नाशिक : Delhi महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी सगळी राजी – नाराजी – आजारी खपवून घेतली जाईल, पण एकदा का आली दिल्लीची बारी… की मग… पळून जाई सगळी रोगराई!! अशी अवस्था महाराष्ट्रात येईल. Delhi
एकनाथ शिंदेंचे आजारपण पुन्हा एकदा अचानक वाढल्याने ते ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाल्याच्या बातम्या आल्या, पण त्याचवेळी त्यांनी मी आता बरा आहे, असे सांगून त्या बातम्यांवर देखील पाणी फेरले. गेल्या पाच-सहा दिवसांमध्ये एकनाथ शिंदे यांची राजी – नाराजी आणि आजारी या बातम्यांनी सगळा महाराष्ट्र व्यापला होता. या बातम्यांच्या अधून मधून विरोधकांच्या हालचालींच्या बातम्या समोर येत होत्या त्यामध्ये बाबा आढावांचे आंदोलन कधी सुरू झाले आणि कधी संपले हे कळले देखील नाही. त्यानंतर मारकडवाडीचे बॅलेट पेपर मतदान नाट्य सुरू झाले पण ते देखील दोन दिवसांमध्येच आटोपले.
एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होतील की नाही हा भाग अलहिदा पण विरोधी पक्षांची सगळी “मीडिया स्पेस” एकनाथ शिंदे यांनी केवळ आपल्या आजारपणाच्या बातम्यांमधून खाऊन टाकली.
दरम्यानच्या काळात आझाद मैदानावरच्या शपथविधीच्या तयारीवरून राजी – नाराजी समोर आली. पण ती देखील एकाच दिवसात आटोपली आणि तिन्ही पक्षांचे नेते आझाद मैदानाच्या तयारीची पाहणी करायला पोचले.
– चांगल्या समन्वयाची माध्यमांचीच कबुली
या सगळ्यांमध्ये दिल्लीतल्या पॉवर कॉरिडॉरमधून आणि मुंबईतल्या सत्ता गल्लीतून हीच बातमी लीक झाली, ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगला समन्वय आहे ते आपापल्या घरांमध्ये बसून आपापल्या समर्थकांशी चर्चा करत आहेत. दिल्लीशी त्यांचा उत्तम समन्वय आहे पण जोपर्यंत दिल्लीतून कुठलाच फायनल निर्णय येत नाही तोपर्यंत ते दोघेही अधिकृतरित्या काहीही बोलणार नाहीत. त्यामुळे कुठल्याच माध्यमांना महायुतीतल्या खऱ्या बातम्या मिळणार नाहीत. याची कबुली एनडीटीव्ही मराठी सारख्या माध्यमाने न्यायला नाईलाजास्तव का होईना, पण देऊन टाकली.
Eknath Shinde : आपटवीरांची मांदियाळी, शिंदेंच्या पाठीशी उभी राहिली!!
त्यामुळे हीच बाब समोर आली, ती म्हणजे राजी- नाराजी – आजारी; पण एकदा का आली दिल्लीची बारी… की मग… पळून जाई सगळी रोगराई!! दिल्लीतून आज सायंकाळी भाजपचे दोन निरीक्षक विजय रूपाणी आणि निर्मला सीतारामनची महाराष्ट्रात येऊन दाखल झाले की ते भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडतील. त्या संदर्भातला दिल्लीचा निरोप ते महाराष्ट्रात देतील महाराष्ट्रातला फीडबॅक दिल्ली देतील आणि दिल्लीचा अंतिम निर्णय महाराष्ट्राला कळवतील.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होईल??, त्यांच्याबरोबरचे दोन उपमुख्यमंत्री कोण असतील??, त्या दोन उपमुख्यमंत्र्यांना कोणती खाती देण्याची दिल्लीची तयारी असेल??, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा चेहरा – मोहरा कसा बदलेल?? त्यातून जुने कोण गळतील??, नवे कोण सामील होतील??, या सगळ्या प्रश्नांची “सरप्राईज” उत्तरे दिल्लीच्या अंतिम निर्णयातून मिळतील. बऱ्याच जणांचे आजार बरे होतील!!
तोपर्यंत माध्यमांमधून संजय राऊत, सुषमा अंधारे, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि मनोज जरांगे पाटील यांची वक्तव्ये वाचायला आणि ऐकायला मिळतील, एखादेवेळी बोललेच, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचीही वक्तव्ये ऐकण्याचा आणि वाचण्याचा “योग” महाराष्ट्राच्या जनतेला येईल, पण त्या कुठल्याही वक्तव्यांचा परिणाम दिल्लीच्या निर्णयावर होण्याची सुताराम शक्यता नाही. ….कारण एकदा का आली दिल्लीची बारी, की मग पळून जाईल सगळी रोगराई!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App