राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ अशी फूट पडल्यानंतर शरदनिष्ठ गटाच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसत्ताच्या संवाद कार्यक्रमात या चर्चेला हवा दिली. पण या चर्चेतून एक महत्त्वाचा मुद्दा निसटला, तो म्हणजे शरद पवार गटाचे विलीनीकरण करून काँग्रेस पवारांच्या विश्वासार्हतेच्या तुटीचे राजकारण स्वतःवर का ओढवून घेईल??, हा आहे. Sharad pawar NCP merger with Congress??; why would Congress leadership take responsibility of trust deficit of sharad pawar??
बाकीची 1999 ची शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यातल्या राजकीय वैराची बाब सोडून द्या. ती इतिहासजमा करून टाका. पण राष्ट्रवादी काँग्रेसची विद्यमान राजकीय अवस्था लक्षात घेता, काँग्रेसचे मुरब्बी वरिष्ठ नेतृत्व पवारांसारख्या विश्वासार्हतेच्या तुटीचे राजकारण करणाऱ्या नेत्याच्या गटाला आपल्या पक्षात विलीन करून घेऊन स्वतःची डोकेदुखी वाढवेल आणि पवारांना पुन्हा “उभे” राहण्याची संधी देईल, असे कोणाला वाटूच कसे शकते??, हा मूलभूत मुद्दा आहे!!
– काँग्रेस बऱ्या स्थितीत
काँग्रेसची राजकीय अवस्था देशात कितीही गलितगात्र असली, तरी ती इतर प्रादेशिक पक्षांच्या तुलनेत कितीतरी बरी आहे. ती अवस्था 2014 सारखी निश्चित नाही. किंबहुना राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतून काँग्रेस संघटनेत इतर कोणत्याही पक्षापेक्षा नवीन जान फुंकली गेली, ही देखील वस्तुस्थिती आहे. कर्नाटकच्या विजयाने काँग्रेसचा हुरूप वाढला आहे. देशपातळीवर मोदींना हरवण्यासाठी काँग्रेसला इतर प्रादेशिक पक्षांच्या सहाय्याची गरज निश्चित आहे, पण ते सहाय्य काँग्रेसच्या गळ्याला फास बसणारे असू नये, एवढी राजकारणाची जानकारी काँग्रेसचे नेतृत्व निश्चित राखून आहे.
पाऊस प्रयोगाची क्षमता संपली
त्या उलट पवारांची आजची राजकीय अवस्था उद्धव ठाकरे सारखी किंबहुना त्यांच्यापेक्षा केविलवाणी झाली आहे. मग त्यांचे समर्थक त्यांना 83 वर्षाचे योद्धा म्हणोत की आणखी काही!! पवारांचे पावसात भिजण्याचे प्रयोग कार्यकर्त्यांना आकर्षित करतीलही पण आता मतदारांना ते आकर्षित करण्याची शक्यता कमी आहे. कारण ते प्रयोग जुने झाले आहेत. मतदारांना सातत्याने काहीतरी नवीन लागत असते. पावसाच्या प्रयोगाची ती क्षमता संपली आहे.
शरदनिष्ठ राष्ट्रवादीतून थांबेना गळती; माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते अजितनिष्ठ राष्ट्रवादीची वाट धरती!!
पवारांच्या वर्मावर बोट
पण त्या पलीकडे जाऊन एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित होतो, तो म्हणजे राष्ट्रवादीतला अजितनिष्ठ गट आता थेट पवारांच्या वारसांवर म्हणजेच वर्मावर बोट ठेवायला लागला आहे. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांनी अनुक्रमे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून आपण त्यांच्यामुळे पवारांपासून बाजूला झाल्याची कारणे सांगितली आहेत. अजितनिष्ठ गटाकडून सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर हल्ले वाढणार आहेत, याची ही राजकीय चुणूक आहे. मोदींना अपेक्षित असा हा प्रादेशिक घराणेशाहीवरचा आघात आहे.
अशा स्थितीत काँग्रेस शरदनिष्ठ गटाला आपल्यात विलीन करवून घेऊन सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांवर होणारे प्रखर हल्ले स्वतःच्या पक्ष संघटनेवर का ओढवून घेईल?? त्याचे कारण काय?? काँग्रेस पक्षात आधीच अनेक संकटे असताना आणि गटातटाची भांडणे संपत नसताना शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसला मूळ काँग्रेस पक्षात विलीन करून घेऊन काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व स्वतःला नव्या संकटात टाकेल, की आहे त्या संकटातूनच मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल?? हा प्रश्न विलीनीकरणाच्या बातम्या सोडणाऱ्यांना पडणारा नसला तरी काँग्रेस नेतृत्व या प्रश्नावर निश्चित विचार करणारे आहे.
पवारांचा शक्तिक्षय काँग्रेसच्या पथ्यावर
पवारांनी आपली राष्ट्रवादी काँग्रेस खरं म्हणजे काँग्रेसच्याच वटवृक्षावर आघात करून पोसली. महाराष्ट्रात गेली दोन दशके पवारांनी काँग्रेसचेच राजकीय शोषण करून राष्ट्रवादी काँग्रेस बळकट केली. मग जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले होऊन तिची शक्ती परस्पर क्षीण होत आहे, तेव्हा पवारांसारख्या विश्वासार्हतेची तूट असलेल्या नेत्याला आपल्यात विलीन करून घेऊन त्यांची शक्ती काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व का वाढवेल??, हा प्रश्न नको का पडायला?? हा प्रश्न ज्याला पडला त्याला त्याचे उत्तर सापडेल आणि ते काँग्रेसच्या नेतृत्वाच्या मुरब्बी वर्तणूक आणि खेळीचेच असेल यात शंका नाही!!… कारण काँग्रेस संघटनेची शक्ती सध्या कमी आहे, पण काँग्रेस नेतृत्वाच्या बुद्धीची शक्ती प्रादेशिक कुवतीच्या नेत्यांएवढी कमकुवत झालेली नाही…!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App