विशेष प्रतिनिधी
मुंबई: महापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून भाजपमधील काही नेत्यांकडून आपल्याला जाणीवपूर्वक अडचणीत आणले जात असल्याची तक्रार महापौर रितू तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे समजते. या भेटीमुळे मुंबई महापालिकेतील भाजपच्या अंतर्गत मतभेदांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
आपल्याला अडचणीत आणणारा ‘झारीतील शुक्राचार्य’ कोण आहे, याचा शोध घेणार असल्याचे तावडे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन मुंबईशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा केली. या वेळी आपल्यालाच जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याची तक्रारही त्यांनी केल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.
महापौर कार्यालयाच्या व्यवस्थापनासाठी २५ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. तसेच महापौर बंगल्याच्या नूतनीकरणावरील प्रस्तावित खर्च आणि महापौरांच्या वाहनांवरील लुकलुकत्या दिव्यांमुळेही वाद निर्माण झाला होता.
महेश ट्युटोरियल्सचे संचालक डॉ. श्रेणिक कोटेचा यांची महापालिका शाळांमधील नव्या शैक्षणिक उपक्रमांसाठी मानद सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यासंदर्भात तावडे यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांना पत्र दिले होते. या पत्रावरूनही पक्षांतर्गत मतभेद झाल्याची चर्चा आहे.
मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी दादरमधील वसंत स्मृती येथे भाजप नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत महापौर तावडे आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षा शिरवडकर यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याशीही चर्चा करण्यात आली. जनसंपर्क अधिकाऱ्याची बदली करण्याऐवजी महापालिकेतील एका सहाय्यक आयुक्ताकडे जनसंपर्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा पर्याय विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App