नाशिक : उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या टोकाच्या विरोधापोटी महाराष्ट्राच्या राजकारणात पिकवली जातेय विश्वासघाताची पोळी!!, हे सत्य स्वीकारण्याची वेळ महाराष्ट्रातल्या दोन दिवसात मधल्या घडामोडींनी आली. शरद पवारांनी राजधानी नवी दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्कार देऊन गौरव केला. पवारांनी हा बाण भाजपच्या दिशेने सोडला होता, पण त्यामुळे उद्धव ठाकरेंची सेना घायाळ झाली. संजय राऊत यांनी उतावीळपणे एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच शरद पवार यांना “टार्गेट” केले. शरद पवारांच्या समर्थकांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले. फक्त सुषमा अंधारे संजय राऊत यांच्या बाजूने उभ्या राहिल्या.BJP in Maharashtra instigating Pawar politics of betrayal
पण दरम्यानच्या काळात शरद पवारांचे “प्रॅक्टिकल पॉलिटिक्स”, शिंदेंची स्तुती करून पवारांनी अजितदादांना “मेसेज” दिला वगैरे मखलाशी “पवार बुद्धीच्या” विश्लेषकांनी केली, जी बिलकुलच खरी नव्हती, त्या उलट संजय राऊत यांनी पवारांवर केलेली टीका ही वास्तववादी आणि खरी होती. पण न्यूज चॅनेल समोर रोज सकाळी बडबड करून राऊतांनी विश्वासार्हता गमावल्यामुळे त्यांनी पवारांवर केलेली टीका लोकांना खरी वाटली नाही.
या सगळ्या राजकारणात भाजपने मजा घेतली. जे काही राजकारण चालायचे, ज्या काही कुरघोड्या चालायच्या, त्या दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादीमध्ये चालू द्या. आपण आपले राजकारण संघटनात्मक पातळीवर बळकट करून चालू ठेवू, असा पवित्रा भाजपच्या नेतृत्वाने घेतला. म्हणूनच चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस या नेत्यांनी मोजक्या शब्दांमध्ये प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आपले सगळे लक्ष भाजपच्या सदस्य नोंदणीवर केंद्रित केले. हे सगळे जरी खरे असले तरी एकूण पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात “परत आणण्याचा” अवसान घातकी प्रकार भाजपच्याच नेतृत्वाने सुरू ठेवला. वास्तविक महाराष्ट्रातल्या मतदारांनी पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ विरोधी बाकांवर बसवून ठेवले असे नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या कुठल्याही भूमिकेतून सरळ – सरळ हद्दपार केले होते. कारण १० आमदारांच्या बळावर पवारांना त्यांचे तथाकथित कुठलेच “चाणक्य डाव” टाकता आले नव्हते. ते “डाव” शिंदेंच्या सत्काराच्या निमित्ताने पवारांना टाकता आले. त्याला भाजपच्या नेत्यांचीच फूस राहिली.
पवारांनी शिंदेंचा सत्कार केला म्हणून राऊत चिडले आणि ते पवारांवर अद्वातद्वा बोलले. राऊतांनी रोज माईक पुढे येऊन बडबड केल्याने त्यांची विश्वासार्हता रसातळाला पोहोचली. त्यामुळे त्यांनी पवारांवर केलेल्या टीकेवर कुणी विश्वास ठेवला नाही म्हणून राऊतांनी मांडलेले सगळेच मुद्दे खोटे म्हणायचे देखील कारण नाही. कारण खुद्द पवारांची राजकारणाची स्टाईल आणि त्यांची राजकीय विश्वासार्हता संजय राऊत यांच्यापेक्षा फार वेगळी नाही. किंबहुना पवारांचे राजकारण हे विश्वासघाताचे राहिल्याचा इतिहास, वर्तमान आणि अनुभवाअंती भविष्य आहे. पण केवळ ठाकरे आणि काँग्रेस यांच्या टोकाच्या विरोधापोटी पवारांच्या विश्वासघातकी राजकारणाची पोळी भाजप पिकू देत आहे. पवारांना “पुढे चाल” दिली, तर ते काँग्रेस आणि ठाकरे या दोघांनाही त्यांच्याबरोबरच राहून संपवतील आणि आपला मार्ग मोकळा करतील, असा भाजपचा यातला होरा आहे. यापलीकडे पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या केलेल्या सत्काराच्या राजकारणाला दुसरा अर्थ नाही.
– पवारांचा “अँटी मिडास टच” शिंदे सेनेला घातक
एकनाथ शिंदे यांनी देखील पवारांच्या सत्काराने हुरळून जाऊन पवार आपल्यावर गुगली टाकणार नाहीत, असा “विश्वास” व्यक्त केला. पण ज्यांचे राजकारणच मूळात “बाय नेचर” विश्वासघाताचे आहे, ते विश्वासघात केल्याशिवाय राहतील का??, असा साधा सवाल देखील शिंदेंच्या मनात आला नाही. शिंदेंचे दोन शिलेदार खासदार पवारांच्या भेटीला पोहोचले होते. पवारांशी जवळीक साधण्याचे हे सगळे राजकारण शिंदे सेनेच्या दृष्टीने फार घातक ठरण्याची शक्यता आहे. केवळ उद्धव ठाकरेंच्या टोकाच्या विरोधाच्या भूमिकेमुळे पवारांच्या फार जवळ जाणे हे शिंदे सेनेला परवडणारे नाही. कारण पाच वर्षांपूर्वी भाजपला सोडून पवारांच्या जवळ जाण्याची राजकीय चूक उद्धव ठाकरेंनी केली आणि अडीच वर्षांमध्ये सत्ता कायमची गमवायची पाळी उद्धव ठाकरेंवर आली. पवारांच्या “अँटी मिडास टच” मुळे हे घडले. आता हा “अँटी मिडास टच” शिंदे सेनेला लागतोय. त्यातून शिंदे सेनेचे पुढच्या अडीच ते पाच वर्षांचे भवितव्य काय असेल??, हे सांगायला फार मोठ्या ज्योतिष विषयक अभ्यासाची गरज नाही. उद्धव ठाकरेंना आलेल्या अनुभवातून शिकण्यासारखे बरेच काही आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App