नाशिक : 2024 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मराठी माध्यमे गौरवांकित चाणक्यांचा फक्त 11 आमदारांमध्येच सगळा खेळ आटोपला आणि कारकिर्दीच्या अखेरीस त्यांचा “लोवेस्ट परफॉर्मन्स” राहिला!! आत्तापर्यंतच्या राजकीय कारकीर्दीत शरद पवारांचा इतका तळातला परफॉर्मन्स कधीच राहिला नव्हता.Sharad pawar’s lowest performance in his tenure
उलट शरद पवारांनी किती वेळा काँग्रेस सोडली आणि नवीन पक्ष स्थापन केले, तरी पवारांच्या पक्षाचे 50 ते 60 आमदार हमखास निवडून यायचे. मुंबईच्या राजकीय वर्तुळातले पत्रकार त्यांना 60 आमदारांचे “पॉलिटिकल मिसाईल” म्हणायचे. खुद्द पवारांनाही त्याचा अभिमान होता. अनेकदा ते भाषणामध्ये, जे गेले त्यांना जाऊ द्या, आपण नव्याने माणसं निवडून आणू. 1980 च्या निवडणुकीत 52 आमदारांनी माझी साथ सोडली होती, ते सगळे पडले आणि नवे 52 आमदार निवडून आले, असे पवार 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील म्हणाले होते. आपण आपला पक्ष मोडून पुन्हा उभा करू शकतो. आपल्याला हवी ती माणसे पाडू शकतो आणि हवी ती माणसे निवडून आणू शकतो, असा पवारांना आत्मविश्वास होता, पण 2024 च्या निवडणुकीने तो “आत्मविश्वास” नसून तो “अहंकार” किंवा “दर्प” असल्याचे सिद्ध केले.
2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पवारांनी जंग जंग पछाडले. मनोज जरांगे नावाचे “राजकीय बुजगावणे” पुढे आणले. हिंदुत्वाच्या अजेंड्याला छेद देण्यासाठी मराठा आरक्षण आणि जातनिहाय जनगणनेचा अजेंडा पुढे सरकवला. तो राहुल गांधींच्या तोंडून अख्ख्या महाराष्ट्रात वदवला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पवारांबरोबर राहिलेले बडे – बडे आमदार धापदिशी पडले. पोस्टर वरचे मुख्यमंत्री तसेच पोस्टर वर राहिले. ते साधे आमदार देखील झाले नाहीत. पवार आपल्या माणसांना निवडून आणू शकले नाहीत.
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स चांगला राहिला होता. पवारांना त्यावेळच्या स्ट्राईक रेटचा “अभिमान” वाटला होता. कारण पवारांनी त्यावेळी 48 पैकी 10 जागा लढवून 8 खासदार निवडून आणून दाखवले होते. त्या बळावर ते विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांना हवे तसे वाकवू पाहत होते. त्यामध्ये काही प्रमाणात पवार यशस्वी झाले. पण विधानसभा निवडणुकीतल्या परफॉर्मन्सच्या धक्क्याने पवारांचे सगळेच मनसूबे उद्ध्वस्त केले.
प्रभू चावलांचे भाकीत
आज तकचे प्रबंध संपादक प्रभू चावलांनी लोकमत मध्ये लेख लिहून शरद पवार हे जखमी वाघ असल्याचे नमूद केले होते. जखमी वाघ नेहमीच धोकादायक असतो. त्यामुळे महायुतीला महाराष्ट्रात खूप त्रास होईल, असे भाकीत चावलांनी वर्तविले होते. पण त्याच लेखांमध्ये पवारांच्या राजकारणाविषयी एक सटीक निरीक्षण प्रभू चावलांनी नोंदविले होते, ते म्हणजे काल-परवापर्यंत थेट पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेले शरद पवार आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस आपल्या पक्षाची छोटी जहागिरी बचावण्याच्या मागे लागले आहेत, असे चावलांनी लिहिले होते. ते तंतोतंत खरे ठरले, पण पवार छोटी जहागिरी देखील वाचवू शकले नाहीत. कारकीर्दीच्या अखेरीस त्यांना आपण निर्माण केलेल्या पक्षाचा 11 ते 15 आमदार निवडून आणायचा “लोवेस्ट परफॉर्मन्स” पाहावा लागला. “मनातले मुख्यमंत्री’ तर “मनातच” राहिले. शिवाय पोस्टरवरचे मुख्यमंत्री देखील पवार खाली आणू शकले नाहीत.
संघटनेचा माणूस असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा मनसूबा पवारांनी आखला होता. पण पवारांची स्वतःचीच कारकीर्द अखेरच्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या मतदारांनी उद्ध्वस्त केली. मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी 2014 2019 आणि 2024 या सलग तीन निवडणुकांमध्ये मराठी माध्यमांनी गौरविलेल्या चाणक्यांवर खऱ्या अर्थाने मात करून दाखविली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App