डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार धनातील नेमके मुद्दे समजून न घेता हिंदू समाज, हिंदू परंपरा या विरोधात एकांगीपणे बोलत, लिहित राहण्याची सवय अनेकांना जडली आहे. मात्र डॉ. आंबेडकर यांचा काळ आणि आजचे दिवस यातला फरक कोणी लक्षात घेत नाही. याच मुद्द्यावर प्रतिष्ठेचा ‘सरस्वती सन्मान’ या राष्ट्रीय पारितोषिकाचे विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी मौलिक विचार मांडले. The threat of growing fundamentalism in Ambedkarite society due to constant negativity – Opinion of ‘Saraswati Sanman’ Award winning veteran writer Dr. Sharankumar Limbale
विशेष प्रतिनिधी
पुणे : “दलितांनी दलितेतरांच्या श्रद्धा दुखावू नयेत आणि दलितेतरांनी दलितांच्या श्रद्धा दुखावू नयेत. सार्वजनिक जीवनात सामंजस्य आणि सौजन्य महत्त्वाचे ठरते. सतत नकाराच्या भूमिकेमुळे आंबेडकरी समाजात टोकदार कट्टरतावाद वाढीस लागण्याचा धोका आहे. कट्टरतावाद लोकशाहीला मारक असतो. सर्वांनी मिळून समतेने जगण्याची गरज आहे. यातूनच समाज बदलणार आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी केले.
“आपण लोकशाही समाजात राहतो. हा समाज मिश्र स्वरूपाचा आहे. अनेक जाती, धर्म, परंपरा, प्रथा आणि भाषेने भारतीय समाज विणला गेला आहे. ही वीण खूप स्फोटक आणि संवेदनक्षम आहे, हे लक्षात घेतले पाहिजे,” असे डॉ. लिंबाळे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने भारतीय साहित्य विश्वातील प्रतिष्ठेचा सरस्वती सन्मान डॉ. लिंबाळे यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला जाहीर झाल्याबद्दल त्यांचा आणि कादंबरीचे प्रकाशक दिलीपराज प्रकाशनाचे संचालक राजीव बर्वे यांचा माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्या नंतर डॉ. लिंबाळे बोलत होते. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आदी यावेळी उपस्थित होते. रांगोळ्या आणि फुलांच्या पायघड्या घालून तसेच समारंभात पुष्पवृष्टी करून डॉ. लिंबाळे यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. लिंबाळे म्हणाले, “काही दलित लेखकांनी सरस्वतीचे नाव पुढे करून पुरस्कार नाकारण्याची मोहीम सुरू केली आहे. केवळ नकाराच्या आधारे कुठलीही समृद्ध परंपरा निर्माण करता येत नाही.” ते म्हणाले की, मी सरस्वती सन्मान नाकारला असता, तर पुढल्या काळात दलित लेखकांना काही देताना दहा वेळा विचार करावा लागला असता. मला असे होऊ द्यायचे नव्हते.
मला मिळालेला ‘सरस्वती सन्मान’ दलित लेखक म्हणून मिळाला नाही. हा मराठी भाषेला मिळालेला सन्मान मी मराठी लेखक म्हणून स्वीकारला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. देशाने राज्यघटना स्वीकारली आहे, याचाच अर्थ आंबेडकरांना स्वीकारले आहे. आंबेडकरी समाजानेही भारतीय समाजातील सहजीवन जगताना उदार मनाने विविधतेचा स्वीकार केला पाहिजे. ही अपेक्षा बुद्धिवाद्यांकडून करायची नाहीतर कुणाकडून करायची?
ज्येष्ठ साहित्यिका आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या,”सगळी प्रादेशिक आणि भाषिक वैशिष्ट्ये जपत लिंबाळे यांनी अनुभवांची मांडणी त्यांच्या साहित्यात आजवर केली. ते साहित्यातून जे मांडताहेत त्याला या पुरस्काराच्या रूपाने मान्यता मिळाली आहे. ‘सनातन’ या कादंबरीत काळाचा आणि अनुभवाचा विशाल पट आहे.
संस्कृतीची मुळे त्यांनी या कादंबरीत गदागदा हलवली आहेत. भूतकाळाचे धागे तोडून भविष्याचा वेध घेताना त्यांनी परिवर्तनाच्या विचाराशी तडजोड केली नाही. ही कादंबरी विषमतेच्या विषाणूवरची लस आहे.”
प्रा. जोशी यांनी सांगितले की, कोणतीही टोकाची भूमिका समाजाला कडेलोटाकडेच नेणारी असते. ज्या विचारवंतांनी समाजाला दिशा दाखवायची तेच अविवेकाची कास धरून सुसंवाद आणि समन्वयाच्या वाटा बंद करून वैचारिक झुंडशाहीत सामील होणार असतील तर मग समाजाने कोणाकडे आशेने बघायचे. लिंबाळे यांनी विद्रोहाचे रूपांतर कधीही विद्वेषात होऊ दिले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App