नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस वर पूर्ण नियंत्रण मिळवायसाठी पवार कुटुंबीयांची धडपड; ज्येष्ठ नेते बाजूलाच होत नाहीत म्हणून सगळी तडफड!!, हेच राजकीय वास्तव सुनेत्रा पवारांच्या आणि रोहित पवारांच्या राजकीय हालचालींमधून आणि वक्तव्यांमधून समोर आली.
सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद स्वीकारून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या राजकीय खच्चीकरणाचा “डाव” खेळला. पार्थ पवार आणि जय पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वाची पदे देऊन आपल्याच कुटुंबात सगळी राजकीय नियंत्रणाची सूत्रे राहतील, याची “व्यवस्था” केली. त्यासाठी क्लेरिकल मिस्टेक वगैरेंच्या बाता मारल्या. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस मधून परस्पर बाजूला होतील, अशा अटकळी बांधल्या.
पण तटकरे आणि पटेल हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाजूला झालेच नाहीत. उलट त्यांनी सुनेत्रा पवारांबरोबर कार्यक्रम घेऊन आपण राष्ट्रवादी बरोबरच असल्याचे ठळकपणे दाखवून दिले. एका अर्थाने तटकरे आणि पटेल यांनी सुनेत्रा पवारांचा राजकीय डाव उधळून लावला. सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांचा रायगड मध्ये कार्यक्रम घेतला, तर प्रफुल्ल पटेल हे सुनेत्रा पवारांसमवेत गुवाहाटी मध्ये हेमंत विश्वशर्मा यांच्या शपथविधी समारंभात सामील झाले.
– पटेल, तटकरेंबरोबर कार्यक्रम लागले करावे
सुनेत्रा पवारांनी जरी आपल्याच दोन मुलांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अतिरिक्त महत्त्व दिले, तरी त्यांचे संपूर्ण पक्षावर राजकीय नियंत्रण प्रस्थापित होऊ शकले नाही. त्यांना सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सामील व्हावेच लागले. तिथे पार्थ पवारनांही सोबत न्यावे लागले. गुवाहाटीतल्या शपथविधी समारंभात सुनेत्रा पवारांची खुर्ची केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या शेजारी ठेवली होती. त्यामुळे त्यांना नायडू यांच्या शेजारीच बसावे लागले. अजित पवारांचा विमान अपघात झाल्यानंतर रोहित पवार आणि बाकीच्या नेत्यांनी राम मोहन नायडू यांचा राजीनामा मागितला होता, या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांची खुर्ची राममोहन नायडू यांच्या शेजारी असणे आणि सुनेत्रा पवारांनी राम मोहन नायडू यांच्या शेजारीच बसणे याला वेगळेच राजकीय परिमाण मिळाले. रोहित पवारांनी खोचकपणे ट्विट करून सुनेत्रा पवारांना आणि त्यांच्या टीमला टोचले. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी गुवाहाटीतून मुंबईला येताना सुनेत्रा पवार यांच्या विमानाच्या ऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्या विमानातून प्रवास केला. सुनील तटकरे यांनी गुवाहाटीतून मुंबईत आल्यानंतर सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली.
– रोहित पवारांनी सोडली नवी पुडी
पण आज रोहित पवारांनी पवार कुटुंबीयांचा पुढचा “डाव” टाकून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे 22 आमदार घेऊन भाजपमध्ये जातील, असा दावा केला. घड्याळाच्या राष्ट्रवादीतले 22 आणि एकनाथ शिंदे यांचे काही आमदार असे एकूण 40 आमदार भाजपकडून लढतील, असे रोहित पवार म्हणाले. एक प्रकारे रोहित पवारांनी तटकरे आणि पटेल यांना भाजपच्या दिशेने ढकलायचा “डाव” खेळला. पण सुनील तटकरे यांनी रोहित पवारांच्या वक्तव्याला “महत्त्व” देत नसल्याचे सांगून एका झटक्यात त्यांची राजकीय किंमत उतरवून टाकली, तर सुरज चव्हाण राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी रोहित पवारच चार आमदार घेऊन काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा गौप्यस्फोट केला.
– राष्ट्रवादीवर नियंत्रण मिळविण्यासाठी धडपड
या सगळ्या राजकारणात पवार कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेस वर संपूर्ण नियंत्रण मिळवायची धडपड उघड्यावर आली. सुनेत्रा पवारांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल त्याचबरोबर डिझाईन बॉक्सचे प्रमुख सुनील अरोरा यांचा उपमुख्यमंत्री पद मिळण्यासाठी वापर केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर बसण्यासाठी सुद्धा त्यांचे सहाय्य घेतले पण एकदा ती पदे मिळाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी सुनील अरोरा, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना बाजूला फेकण्याचा “डाव” खेळला. डिझाईन बॉक्स कंपनीचे मालक सुनील अरोरा हे व्यावसायिक राजकारणी नसल्याने सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी पासून बाजूला झाले पण प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे बिलकुल बाजूला झाले नाहीत. उलट त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत पार्थ पवारांनी घोडे पुढे दमटवलेल्या उमेदवाराला मागे सारले. सुनेत्रा पवारांनी क्लेरिकल मिस्टेक मधून काढून टाकलेली पदे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी परत मिळविली.
– पवार आणि सुप्रिया शक्तिशाली नाही उरले
हे पाहूनच रोहित पवारांनी आज घड्याळाच्या राष्ट्रवादीचे 22 आमदार भाजपमधून लढणार असल्याची पुडी सोडली. पण या सगळ्या राजकारणातून त्यांची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस वर पवार कुटुंबीयांचे पुन्हा वर्चस्व निर्माण करायची धडपडच उघड्यावर आली. एरवी शरद पवार आणि सुप्रिया सुळे पूर्वी एवढे शक्तिशाली राहिले असते, तर पवार कुटुंबीयांना राष्ट्रवादी काँग्रेसवर नियंत्रण मिळविण्यासाठी एवढी धडपड करावी लागली नसती. पवारांनी सांगितले आणि राष्ट्रवादीत झाले असे घडून आले असते. पण आता पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादींमध्ये तसली परिस्थिती उरलेली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App