“हनुमंता माझ्या मनाला भजनाचा छंद लागो रे”, हे मूळ भजन आहे. पण महाराष्ट्रात सुरू झालेल्या भोंग्यांच्या राजकारणामुळे त्यात शीर्षकाप्रमाणे म्हणजे, “हनुमंता “त्यांच्या” मनाला भजनाचा छंद लागला रे!!”, असा फेरबदल करावा लागला आहे. जे राज ठाकरे शरद पवारांच्या दृष्टीने अजिबात दखल घेण्यासारखे नाहीत, त्याच राज ठाकरे यांनी अख्ख्या महाराष्ट्र सरकारला आपली दखल घेणे भाग पडले आहे.Thackeray – Pawar Govt has to bow before Raj Thackeray over the issue of loudspeakers over the mosques
– नाशकात मनसेच्या भोंग्यांना चाप
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक रजनीश सेठ तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची बैठक झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र धार्मिक स्थळांवर भोंग्यांना परवानगी लागणार असल्याचे वक्तव्य दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे, पण त्या आधीच मध्यरात्रीपासून नाशिकच्या पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी मनसेच्या भोंग्यांना चाप लावणारा आदेश काढला आहे. मशिदींसमोर 100 मीटरच्या आत भोंगे लावता येणार नाहीत. भोंगे लावले तर 4 महिन्यांचा तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा भोगावी लागेल, असा इशारा दीपक पांडे यांनी मध्यरात्री काढलेल्या पोलीस पत्रकात देण्यात आला आहे. आता तोच पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्याची ठाकरे – पवार सरकारचे चर्चा सुरू झालेली दिसते.
– अजित दादा – सुप्रियांची आरती, नाना रोज म्हणतात हनुमान चालीसा!!
पण एकूण राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांचा विषय महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मैदानात आणला आणि त्यावरून ठाकरे – पवार सरकारला ॲक्शन मोडमध्ये यावे लागले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपण रोज हनुमान चालीसा म्हणतो, असे जाहीर करून टाकले, तर आणि राज ठाकरे यांच्यावर नेहमीप्रमाणे टीका करताना ते धर्मिक तेढ निर्माण करण्याचे राजकारण करत आहेत, असा आरोप केला. महाराष्ट्रात रामनवमी आणि हनुमान जयंती च्या मिरवणूक यांच्या निमित्ताने दंगल घडवायचे षडयंत्र होते असा आरोप संजय राऊत यांनी केला होता त्याचाच पुनरूच्चार आज नाना पटोले यांनी केला.
– भोंग्यांवर धर्मनिरपेक्ष स्टाईलने बंदी
एकीकडे शरद पवार हे राज ठाकरे अदखलपात्र आहेत असे म्हणत होते. पण त्यांची दखल सर्वच राजकीय पक्षांना एवढी घ्यावी लागली की अजित दादा, सुप्रिया सुळे हे हनुमान जयंतीला हनुमान मंदिरात जाऊन आरती करताना दिसले. संपलेल्या पक्षावर मी बोलत नाही, असे सांगणारे आदित्य ठाकरे रोज राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दिसले. नाना पटोले आपण रोज हनुमान चालीसा वाचतो, असे पत्रकारांना सांगताना दिसले आणि शेवटी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन भोंग्यांवर आपल्या धर्मनिरपेक्ष स्टाईलने का होईना पण काही निर्णय घ्यावा लागला. यामुळेच “हनुमंता त्यांच्या मनाला भोंग्यांचा छंद लागला रे”!! असे म्हणणे भाग पडले…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App