नाशिक : लोकसभा निवडणूक मोठ्या हिरीरीने लढविलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या तोंडी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचानक एकतर आम्ही तरी राहू, नाहीतर देवेंद्र फडणवीस तरी राहतील, अशी संपण्याची – संपविण्याची भाषा आली. अचानक उद्धव ठाकरे उसळले आणि त्यांनी थेट पक्ष संपण्याची किंवा संपविण्याची भाषा केली. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या “दिव्यदृष्टी” समोर डोळ्यासमोर शेकाप होता काय??, असा सवाल तयार झाला. uddhav thackeray targets fadnavis
शिवसैनिकांसमोर आवेशात भाषण करताना उद्धव ठाकरेंनी रणनीती म्हणून प्रहार जरूर देवेंद्र फडणवीसांवर केला. पण एका निवडणुकीत कोणी संपत नसतो आणि कोणी कोणाला संपवू शकत नसतो, हे उद्धव ठाकरेंना निश्चित माहिती आहे. कारण त्यांना तर देवेंद्र फडणवीसांपेक्षा निवडणुका लढविण्याचा जास्त अनुभव आहे. पण तरी देखील त्यांच्या तोंडी एकतर देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) तरी राहतील, नाहीतर आम्ही तरी राहू, अशी राहण्या – घालवण्याची भाषा आल्यामुळे वर उल्लेख केलेला सवाल तयार झाला.
शिवसैनिकांच्या भावना चेतवण्यासाठी आक्रमक भाषा वगैरे ठीक आहे, पण खरंच कुठला पक्ष असा कोणी बोलले तर संपतो का??, हा ही सवाल तितकाच महत्त्वाचा आहे. पण महाराष्ट्रातला एकूण गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला, तर उद्धव ठाकरे सध्या ज्या आघाडीत आहेत, त्या महाविकास आघाडीचे अध्वर्यू नेते शरद पवार यांच्या वळचणीला गेलेले पक्ष कसे संपले, हे सहजगत्या समजून येते.
आता हेच पहा ना… शरद पवारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांना पाठिंबा देऊन उभे केले, पण त्यांना आमदारांची फक्त 12 मते मिळवून देऊ शकले. जयंत पाटील निवडणुकीत पडले. त्या ऐवजी उद्धव ठाकरे यांनी उभे केलेले त्यांचे पीए मिलिंद नार्वेकर निवडून आले. यात शेकापचे नुकसान झाले. जयंत पाटलांचे राजकीय करिअर थांबले. यात पवारांना किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला काही नुकसान सोसावे लागले नाही.
पण शेतकरी कामगार पक्षाचा हा पराभव केवळ 2024 च्या विधान परिषद निवडणुकीपुरता मर्यादित नाही. शरद पवारांनी पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोद आघाडीमध्ये शेकाप, लाल निशाण पक्ष वगैरे छोट्या पक्षांना घेऊन असे काही गुंडाळले की त्या पक्षांचे अस्तित्वच संपले आणि शरद पवार यांचे वेगवेगळ्या रूपातले नावांचे पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तरंगत राहिले.
उद्धव ठाकरे यांनी आजच्या भाषणामध्ये रणनीती म्हणून देवेंद्र फडणवीस संपतील किंवा आम्ही तरी संपू, अशी भाषा जरी वापरली असली, तरी प्रत्यक्षात त्यांना त्या क्षणी महाराष्ट्राचा राजकीय इतिहास आठवला का??, की आपण सध्या ज्या महाविकास आघाडीत आहोत, त्याचे अध्वर्यू नेते असेच कुणालातरी संपवणार आहेत, हे त्यांना म्हणायचे होते का??, हा कळीचा सवाल आहे.
कारण उद्धव ठाकरे तसे चाणाक्ष आहेत. त्यांना मराठी माध्यमे “चाणक्य” वगैरे बिरूदे लावत नसली, पण गेल्या 30 – 35 वर्षांमध्ये त्यांनी मुंबई महापालिकेवरची आपली पकड ढिली होऊ दिलेली नाही, हे त्यांचे क्रेडिट आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या तोंडी जरी फडणवीसांना किंवा आपल्याच पक्षाला संपविण्याची भाषा आली असली, तरी प्रत्यक्षात त्यांना वेगळेच काही म्हणायचे आहे का आणि त्यांचा अंगुली निर्देश सध्या ते ज्या आघाडीत आहेत त्या महाविकास आघाडीच्या अध्वर्यू नेत्यांकडे आहे का??, हा कळीचा सवाल आहे.
बाकी भाजपच्या नेत्यांनी फडणवीसांच्या आदेशाप्रमाणे प्रतिआक्रमण करून उद्धव ठाकरेंना उत्तर जरूर दिले, पण ते भाजपच्या विशिष्ट मर्यादित कुवतीनुसारच होते. त्यामध्ये मुत्सद्देगिरी वगैरे काही नव्हते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App