लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रचाराच्या ऐनभरामध्ये महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरू होती. खुद्द पवारांनी तसेच सूतोवाच केले होते, पण लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पवारांच्या पक्षाची विलीनीकरणाची चर्चा महाराष्ट्रात अचानक कशी काय थांबली??, असा सवाल तयार झाला आहे. Why sharad pawar can’t merge his NCP in the Congress party??
अर्थातच लोकसभा निवडणुकीच्या निकालांची त्याला पार्श्वभूमी आहेच, पण त्या पलीकडे जाऊन पवारांचा लोकसभेतला स्ट्राइक रेट आणि काँग्रेसचा आकडा यात परस्पर विरोध उत्पन्न झाल्याने पवारांच्या पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा थांबलेली दिसते. शेवटी पवार तरी आपला पक्ष काँग्रेसमध्ये का विलीन करणार होते??, त्याची कारणे काय होती??, त्याचा थोडक्यात आढावा घेतला, तर पवारांना मूळात “दुबळ्या” काँग्रेसमध्ये आपला “बळकट” राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीन करायचा होता, हे दिसून येते. त्यात मधल्या मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांची “सेटलमेंट” होऊ शकते का??, हे पवार पाहत होते. कारण काँग्रेस जेवढी दुबळी, संघटनात्मक पातळीवर विस्कळीत, तेवढा पवारांचा राजकीय लाभ किंबहुना पवारांचे तेवढे वर्चस्व क्षेत्र!! हे समीकरण महाराष्ट्रामध्ये पवारांच्या संपूर्ण कारकिर्दीचे एक व्यवच्छेदक लक्षण राहिले.
यात मराठी माध्यमांनी कायम पवारांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाचे “चाणक्य” म्हणून डेकोरेशन केले. त्यांच्या छोट्या-मोठ्या खेळ्यांचे “फ्लॉवरी लँग्वेज” मध्ये वर्णन केले, पण म्हणून पवारांच्या कारकिर्दीची वस्तुस्थिती बदलली नाही. काँग्रेस जेव्हा – जेव्हा “दुबळी” झाली तेव्हा – तेव्हा पवारांचे वर्चस्व वाढले, पण काँग्रेस कायमची दुबळी कधीच झाली नाही. ती टप्प्याटप्प्याने “बाउन्स बॅक” होत राहिली त्यामुळे पवारांच्या वर्चस्वाला सतत हेलकावे खात राहावे लागले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर निकालापूर्वी आणि निकालानंतर काँग्रेसच्या राजकीय अवस्थेत जमीन – आस्मानाचा फरक पडला आहे. 3 जून 2024 पर्यंत महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर फेकली गेलेली काँग्रेस 4 जून 2024 रोजी महाराष्ट्रातल्या पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनली आणि तिथेच पवारांच्या पक्षाच्या विलीनीकरणात “राजकीय माशी” शिंकली!!
काँग्रेस डबल डिजिट जागा जिंकून महाराष्ट्रात प्रबळ झाली. विशाल पाटलांसकट काँग्रेसचा आकडा 14 वर पोहोचली आणि पवारांचा स्ट्राइक रेट जरी 80 % असला तरी खासदारांचा आकडा नेहमीप्रमाणे 8 च राहिला. अशावेळी पवारांच्या पक्षाशी “डील” करणे वेगळे आणि पवारांच्या पक्षाला काँग्रेसमध्ये सामावून घेऊन आपल्याच राजकीय संघटनेत पवारांचा उंट शिरवून घेणे वेगळे!! हे काँग्रेस नेत्यांना निश्चित समजते. (याबाबतीत ते काही भाजपचे नेते नाहीत.) अर्थातच पवारांच्या विलीनीकरणातून “स्व”बळकटीकरण करवून घेण्याला चाप बसला. आता पवारांची आता कितीही इच्छा असली, तरी काँग्रेस आता तेवढी “दुबळी” उरलेली नाही. पवारांचा पक्ष पवारांच्या अटी शर्तींवर काँग्रेसमध्ये विलीन करून घेईल, अशी पक्षाची अवस्था शिल्लक राहिली नाही.
देशपातळीवर काँग्रेस 99 वर पोहोचली. देशातला एक बळकट विरोधी पक्ष बनली. मोदींसमोर तगडे आव्हान काँग्रेसच उभी करू शकते, हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण झाला. अशा “बळकट” काँग्रेस पुढे पवारांचा पक्ष आणि त्यांचे राजकीय कर्तृत्व तोकडेच ठरले, अर्थातच त्यामुळे महाराष्ट्रातील पवारांच्या पक्षाची विलीनीकरण करण्याची चर्चा थांबली. यासाठी पवारांच्या इच्छा आणि ताकदीपेक्षा काँग्रेसची इच्छा आणि ताकद जास्त कारणीभूत ठरली!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App