विशेष प्रतिनिधी
मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र त्यात काहीच तथ्य नव्हते. असा दावा आता केला जातोय. मग शिवसेना नेते संजय राऊत यांनी काय फक्त मातोश्री आणि सिल्वर ओकवर नुसत्या फेऱ्या मारल्या की कारमध्ये बसून शतपावल्या केल्या, अशी मिश्कील आणि खोचक चर्चा सोशल मीडियावरून सुरू आहे. sharad pawar – uddhav thackeray discussed assembly speaker election at varsha
संजय राऊतांच्या मातोश्री आणि सिल्व्हर ओक या बंगल्यांच्या फेऱ्या झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी ठाकरे आणि पवार यांची वर्षा बंगल्यावर सुमारे तासभर चर्चा झाली. यामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाचा मुद्दा चर्चेत होता असे सांगण्यात येते. त्याच बरोबर महामंडळांच्या नियुक्त्या यावर तसेच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या वर्तणूकीवर देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. जयंत पाटलांच्या वर्तणूकीवर मुख्यमंत्र्यांचा आक्षेप होता. पवारांनी त्याचा खुलासा केला.
गेल्या काही महिन्यांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे राजकीय संबंध दुरावल्याच्या खाणाखुणा दिसू लागल्या आहेत. प्रताप सरनाईक, अजय चौधरी आणि विजय शिवतारे या शिवसेना आमदारांचे काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जाहीरपणे वाजले आहे. प्रताप सरनाईकांनी उघडपणे भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला आहे. अजय चौधरी – जितेंद्र आव्हाड़ यांच्यात वाद झालाय. शरद पवारांच्या हस्ते म्हाडाचे निवास टाटा रूग्णालयाला उपलब्ध करून देण्यात आले. तो निर्णय उध्दव ठाकरे यांनी फिरवला. या पार्श्वभूमीवर शिवसेना – राष्ट्रवादी संबंध आलबेल नाहीत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्षपद सोडले. ते पवारांना आवडले नव्हते. पण त्यांना तो निर्णय स्वीकारावा लागला. आता दुसऱ्या नेत्याला त्यातही पुणे जिल्ह्यातील संग्राम थोपटे यांना विधानसभेचे अध्यक्षपद देण्याचे काँग्रेसमध्ये घाटत आहे. पवारांच्या पुणे जिल्ह्याच्या राजकारणात थोपटे बसत नाहीत. कारण ते पवारांचे कट्टर विरोधक अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव आहेत.
अशा स्थितीत विधानसभा अध्यक्षांची निवडणूक विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात घेण्याचा निर्णय शरद पवारांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या गळी उतरविल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे होत आली तरी अद्याप महामंडळांचे वाटप झालेले नाही. महामंडळाचे वाटप करून सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील दुसऱ्या फळीतील इच्छुक नेत्यांना दिलासा देण्याची मागणी सातत्याने होत आहे. तरच आमदार पक्षात टिकतील. या पार्श्वभूमीवर पवार आणि ठाकरे यांच्या भेटीत चर्चा झाल्याचे समजते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App