विशेष प्रतिनिधी
मुंबई : इकडे महाराष्ट्रातील 3 पक्षांच्या महाविकास आघाडीला लागलाय सुरंग, पण “इंडिया” आघाडीत 26 ऐवजी 30 पक्षांच्या बैठकीची चाललीय तयारी!!, असे विसंगत राजकीय चित्र महाराष्ट्रात तयार झाले आहे.Political contradictions emerge in maharashtra, sharad pawar’s move creates suspicion in mva
शरद पवार – अजित पवार यांच्या भेटीगाठीतून शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर ठळक प्रश्नचिन्ह तर लागले आहेच, पण त्या पलीकडे जाऊन भाजपशी प्रामाणिकपणे लढा देणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने राष्ट्रवादीतल्या शरद निष्ट गटाला आघाडीतून रामराम करण्याची तयारी चालू केली आहे. शरद पवार भाजपला तोंडी विरोध करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत भाजपबरोबर जाणार नाही, असे ते रोज सांगत आहेत किंबहुना त्यांना रोज तसा खुलासा करावा लागतो आहे. पण तरी देखील अजित पवार आणि त्यांच्या भेटीगाठी मात्र बिलकुल थांबलेल्या नाहीत. उलट नातेसंबंध टिकवण्याचा मुलामा त्याला पवार कुटुंब देत आहे.
पण पवारांच्या या दुहेरी खेळीमुळेच काँग्रेस आणि शिवसेनेचा ठाकरे गट आधी सावध आणि आता आक्रमक झाले आहेत. नाना पटोले यांनी तर पवारांना उघडच इशारा देऊन टाकला आहे. इतकेच नाही तर आत्तापर्यंत पवारनिष्ठ राहिलेले शिवसेनेतले संजय राऊत हे देखील आता उघडपणे पवारांवर टीका करू लागले आहेत. अर्थात पवार असल्या इशारांना आणि टीकेला घाबरतील असे नाही, पण पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेवर मात्र या निमित्ताने ठळक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
काँग्रेस – ठाकरेंची स्वतंत्र लढण्याची तयारी
त्यामुळे सावध पवित्रा घेत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी पवारांना वगळून स्वतंत्रपणे एकत्र लढण्याची तयारी चालवली आहे. संपूर्ण विरोधकांची “पॉलिटिकल स्पेस” पवारांना मिळून देण्याचा चंग आता काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंनी बांधला आहे.
येत्या 31 ऑगस्ट रोजी “इंडिया” आघाडीच्या 26 पक्षांची बैठक मुंबईत होत आहे. त्याची जबाबदारी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी घेतली आहे. 26 ऐवजी 30 पेक्षा जास्त पक्ष या बैठकीत सहभागी होतील, असा दावा खुद्द पवारांनी केला आहे. पण एकीकडे महाराष्ट्रातली 3 पक्षाची आघाडी सुरुंग लागून फुटत आहे आणि दुसरीकडे 30 पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीची तयारी सुरू आहे, ही राजकीय विसंगती महाराष्ट्रात तयार झाली आहे.
नितीश कुमारांच्या महत्त्वाकांक्षेला टाचणी
त्याखेरीज “इंडिया” आघाडीच्या संयोजक पदासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार उतावीळ झाले असताना त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला मुख्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाचणी लावल्याची बातमी समोर आली आहे. “इंडिया” आघाडीतील कोणत्याही घटक पक्षाच्या प्रमुखाला आघाडीचे संयोजक पद देऊ नये, अशी गळ उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला घातल्याचे समजते. त्यामुळे 31 ऑगस्टच्या बैठकीत इंडिया आघाडीचा संयोजक ठरणार की नाही याविषयी शंका तयार झाली आहे.
पण एकीकडे महाविकास आघाडीत 3 पक्षांमध्ये संशयाचा सुरूंग आणि दुसरीकडे 30 पक्षांच्या “इंडिया” आघाडीच्या बैठकीची तयारी या राजकीय विसंगतीला ठाकरे, पवार आणि पटोले कसे तोंड देणार आणि मूळात 31 ऑगस्टची “इंडिया” आघाडीची बैठक मुंबईत होणार की नाही?, ती झालीच तर ती किती यशस्वी ठरेल? याविषयी संशयाचे दाट मळभ तयार झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App