककडून दारूगोळ्याच्या ४० हजार फेऱ्या मागवल्या. गतवर्षी १२ हजार होत्या. २ हजार फेऱ्या टँक ॲम्युनिशन, ४० टन आरडीएक्सही मागवले आहे.
पाकिस्तान-बांगलादेश युती धोक्याची का?
सिलिगुडीत ८० किमी रुंद भारताच्या चिकन नेक कॉरिडॉरवर धोका वाढू शकतो. हा कॉरिडॉर भारताला संपूर्ण ईशान्येशी जोडतो. बांगलादेशात पाकिस्तानच्या एंट्रीनंतर ईशान्येतील कट्टरवादी गटांचे वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे.
बांगलादेश पाकिस्तानकडे का झुकत आहे?
बांगलादेशात नेहमीच पाक समर्थक ताकदी वरचढ राहिल्या. फरक इतकाच आहे की, शेख हसीनांच्या १५ वर्षांच्या सत्तेत त्यांच्यावर लगाम होता, पण बांगलादेशचे लष्करप्रमुख वकार यांनी पाकिस्तानी लष्कर आणि इतर ताकदींसह हसीनांविरुद्ध कट रचला. ५ ऑगस्ट रोजी तिथे जनक्रांती नव्हे, तर सैन्याने तख्तपालट केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App