विशेष प्रतिनिधी
मुंबई : Rajan Salvi शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षातील उपनेते पदाचा आज राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या उपनेते पदाच्या राजीनाम्यानंतर यावर आता शिक्कामोर्तब होत आहे. तसेच राजन साळवी हे गुरुवारी दुपारी शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे समजते.Rajan Salvi
राजन साळवी हे शिवसेनेचे विशेषतः मातोश्रीशी एकनिष्ठ नेते अशी त्यांची ओळख होती. मात्र, अलीकडच्या काळात विनायक राऊत यांच्याशी त्यांचा वाद झाला आणि उद्धव ठाकरे यांनी देखील विनायक राऊत यांचीच बाजू उचलून धरल्याने राजन साळवी यांचे मन दुखावले होते. यामुळेच त्यांनी आता ठाकरे गटाला रामराम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते.
राजन साळवी यांच्या उपनेते पदाच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, जे पक्षात येतील त्यांचे स्वागतच आहे. कारण गेल्या अडीच वर्षांमध्ये बाळासाहेबांच्या, आनंद दिघेंच्या विचारांच्या शिवसेनेत आमदार, खासदार, नगरसेवक तसेच अनेक नेते शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांना बाळासाहेबांची शिवसेना पुढे न्यायची आहे, वाढवायची आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर आम्ही सत्ता स्थापन केली. अडीच वर्षे आम्ही जे काम केले ते लोकांना माहीत आहे आणि म्हणून विश्वास लोक दाखवत आहेत कामावर, हे काम करणारे सरकार आहे घरी बसणारे नाही. हे रिजल्ट देणारे सरकार आहे फील्डमध्ये उतरून 24X7 काम करणारे सरकार आहे.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्या मुख्यमंत्री काळात एवढे निर्णय आम्ही घेतले, एवढे प्रकल्प आम्ही सुरू केले, कल्याणकारी योजना लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ असे अनेक निर्णय आम्ही घेतले. विकासाचा अजेंडा घेऊन जाणारे आमचे सरकार आणि शिवसेना आहे आणि म्हणून शिवसेनेत अनेक नेते येत आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही राजन साळवी राहिले होते एकनिष्ठ
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर अनेक आमदार शिंदे गटात गेले होते. यावेळी मोजके आमदारच उद्धव ठाकरे यांच्या बाजूने एकनिष्ठेने उभे होते, यात राजन साळवी यांचा समावेश होता. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यावर राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईला देखील सामोरे जावे लागले होते. तरी देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती.
राजन साळवींचे मन दुखावले
राजन साळवी मातोश्रीचे निष्ठावंत अशी त्यांची ओळख आहे. मात्र, त्यांनी ठाकरे गटाला सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यामागे विधानसभा निवडणुकीच्या वेळेस झालेला विनायक राऊत यांच्याशी वाद. तसेच या वादानंतर उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांची बाजू उचलून धरली. या कारणामुळे राजन साळवी यांचे मन प्रचंड दुखावले होते. विधानसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी राजन साळवी यांना मदत केली नाही आणि अखेर त्यांचा पराभव झाला होता. यावर चर्चा करण्यासाठी विनायक राऊत आणि राजन साळवी मातोश्रीवर गेले होते. तेव्हा तुम्हाला दुसऱ्या पक्षात जायचे असेल तर दरवाजे उघडे आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राजन साळवी यांनाच सुनावले होते. दुखावलेल्या मनाने अखेर राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता शिंदे गटाची कोकणात आणखी ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App